कडेलूट - परीक्षण - परशराम आंबी

*जसं करावं तसं भरावं म्हणजेच  पर्यावरणाचा नाश केला तर माणसांचाच नाश होईल हे वास्तव मांडणारी कादंबरी म्हणजे कडेलूट*
   *- परशराम आंबी* 

       डॉ. श्रीकांत पाटील यांनी कोरोना महामारीमुळे झालेल्या लाॅकडाऊन मधील जीवनावर आधारित लॉकडाऊन कादंबरी लिहिली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाष्य करणारी ऊसकोंडी कादंबरी लिहिली. तर २०१९ व  २०२१ च्या महापुराच्या परिस्थितीवर आधारित पाणीफेरा ही कादंबरी लिहिली. अशा सलग तीन यशस्वी कादंबऱ्यानंतर *कडेलूट* ही चौथी कादंबरी वाचकांच्या समोर आणलेली आहे.  मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांचे नाव होत आहे. 
        डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. त्यांची हयात गाव-खेड्यात गेल्याने अवती-भवतीचा परिसर, निसर्ग, राजकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेतीसंस्कृती यांचा चांगला अभ्यास त्यांनी केला आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटनांनी ते अस्वस्थ होतात.  याच अस्वस्थेतून त्यांचे लेखन होत असते. 
        प्रस्तुत 'कडेलूट' ही निसर्गावर होणाऱ्या मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणारी दमदार कादंबरी संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी मराठी वाचकांच्या भेटीस आणली आहे. प्रकाशिका डॉ. सुनिताराजे पवार यांनी आणली आहे. कादंबरीमध्ये डॉ. श्रीकांत पाटील यांनी मानवी आक्रमणामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी वाढ याकडे संशोधक, निसर्ग अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले आहे. निसर्ग हा वेळोवेळी संकेत देत असतो. त्याकडे दुर्लक्ष केले की मानवी जीवित व वित्तहानी ही हमखास होत असते. हेच डॉ. श्रीकांत पाटील यांना सांगावयाचे आहे. त्यांच्या कादंबरीतून फक्त समस्या मांडलेल्या दिसून येत नाहीत, तर त्या समस्येच्या मुळाशी जाऊन, चहूअंगांनी विचार करून त्यावर उपाय सुचविले जातात. कादंबरीतील पात्रांकडून, उपपात्रांकडून त्यांच्या वैचारीक कृतींतून लेखकाचा उद्देश अधोरेखित होतो. हेच त्यांच्या कादंबरीचे वेगळेपण आहे. हे वेगळेपण या कडेलूट कादंबरीतूनही पाहायला मिळते.  
        कादंबरीची पात्ररचना करताना डॉ. श्रीकांत पाटील यांनी विशेष भान राखलेले दिसून येते. देशातील सत्तर टक्के लोक शेती करतात.  त्याहून अधिक लोकं खेड्यामध्ये राहतात. 
          लेखक स्वतः खेडे गावात राहत असल्याने खेडूतांची मानसिकता, राहणीमान, चांगुलपणा, निसर्ग जपण्यासाठीची धडपड पाहायला दिसून येते. समकालीन पिढीची समस्या मांडताना जी काळजी घ्यावी लागते ती लेखकांनी घेतलेली आहे. म्हणून कादंबरीचा नायक तुकाराम हा या कादंबरीचा नव्हे तर संपूर्ण समकालीन पिढीचा प्रतिनिधीत्व करणारा नायक आहे असे मानता येईल.  तुकाराम हा शेतकरी आहे. तसाच तो गावात राहून जोडधंदा म्हणून रोडलगत हॉटेल चालवत आहे. 
            लहानपणी आपल्या संज्या, तुका, बंड्या, पिंट्या, बजरंग या मित्रांच्या संगतीने कथानायक तुकाराम गावातील निसर्गरम्य वातावरणात वाढला आहे. त्यांच्या बरोबरीने करवंदं, जांभळं, चिंचा, बोरे अशा रानमेव्यांचा त्याने आस्वाद घेतला आहे. जनावरांच्या पाठीमागे तो डोंगर कपारीतून फिरला आहे. त्यामुळे गावाची शिव, पंचक्रोशीचाही त्याने धांडोळा घेतला आहे. लेखकाने अतिसूक्ष्म बारकावे टिपले आहेत. त्यामुळे सारा परिसर आपलाच आहे असे वाचकाला निश्चितच वाटते. 
