नो मॅन्स लॅंड एकांकिका - सौ. नसीम जमादार

परवा एका लग्न समारंभासाठी जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी हळदीचा भरगच्च कार्यक्रम पाहताना मनाला खूप अस्वस्थ वाटत होतं. पाण्याचा होणारा अपव्यय, वेळेचा होणारा अपव्यय आणि असंस्कृतीचे दर्शन घडवणारा नाच पाहून खूप वाईट वाटत होतं. ही परिस्थिती साधारण: सर्वत्र आढळते. काही अपवाद वगळता. मानव कुठे चालला आहे असा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला. कारण आज अनेक समस्या असताना, मनुष्य बाटलीबंद पाणी पीत असताना ही पाण्याची चाललेली उधळपट्टी पाहून क्षणभर मी स्तब्ध झालो...... 
        आणि मला मराठी बालकुमार साहित्य सभेच्या कार्याध्यक्षा सौ. नसीम जमादार यांनी लिहिलेल्या *नो मॅन्स लॅंड* या एकांकिका संग्रहाची आठवण झाली. खरंच आज पर्यावरणाची वाट बिकट होत चाललेली आहे. कोरोना हा शाप की वरदान हा संशोधनाचा विषय आहे. कारण यामध्ये मानवाची प्रचंड हानी झाली पण मानव सोडून इतर प्राण्यांसाठी खूप चांगल्या गोष्टी झाल्या. समुद्रकिनारी अनेक जलचरांचं मुक्त वावरणं झालेलं होतं. यामुळे मानवाला नसेना पण इतर प्राण्यांना कोरोनाचा कालावधी हा वरदानच वाटत होता असे माझे वैयक्तिक मत आहे.
          सौ. नसीम जमादार यांनी लिहिलेला *'नो मॅन्स लँड'* हा एकांकिका संग्रह माझ्या वाचनात आला. यामध्ये *नो मॅन्स लँड* शीर्षक असणारी पहिली एकांकिका आहे. सुसंस्कार  ही दुसरी एकांकिका आहे. रंगपंचमी ही तिसरी एकांकिका आहे. या तिन्ही एकांकिका वेगवेगळ्या विषयाच्या आशयाच्या आहेत. *नो मॅन्स लँड* ही पर्यावरण रक्षण करण्याचा मूलमंत्र देणारी एकांकिका आहे. कारण मानवाला आवश्यक असणारे हवा, पाणी, झाड हे तीनही घटक या पृथ्वीतलावरून निघून गेले. मग त्यांच्या शोधासाठी मानवाची धडपड सुरू झाली. या एकांकिकेची सुरुवात अशी होते की, मानवांचा समूह  हवा,पाणी व झाड यांना शोधण्यासाठी बाहेर पडतो. ते एकच प्रश्न विचारतात - 'कुठे गेलीत? कुठे गेलेत? आणि या  एकांकिकेची सुरुवात होते पोलिसांच्या निवेदनाने....... 'नागरिक हो ....कोणीही घाबरून गोंधळून जाऊ नका... आपल्या पृथ्वीवरील निसर्गातील महत्त्वाचे घटक हवा झाडे पाणी अचानक गायब झाले आहेत. त्यामुळे लोकांच्यावर कठीण प्रसंग ओढवला आहे....कोणीही घाबरून जाऊ नका..... पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.... नागरिकांनी शासनाला सहकार्य करावे... (पान नंबर १५) 
        पात्रांच्या संवादातून झाडांचे महत्त्व, हवेची आवश्यकता, पाण्याची गरज याचे विवेचन होत जाते. बिसलरीचं बाटलीबंद पाणी याचं वर्णन येतं. त्याचबरोबर प्लॅस्टिकच्या वस्तूंचा अतिवापर. आज आपण पाहतो वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये फुलांच्या ऐवजी प्लास्टिकची फुलं, झाडांच्या ऐवजी प्लास्टिकची झाडं यांचा वापर करून फोटो सेशन केलं जातं. रासायनिक खते, कीटकनाशके यांचा होणारा भरपूर वापर. त्यामुळे कॅन्सरसारखे घातक आजार मानवाला गिळंकृत करीत आहेत. जलप्रदूषण, वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. झाडांचा नायनाट झालेला आहे याचे महत्त्वपूर्ण वर्णन या एकांकिकेत आपणाला पाहायला मिळते. पर्यावरण विषयक ही एकांकिका खूप महत्त्वाची आहे.
