रोबो नाट्यछटा १०

रोबो
अहो वैताग आलाय या जीवनाचा. किती आवरायचं म्हटलं तरी काही आवरता येत नाही. बाबांना कितीही सांगितलं तरी तेही ऐकत नाहीत. अहो, कशाबद्दल काय म्हणतोय मी? आणि का वैतागलोय मी? अहो, सकाळी उठल्यापासून सारा पसारा आटपायला लागलोय तरी ते काम काय संपत नाही. बाबांना किती सांगितलं की तुमचं ऑफिसचं काम घरात आणू नका. माझं ऐकतील ते बाबा कसले? त्याची पण एक गंमत आहे. अहो ते दुसरीकडे कोणाकडे नोकरीला नाहीत, तर त्यांची स्वतःची एक प्रयोगशाळा आहे. ती आणि कसली? म्हणून काय विचारताय. ते एक शास्त्रज्ञ आहेत. काय? तुम्हाला माहिती नाही. तसे ते फार मोठे शास्त्रज्ञ नाहीत, जगाला सांगण्यासारखे मोठे नाहीत, पण मला खात्री आहे की एक ना एक दिवस ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ झाल्याशिवाय राहणार नाहीत. होय. होय. त्यांच्या करामतीवरून तरी मला तर तसेच वाटते बघा. अहो, हेच बघा ना. त्यांचा मांडून ठेवलेला पसारा. ते मला नेहमी म्हणतात की, हे बघ रामू, आपण काही साधीसुधी माणसं नाही आहोत. आपण या जगातली लय भारी माणसं आहोत. एक ना एक दिवस माझी नोंद या जगाला घ्यावीच लागेल. कारण मी असा नवा शोध लावून दाखवीन तरच मी खरा शास्त्रज्ञ म्हणून नाव सांगीन. हां, तर मी काय सांगत होतो....तर माझे बाबा नवीन नवीन शोध लावायची कामं करतात. काय म्हणताय? आजपर्यंत कोणते शोध लावलेत? फारसे नाहीत म्हणजे तसा एकही शोध लावलेला नाही आजपर्यंत. पण यापुढे लावणार नाहीत असे मात्र म्हणता येणार नाही. त्यांचे फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत. हेच बघा ना! किती साहित्य पडलेलं आहे. आमच्या घरात या लोखंडी सळ्या, ही चाकं आहेत. आणि ही वेगवेगळी साधनं आहेत. काय म्हणताय? ही तर बंगला बांधायला आणलेलं मटेरियल आहे ? नाही हो, नाही. माझ्यावर विश्वास ठेवा की ते बंगला बांधायचं साहित्य नाही. ते माझ्या बाबांचे प्रयोग करायचे साहित्य आहे. काय इतकं मोठं साहित्य कसं? अहो, ते बाजारातली खेळणी बनवणार नाहीत, तर ते रोबो तयार करणार आहेत. हां. हो. काय?  तुम्हाला रोबो माहीत नाहीत? तो कसा असतो? अहो, रोबो म्हणजे यंत्रमानव. तो अजून आपल्याकडे आलेला नाही. पण आला, तर मात्र मज्जा येईल. मज्जा. हे मला कसं माहिती? तसे बाबा फार चांगले आहेत. त्यांनी मला सगळं सांगितलं आहे. पण कोणालाही सांगू नको अशी ताकीद दिली आहे. नाहीतर त्यांचे पेटंट कोणतरी चोरेल अशी भीती त्यांना वाटते. एकदा का त्यांचा प्रयोग यशस्वी झाला, की ते जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ नक्की होतील. काय म्हणताय? या रोगाचा उपयोग काय? अहो अनेक देशांमध्ये या रोबोचा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोग केला जात आहे. पण आपल्या देशात याचा फारसा उपयोग केला जात नाही. आपल्याही देशात या रोबोचा वापर करून मोठ-मोठी कामं करता येतील. कोण म्हणाले ते की, ही सारी कामं आपल्याकडे केली जातात. ती जेसीपी आणि पोकलेनच्या साह्याने तुमचेही बरोबर आहे म्हणा ना. नाही तरी आपल्या शिवाजी पुलाचे काम करायला त्याचाच वापर सुरू आहे. पण थोडासा विचार करा, की आज हॉटेलची किती संख्या वाढलेली आहे! हॉटेलमध्ये काम करायला वेटरच मिळत नाहीत. शिवाय त्यांना खूप पगार द्यावा लागतो. पण माझ्या बाबांनी तयार केलेला एक रोबो अनेक वेटरचं काम करील. एकदा विकत घेतला, की त्याला पुन्हा फारसा खर्च येणार नाही. एकदा त्याची सेटिंग करून ठेवली, की तो आपले काम इमाने इतबारे करेल. मग काय? हॉटेल मालकाचा फायदाच फायदा. दवाखान्यात रोबोचा वापर सुरू झाला, की डॉक्टरांचा त्रास कमी होईल आणि लोकांचा पैसा वाचेल. काय म्हणालात? या रोबोत जीव नसतो. तो निर्जीव आहे. त्याच्यात बिघाड झाला, तर सारा खेळ खल्लास. अनेक लोकांचा जीव जाईल. आणि हो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांचा रोजगार बुडेल. अहो, थांबा. मला आपलं सारं पटतंय. आजच नव्हे तर आताच माझ्या बाबांना सांगायला जातो. रोबो तयार करायचं काम बंद करा म्हणून. बरं झालं माझे डोळे उघडले. मी जातो आता माझ्या बाबांचे डोळे उघडायला. राम राम. जय जय राम. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.