        तुका शेतकरी असून दूध उत्पादकही आहे. साधारणत: खेडेगावात प्रत्येक शेतकरी हा जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतोच. शेतीकडे फिरत गेला तरी जनावरासाठी वैरण घेऊन येतोच. पण या कादंबरीचा नायक थोडा वेगळा आहे. तो आधुनिक विचाराचा आहे. त्याला जनावरांना दावं लावून बंधनात अडकवणे पसंत नाही. म्हणून त्याने आपल्या शेतातच मुक्त गोठा पद्धत सुरू केली आहे. नैसर्गिक गोष्टींची त्याला आवड असल्याचे दिसून येते. 
        ग्रामीण कादंबरी लेखन करणे फारच जोखमीचे असते. निसर्गसौंदर्य हा तिचा गाभा असतो. लेखकाचं कसब आणि कौशल्य पणाला लागते. याचा प्रत्यय या कादंबरीत दिसून येतो. नेमक्या वाक्यातून चित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झालेला आहे असे मला वाटते... 
उदाहरणार्थ : 
*आग ओकणारा सूर्य मावळतीकडे झुकला कशी वाऱ्याची झुळूक मनाला उभारी देऊन गेली. (पान नं. ९)* या वाक्याने केलेली सुरुवात आकर्षक वाटते. श्रीकृष्णाच्या मंदिराबाहेरील मंडपात प्रवचनाची लगबग सुरू झाली, स्पीकरवरून विठू नामाचा गजर सुरू झाला. अशा वाक्यातून चैतन्य सळसळत वाहते याची प्रचिती येते. आजही खेडेगावातून भजन, कीर्तन, प्रवचन यांचा अनुभव आपणास येतो. 
*आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. पौर्णिमा जवळ आल्याने रात्रीच्या वेळी सुद्धा आजूबाजूचा परिसर चकचकीत दिसत होतं. (पान नं. १२)* 
*कडेलूट होताना राखोळीला गेलेल्या मुलांनी पाहिलं. ते अस्वस्थ झाले. सांगायचं कुणाला या विचारत असताना आपल्याच गावातील शिक्षक असलेल्या आंबीसरांना सांगण्याचे त्यांनी ठरविले. (पान नं. २०)* 
*"आप्पा, काय खरं नाही बघा. गाडी इथंपर्यंत आणताना अगदी नाकी नऊ आले." (पान नं. २३)* यावरून रस्त्यांची झालेली वाताहत दिसून येते. 
      डोंगरावर महादेवाचं मंदिर होतं. कधीकधी पायवाटेनं मंदिराकडे जायचे. *जाताना हर हर महादेव अशा घोषणा द्यायचे. (पान नं. १६२)*
         संवाद हा कादंबरी लेखनाचा आत्मा असतो असे मानले जाते. त्यातही बोली संवादाला वेगळाच मान असतो.  स्थानिक वारणाकाठच्या बोली भाषेचा योग्य वापर हे या कादंबरीचे आणखी एक बलस्थान आहे. त्यात कोल्हापुरी बोलीचा रांगडेपणाही दिसून येतो. 
उदाहरणार्थ : 
*"आरं ए तुका, संज्या...आरं कुठं हायसा?" (पान नं २५)*
*"आज आपण निसर्ग रक्षणासाठी योगदान दिलेल्या सरांचा आणि विद्यार्थ्यांचा सत्कार केला. (पान नं. ३७)*
*सतत पाऊस पडला तर भांगलण टोंगलण कशी करणार? (पान नं. ३७)* 
*"म्हणजे, तुला काय भविष्य कळते काय?" (पान नं.५०)*
*माळीण आणि परवा आमच्याकडं ईशाळवाडीत डोंगरानं गाव गिळलंया! (पान नं. १७१)*
          कादंबरीच्या शेवटी परिशिष्ट दिले आहे. शब्दसूची देऊन बोली भाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत. यातून डॉ. श्रीकांत पाटील यांची संशोधकवृत्ती ध्यानात येते. 
       आशय समृद्धीबरोबरच लेखकाच्या लेखनशैलीसही अनन्यसाधारण महत्त्व आहे. कमीतकमी शब्दांत हुबेहुब वर्णन करण्याचा लेखकाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे, 
*रस्त्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. एक कुत्र भुंकलं की लागलीच दुसरी त्याला साथ देत होती... (पान नं ६४)*