        हे प्रतिज्ञा नाट्यरंग संस्था कोल्हापूर, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि प्रदूषण इको वेंचर यांनी आयोजित केलेल्या एकांकिका स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय माध्यमिक विभागात अनेक प्रथम क्रमांकांची बक्षिसे मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. 
             दुसरी एकांकिका मायेची पाखर नावाची असून यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती, वृद्धांची वृद्धाश्रमात रवानगी या विषयावर प्रकाशज्योत टाकणारी असून आजच्या लहान मुलांना आजी आजोबांची किती आवश्यकता आहे हे मनावर बिंबवणारी एकांकिका आहे. आजच्या मुलांच्या मनात वृद्ध माणसांविषयी तिरस्काराची भावना आहे. ती कमी होऊन वृद्धांविषयी आदर निर्माण व्हावा हे मूल्य देणारी ही एकांकिका आहे. 
 सून सासू-सासर्‍याशी नीट वागत नाही. मुलं टीव्ही पाहण्यात, मोबाईलवर चॅटिंग करण्यात गुंग झालेले आहेत. आजी-आजोबाविषयी त्यांच्या मनात मत्सर निर्माण होतो.   
        आजोबा (यशवंतराव) नातवंडांना म्हणतात, "बाळ प्रतीक, हे पूर्वा बाळा, अरे आम्ही म्हातारे झालोय यात आमचा काय दोष? म्हातारपण आलं की दुखणे येणारच. जसं आज आम्हाला आलं. तसं उद्या तुमची आई वडील म्हातारे होणारच. तुम्ही जो विचार करताय ना तो चुकीचा आहे. तुमचे आई-वडील घरी नाहीत म्हणून टीव्ही, मोबाईल सतत वापरणं हे चुकीचं आहे. (पान नंबर ४५-४६) 
        तिसरी एकांकिका आहे *रंगपंचमी*  विनोदी ढंगाची असलेली रंगपंचमी एकांकिका. यामध्ये रंगपंचमीचे यथार्थ वर्णन केलं आहे. मित्रांमध्ये चालेली रंगपंचमी हळूहळू दुसऱ्यावरती रंग मारण्यापर्यंत जाते. वाहनधारकांना अडवून पैसे मागितले जातात. रिक्षावर रंग मारताना रिक्षात असलेल्या पोलीसाच्या अंगावरती रंग जातो. पोलिसाला पाहताच मुलांची पळता भुई थोडी होते. पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यांच्या आयडिया सुरू होतात.  नदीवर जाऊन आंघोळ करून दडून बसतात. आणि शेवटी अशी रंगपंचमी पुन्हा करायची नाही हा निश्चय करून घरी परततात. 
 संस्कारक्षम, विनोदी, पर्यावरणविषयक मूल्य  देणारे हे पुस्तक वाचकांनी वाचायला हवेच. शिवाय प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुलांपर्यंत हे पुस्तक गेले पाहिजे. शाळाशाळांतून या प्रयोगशील एकांकिकांचे प्रयोग झाले पाहिजेत असे मला वाटते. 
             या एकांकिका संग्रहाला मराठी भाषेतील प्रसिद्ध कादंबरीकार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि राज्य पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. 
         सौ. नसीम जमादार यांना पुढील लेखन कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 

पुस्तक परीक्षण -
 श्री. परशराम आंबी
मुख्याध्यापक, 
श्री नवनाथ हायस्कूल, 
पोहाळे
--------------------------------------
पुस्तकाचे नाव - *नो मॅन्स लॅंड
लेखिका - सौ. नसीम जमादार
प्रकाशन - हृदय प्रकाशन पोहाळे, कोल्हापूर
पुस्तकाचा प्रकार - एकांकिका
मुखपृष्ठ - अभि पोवार
पाने - ७२
किंमत - ७५ रुपये

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.