पुस्तक परीक्षण - पाणीफेरा - डॉ. श्रीकांत पाटील

*२०२१च्या पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापूराचा 'ऑंखो देखा हाल' मांडणारी वास्तववादी कादंबरी-पाणीफेरा* 
          डॉ. श्रीकांत पाटील

           डॉ. श्रीकांत पाटील यांची लाॅकडाऊन, ऊसकोंडी या यशस्वी कादंबरीनंतर तिसरी कादंबरी म्हणजे *पाणीफेरा*
आपल्या महाराष्ट्रात १९८९ पासून २०२१ पर्यंत अनेक वेळा महापूर आले आहेत. अलीकडेच २०१९ आणि २०२१ मध्ये महापूर आले होते. या महापुरांचा अनेक गावांना वेढा पडला होता. आणि महापूर काय असतो हे प्रत्यक्ष अनुभवण्याचा, साक्षीदार होण्याचा योग अनेकांना मिळाला. पण ज्यांचं मन संवेदनशील असते त्यांच्या हातून काहीतरी चांगले कार्य होत असते. समस्येलाच संधी मानून त्याचा योग्य वापर करून घेत असतो तोच यशस्वी होतो. त्याप्रमाणे डॉ. श्रीकांत पाटील यांनी २०१९ आणि २०२१ या दोन वर्षी आलेल्या महापुराचा अनुभव, त्यावेळी होणारी माणसांची घुसमट, पर्यायी शोधलेले मार्ग, वेगवेगळी परिस्थिती. या साऱ्यावर समर्पक शोधलेले उत्तर याचे विवेचन डॉ. श्रीकांत पाटील यांनी आपल्या पाणीफेरा या कादंबरीमध्ये केलेले आहे. घटना, प्रसंग व पात्रांच्या माध्यमातून पाणीफेरा पुढे सरकत राहतो. लॉकडाऊन, ऊसकोंडी याप्रमाणेच पाणीफेरा ही कादंबरी सकारात्मक संदेश देणारी कादंबरी आहे. कादंबरीमध्ये पावसाळ्यापूर्वी असलेले वातावरण आणि पाऊस सुरू होताना झालेला बदल याचे त्यांनी सुंदर वर्णन केलेले आहे. 
         धडाम...धूम...अशी ढगांची गर्जना अवकाशात घुमू लागली. धोंडी नानाच्या छातीत धडकी भरली. क्षणार्धात वातावरणाचे मूळ स्वरूप बदलून गेले. कारण तगमग पार गारठ्यात बदलून गेली. (पृष्ठ ११) 
        या कादंबरीत खेडेगावातील वर्णन असल्यामुळे रावश्या, सुरेश, म्हादू अशी पात्रे आलेली आहेत. डेअरीला दूध घालणे, शेतातील कामे करणे याचेही वर्णन ताकदीने लेखकांनी केले आहे. "आवो,वळवाच्या पावसाने आपली एवढी दैना केली. मग पावसाळ्यात असा कोसळणारा पाऊस पडायला लागला तर? " असा प्रश्न बायको आपल्या नवऱ्याला विचारते. पाऊस एकसारखा कोसळत होता. विश्रांतीचं नाव घेत नव्हता. पाणी वाढत राहतं. नदीकाठच्या घरातून पाणी शिरलं. पाणी चढत चढत निम्म्याहून अधिक गावात शिरतं. त्या पाण्यामध्ये अडकलेल्या जनावरांची सुटका करणे, निवाराची सोय करणे, मुक्या प्राण्यांचा जीव वाचवणे यासाठी लोकांची चाललेली धडपड त्यांच्या लेखणीत आलेली आहे. टीव्हीवरून दिल्या जाणाऱ्या बातम्या - 'नदीकाठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा' यामुळे माणसांच्या पोटात भीतीचा गोळा सुटला. अतिशय दर्दभरी कहाणी या कादंबरीमध्ये सुरू होते. परंतु लेखकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून ही कादंबरी लिहिली आहे. नदीच्या महापुराच्या पाण्याबरोबर आलेली घाण, साप, मगर याचेही वर्णन लेखकाने केलेले आहे. 
        ही कादंबरी भारतीय शेती व्यवस्थेशी निगडित असून महापुराच्या काळात गावाची प्रेरणादायी कहाणी या कादंबरीतून आलेली आहे. आज निसर्ग कसा लहरी बनला आहे आणि त्याला मानवच कारणीभूत आहे हे लेखकाने मांडले आहे. एकीकडे पाऊस नाही म्हणून कोरडा दुष्काळ तर खूप जोरदार पावसामुळे निर्माण झालेला ओला दुष्काळ याचे वास्तव लेखकाने रेखाटले आहे. या कादंबरीमध्ये वारणा काठच्या खोऱ्यातील बोलीभाषा हे या कादंबरीचे वैशिष्ट्य आहे. तसेच संकटाच्या वेळी रडायचे नसून लढायचे असते, मोडलेला संसार पुन्हा उभा करायचा असतो. हे या कादंबरीतून शेतकऱ्यांच्या रूपाने निर्धारपूर्वक हे दाखवून दिले आहे. 
        कादंबरी वाचत असताना वाचकांच्या डोळ्यासमोर २०१९ आणि २०२१ मध्ये आलेल्या महापुराचे दृश्य जसेच्या तसे उभे राहते. यातील प्रसंग आपल्याच बाबतीत घडतो आहे असा भास होतो. आपले गुंतून जाते. या कादंबरीतील घटना, पात्रे, प्रसंग आपलेच वाटतात. आपल्या अवतीभवती प्रसंग घडत आहेत असे वाटते. 
      डॉ. श्रीकांत पाटील यांनी ताकदीची कादंबरी लिहिली आहे. लाॅकडाऊन, ऊसकोंडीप्रमाणे ही कादंबरी अनेक पुरस्कारांना पात्र ठरेल आणि अकादमी पुरस्काराला गवसणी घालेल याची खात्री वाटते. या कादंबरीस प्रा. डॉ. मथुताई सावंत, नांदेड यांची पाठराखण मिळालेली आहे. ही कादंबरी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुरेश सावंत, नांदेड यांना अर्पित केलेली आहे. 
          डॉ. श्रीकांत पाटील यांच्या पुढील लेखन कार्यास हार्दिक शुभेच्छा! 

*परशराम आंबी,*
उपाध्यक्ष, अखिल भारतीय शिक्षक साहित्य कला क्रीडा मंडळ, कोल्हापूर
........................................
पुस्तकाचे नाव - *पाणीफेरा*
लेखक - डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशन - संस्कृती प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ - विजय जोगमार्गे, मुंबई
पृष्ठसंख्या - २१८
किंमत -३००₹

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.