*मुंबईला जाताना घाटात रस्ता रुंदीकरणात पोखरलेल्या डोंगरकड्यांना लोखंडी जाळी मारून त्यावर गिलावा थापला आहे... (पान नं. १३६)* 
*आता सारं संपलं.. डगरी भुईसपाट झाल्या...(पान नं. १६२)* 
        त्याचबरोबर जनार्दन महाराज, आंबीसर, खबाले साहेब, नाना, बहीण पुष्पा, धनाजी, अरुण पेपरवाला, संभाजी, तुकादादा, रवी, विशाल, संभाजी... ही कादंबरीतील पात्रे आपापली भूमिका योग्य निभावतात व कादंबरीचा पैस आणि खोली फार मोठी आहे. काॅलेजात शिकणारी मुले, कर्नाटकातील नातेवाईक, मुंबईसारख्या शहरात राहणारे नातेवाईक, यांमुळे कादंबरीचा आवाका फार मोठा आहे.  गुजरात हायवे, कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभाग, निपाणी- शिवणी गाव, पुणे-मुंबई हायवेचे वर्णन तिथले ढाबे, मुंबईतले चकचकीत रस्ते, माॅल असे सरमिसळ वर्णन या कादंबरीत आले आहे. 
        कादंबरीची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील एका ओवीने नि तिच्या निरुपणाने होते, 
         गांवीचे देवळेश्वर। नियामकचि होती साचार 
         तरी देशींचे डोंगर। उगे का असते।। 
         तर कादंबरीचा शेवट संत तुकारामांच्या अभंगाने होतो, 
         वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। 
         पक्षीही सुस्वरे आळविती।। 
        संत परंपरेशी जोडलेले नाते , जीवा-शिवाशी जोडलेला भावबंध याचे लेखन 'कडेलूट'मधून आले आहे. जसा कादंबरीला अध्यात्माचा पाया आहे. तसाच निसर्ग व पर्यावरण जतन करणे हा आत्मा आहे. निसर्ग असो, एखादा प्राणी असो त्याला जीव लावला तर तोही आपल्याला भरभरून देतो. पण त्याची आपण नासधूस केली तर निसर्ग मानवजातीवर कोपल्याशिवाय राहात नाही.  हे लक्षात ठेवण्यासाठीच डॉ. श्रीकांत पाटील यांनी या कादंबरीची निर्मिती केली आहे असे मला वाटते. 
         डॉ. श्रीकांत पाटील यांच्या कादंबरीमालेचा आलेख असाच चढता राहो. एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न कादंबर्‍या त्यांनी लिहाव्यात. मराठी भाषा अधिक समृद्ध करावी. 
           कादंबरीबरोबर त्यांनी कविता, कथा, नाटक, बालसाहित्य, नाट्यछटा, ललितगद्य, समीक्षा अशा साहित्यातील सर्व प्रकारात त्यांनी लेखन केले आहे. आणखीन करावे अशी शुभेच्छा देतो. माझ्याकडून त्यांच्या भावी लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा! 
***

कादंबरी: कडेलूट 
लेखक : डॉ. श्रीकांत पाटील 
प्रकाशन : संस्कृती प्रकाशन पुणे 
पृष्ठे : २००, मूल्य : ३०० रुपये 
***

*श्री. परशराम रामा आंबी*
मुख्याध्यापक, 
श्री नवनाथ हायस्कूल, पोहाळे
(कार्यवाह, मराठी बालकुमार साहित्य सभा, कोल्हापूर) 
मोबा. ८८३०१५९४३७

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.