रस विचार नाट्यछटा ८

              रसविचार नाट्यछटा 
          नमस्कार मंडळी, नमस्कार. बरेच दिवस झाले तुमची गाठभेट होऊन. म्हणून यावं लागलं भेटायला तुम्हाला. नाहीतरी वर्ष गेलं असेल आपल्याला भेटून. अहो, असं काय बघताय माझ्याकडे? अहो, मीच तुमची मैत्रीण आहे. अगं चिंगे, थांब, थांब. मी सगळं सांगते तुम्हाला. एक नवा अनुभव देणार आहे मी तुम्हाला. तो आणि कसला अनुभव, म्हणतेस तू सोनू? अगंबाई, मी तुम्हाला रसाबद्दल सांगणार आहे. काय गं राणी? तुला माहिती आहे! मग सांग ना तूच. काय? उसाचा रस. अगं बाई, पण ऊस फार गोड लागला म्हणून तो मुळासकट खाऊ नये. त्या रसाबद्दल मला सांगायचं नाही. अगं हिरा, नावसुद्धा घेऊ नकोस त्याचं. नुसत्या नावानंसुद्धा माझं तोंड कडू झालं बघ. अगं मी त्या रसाबाबत बोलत नाही. हं हे आणि कोण म्हणालं, की लोखंडाचा रस? चिंगे, तुझंच काम आहे हे. तुझे बाबा आहेत ना कारखान्यात, फाउंड्री उद्योगात. मग तुला या रसाशिवाय दुसरा रस कसा माहिती असणार? अगं बायांनो, मला या रसावर सांगायचं नाही. तर साहित्यातील रसाबद्दल सांगायचं आहे. ही कोण बोलली म्हणायची कोकिळा? खोरं, पाटी, नांगर म्हणून. बरोबर. अगदी बरोबर आहे तुमचं. तुम्ही पडल्या गावाकडच्या पोरी. तुम्हाला या साहित्याशिवाय दुसरं साहित्य कसं माहिती असणार? हे झालं रानातलं साहित्य, काम करण्याचं साहित्य. मला म्हणायचं आहे ते कथा, कविता आणि कादंबरी या साहित्य प्रकारातील रसाबाबत. म्हणजे आपण कथा, कविता, कादंबरी वाचताना मन लावून वाचले पाहिजे. त्याचा आस्वाद घेत वाचले पाहिजे. असे वाचन केले की एक प्रकारचा वेगळाच आनंद मिळतो. प्रत्येकाला वेगवेगळा अनुभव मिळतो. मनामध्ये भावभावनांचे तरल तरंग उठतात. गद्य आणि पद्य असे साहित्याचे मुख्य दोन प्रकार पडतात. त्यातील प्रत्येक साहित्य प्रकाराचा अनुभव वेगळा असतो. काय सुमे, काय म्हणतेस तू? आप्पासाहेब खोत यांची 'गवनेर' कथा वाचलीस तू. फारच छान. त्या एका कथेत अनेक रस ओथंबून वाहत आहेत. ती कथा वाचताना, ऐकताना आणि पाहताना अनेक अनुभव येतात. आपण प्राण्यांना जीव लावला, की तो आपल्यासाठी जीव देतो. आणि माणसाला जीव लावला, की तो जीव घेतो. या एकाच वाक्यातून प्राण्यांचा जिव्हाळा कळून येतो. गवनेरचा अंत तर जीवाला चटका लावून जातो. डोळ्यातून पाणी येतं. फार फार वाईट वाटतं. म्हणजे दुःख होतं, त्याला करूण रस असे म्हणतात. करुण रसात शोक असतो. वा! सविता वा! छान कविता म्हणालीस तू 
'सण एक दिन, बाकी वर्षभर 
ओझे मरमर, ओढायचे' 
यातूनही करुण रस दिसून येतो. कारुण्य म्हणजे दु:ख बालकवींची गाजलेली कविता म्हणजे 'आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे
 वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे' 
यातून हास्य रस दिसून येतो. हास्य रसात आनंद, हर्ष, उत्साहाची भावना दिसून येते. तसेच विसंगती, चेष्टा, विडंबन या भावनाही दिसून येतात. आणि बरं का मुला-मुलींनो, 'ज्ञानातून उसळे तलवारीची पात, वेडात मराठे वीर दौडले सात' किंवा 'सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा डोंगर आडवा डोंगर. तयाला माझा नमस्कार' अशा प्रकारचे अंगावर शहारे आणणारे आणि अंगावर रोमांच उभे करणार गीत ऐकतो. त्यावेळी अंगात वीरश्री संचारते. त्याला वीररस म्हणतात. हा वीररस देशभक्तीपर गीते आणि पोवाडे यातून ओतप्रोत भरलेला असतो. सौंदर्याची खाण असलेला रस म्हणजे 'शृंगाररस'  शृंगार म्हणजे लावण्य. याचं गाणं माहिती नाही तुम्हांला? अशा माना काय हलवताय! अहो, मग एकाच
'लटपट लटपट तुझं चालणं गं मोठ्या नखऱ्याचं बोलणं गौ मंजुळ मैनेचं' 
अशा नखरेल, मनोहारी लावण्यातून वर्णन केले जातं. त्याला शृंगार असं म्हणतात. महापूर किंवा महाप्रलय अशा प्रसंगाचे वर्णन केले जाते, त्यावेळी त्यातून जो रस बाहेर पडतो, त्याला रौद्ररस म्हणतात. त्याचे उदाहरण द्यावयाचे म्हणजे--- 'मनूच्या वर्तनाकडे त्याचे बाबा डोळे वटारून पाहत होते.' यातून राग, क्रोध, चीड अशा भावना व्यक्त होतात. तर युद्ध, मृत्यू, सूड, राक्षस किंवा स्मशान याचे वर्णन करताना भय किंवा भीती वाटते. त्या ठिकाणी भयरस दिसून येतो. तो गुरासारखा ओरडला. त्याचे रक्त उलटे पालटे होत होते. केवळ तिरस्कार, तिटकारा किंवा वीट येणाऱ्या गोष्टींचे वर्णन जेथे केलेले असते, तिथे बिभत्स रस असतो. त्याचे उदाहरण म्हणजे 'नाव सरदार; पण दुर्गंधीच्या जागेत राहतो.' 
'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला' अशा गीतातून आश्चर्यकारक व विस्मयकारक गोष्टींचे वर्णन केलेलं असते. तेव्हा त्याला अद्भुतरस म्हणतात. आणि बरं का? या सर्व रसांचा राजा म्हणजे 'शांत रस'. तो कोठे असतो असे विचार विचारतेस तू, राणी? तर मग ऐक. तो साधुसंतांच्या अभंग आणि ओव्यातून पाहायला मिळतो. आपण पसायदान म्हणतो ना! हां तेच ' आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे'  नमस्कार मंडळी. आता मला गेलं पाहिजे दुसऱ्या वर्गात. त्यांनाही माहिती दिली पाहिजे रसांची. मी एवढेच म्हणेन की आम्ही  येतो तुमच्या वर्गात, नवनवीन विषय शिकविण्यास. आता जातो दुसऱ्या वर्गात, विसरू नये आमचा रामराम घेण्यास. 
धन्यवाद

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.