बंद रेशमाचे काव्यसंग्रह श्री रामदास कोरडे बुलढाणा

'बंध रेशमाचे' ह काव्यसंग्रह श्री. रामदास कोरडे साखरखेर्डा तालुका सिंदखेडराजा जिल्हा बुलढाणा  यांनी लिहिलेला आहे. विविध विषयांनी नटलेला वास्तववादी कवितांचा संग्रह म्हणजे 'बंध रेशमाचे'. 
         आपल्या मनात आलेले विचार, भावना, अभिव्यक्ती करण्यासाठी कवी कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतो. मनातील भावभावना, सुखदुःख आणि अनुभव यांचा खजिना कवी श्री. रामदास कोरडे हे कवितेच्या माध्यमातून व्यक्त करतात. कवीने आपल्या जीवन प्रवासात पाहिलेले, अनुभवलेले, जोखिलेले आणि साहिलेले अनुभवांचे संचित कवितेच्या माध्यमातून साकारलेले आहे. बंध रेशमाचे या कवितासंग्रहात समाज, संस्कृती, अध्यात्म, भक्ती, प्रीती अशा विविध विषयातून कवितेची मांडणी केलेली आहे. कवितासंग्रहाची सुरुवात - 'अजूनही भेट तिची...' या प्रेम कवितेतून होते. 
'अजूनही भेट तिची घडते कधीकधी 
नकळत आसवे ती गाळते कधीकधी
 झुरते ती झुरतो मी मनात कधीकधी
 हृदयात आठवणी मी पचवितो कधीकधी'
यासारख्याच तुझ्यासाठी, मंगळसूत्र, बंध रेशमाचे, जीवनसाथी, तुझ्यात जीव गुंतला, जन्म हाच खरा, एक नकार यासारख्या प्रेम विषयक कविता या कवितासंग्रहात आल्या आहेत. 
         'पाऊस वाहून गेला' या कवितेत गरीब परिस्थितीत गांजलेल्या शेतकऱ्याविषयी लिहितात-  
वैशाखाच्या वणव्यात माय बापासोबत राबली 
अनवाणी पायाने उन्हात अंग अंग भाजली कवितेच्या शेवटी कवी लिहितो-
 तहानलेला चातक व्याकूळ व्याकूळ झाला डोळ्यामधल्या आसवांत पाऊस वाहून गेला
       अनेक कवींच्या कवितेचा विषय म्हणजे शेतकरी. तो स्वतः अन्नधान्य पिकवितो, शेतात माणिकमोती पिकवतो; पण त्याच्या मालाचा भाव त्याला ठरवता येत नाही. दलाल भाव ठरवत असतात. हे वास्तव चित्र कवीने या कवितेत मांडले आहे. शेतकऱ्याबद्दल कवी लिहितात- शेतकऱ्या, कष्टकऱ्या राबवतोस तू 
हातावर भाकर खाऊन जगतोस तू 
शेतामधी तूच मळ्यामधी तूच 
काबाडकष्टाने जगतोस तू
 पिकवितो माणिक मोती अन्नधान्य तू 
भाव ठरविण्या त्याचा नसतोस तू
तुझ्यापेक्षा तर दलाल लयभारी 
मळका, चळका फाटका असतोस तू
        एकविसाव्या शतकातही कुटुंब व्यवस्था ही महत्त्वाची आहे. आई-वडील, आजी-आजोबा, अशी एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे मुलांच्यावर होणारे संस्कार, प्रेम, जिव्हाळा मिळणारा एक स्त्रोत असतो. अशा आशयाच्या माय, माय-बाप, देव्हारा, बाप, माहेर, माय जाई पाथंवर या कविता आहेत. या कविता संग्रहातून आई, बाप आणि कुटुंब व्यवस्था याविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करणाऱ्या कविता आलेल्या आहेत. कारण कवीचे आई-वडील ही कवीची श्रद्धास्थाने आहेत. 
            मानव हा समाजप्रिय प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही. जन्मापासून मरेपर्यंत त्याची जडणघडण समाजात होत असते. मरणानंतरही काही विधी समाजात होत असतात.  सामाजिक समस्यांचा विचार कवीने मानवात, काटे, झडप, पाणी, पोरी सोरी, मलाही जगू द्या रे, लक्षण अशा कवितेतून मांडलेला आहे. 
          शूर, वीर, संत, समाजसुधारक यांची महाराष्ट्र भूमी. अशा थोर व्यक्तींना कवीने आपल्या लेखणीच्या माध्यमातून वंदन केले आहे. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महान व्यक्तींना क्रांतिबा ज्योतिबा, अभिमान, विद्वानवीर, तोडून टाक तू अशा कवितेतून आपल्या शब्दांच्या माध्यमातून वंदन केले आहे. ते विद्वानवीर कवितेत लिहितात-
 तुह्या भी मायचा माह्या भी मायचा
 होता बाप लय दिलवार....
एक ज्योतिबा क्रांतिवीर एक भिमराव घटनाकार
 ज्योतीने सोडले शिक्षण अर्ध्यावर 
लावी मायबाप हातभार
 भीम राही वर्गाबाहेर तरी त्यांचा पहिला नंबर
 दोन्ही होते ते हुशार कीर्ती झाली त्यांची जगभर. 
           हा कवितासंग्रह वैदर्भीय बोली भाषेत लिहिला असल्यामुळे याचे वेगळेपण उठून दिसते. रोखठोक शब्दयोजना, ओघवती भाषा, गेयता, लय, ताल, सूर याचे भान असल्यामुळे श्री. रामदास कोरडे यांच्या 'बंध रेशमाचे' या काव्यसंग्रहाला वेगळीच उंची प्राप्त झाली आहे. अशाप्रकारचे काव्यसंग्रह त्यांच्या हातून लिहिले जावेत यासाठी त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. 
               भक्ती, अध्यात्म, समाज, पर्यावरण, प्रेम अशा विविध विषयांवरील ५८ कविता या कवितासंग्रहात समाविष्ट आहे या कवितासंग्रहाला लाॅकडाॅऊन, ऊसकोंडी कादंबरीचे श्रेष्ठ लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांची प्रस्तावना लाभलेली आहे.  सचिन भोसले यांनी अतिशय मार्मिक मुखपृष्ठ तयार केले आहे. शशिकांत पवार यांनी ललित पब्लिकेशन मुंबईमार्फत कविता संग्रह प्रकाशित केला आहे. ८० पानांचा कविता संग्रह असून १५० रुपये मूल्य आहे. 



Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.