पूरग्रस्त मी (२०२१) ५

पूरग्रस्त मी २०२१
       कोणी घर देता का घर, या पूरग्रस्तांना घर देता का घर. अहो मंडळी, थांबा ना थोडं. अहो, सांगतो मी सारं. काय म्हणताय? मदत मागायला आलोय मी? नाही. मला काहीही मदत नकोय. जी मिळाली ती भरपूर झाली. यातून मी माझा संसार सावरला आहे. अहो, ही दानत आपल्याला महाराष्ट्रातच पाहायला मिळते. या महापुरानं सगळीकडे हाहाकार उडवला होता. उभ्या आयुष्यात असा महापूर मी कधी पाहिला नव्हता. अहो, माझे आजोबा आज ८० वर्षाचे आहेत. ते सांगतात की त्यांनीसुद्धा त्यांच्या आयुष्यात असा महापूर कधी पाहिला नव्हता. हा महापूर का आला? त्याची कारणं काय आहेत? याबाबत मी काही बोलणार नाही. कारण ते काही माझ्या हातात नाही. पण या महापुराने मला भरपूर काही दिले. होय. खरं आहे ते. या महापुरात माणसाने तांदूळ, डाळ, तेल, पिण्याचे पाणी असं सारं काही आणून दिलं. किती किती आणि काय काय दिलं म्हणून सांगावं. ही महाराष्ट्र भूमी आहे. ही भूमी शिवरायांची आहे. भिमरायाची आहे. आणि साधुसंतांची आहे. अजूनही गावोगावी मदतीचा महापूर येतच आहे. काय म्हणताय? हां बरोबर आहे. पण मला जे सांगायचं आहे ते विसरूनच गेलो बघा. मला तर खरे आभार मानायचे आहेत ते आपल्या आर्मीवाले लोकांचे. का का म्हणून विचारत आहात तुम्ही? ते आलेत म्हणून तर आज मी आपल्यासमोर बोलतोय. ते कसं? मग आपल्याला सांगायला हवं. अहो पावसानं सुरुवातीला ओढ दिली होती. इतकंच नव्हे तर वेधशाळेनही पावसाची शक्यता कमीच वर्तवली होती. त्यात आणि ते अरबी समुद्रात वादळ झालं होतं. मिरगात येणारा पाऊस थांबला. पाऊस लांबणीवर पडला. तो थोड्या उशिराने चालू झाला. नुसता चालू झाला नाही, तर तो कोसळायला लागला. नदी नाल्यांना पूर आला. पावसानं थोडी उसंत घेतली. पूर ओसरला. राजूदादा तुझं बरोबर आहे. तू म्हणतोस ते खरं आहे. पाणी नदीपात्रात गेलं होतं. आता पाऊस लवकर येणार नाही, असं वाटत असतानाच म्हातारा पाऊस सुरू झाला. आणि एकसारखा सपाटाच लावला त्यानं. एक, दोन, तीन नव्हे तर सलग नऊ दिवस एकसारखा कोसळायला लागला होता. लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं. सगळे लोक १९८९ व २००५ ची पाणी पातळी समजून बसलेली होती. यापेक्षा जास्त पाणी येणार नाही असा गैरसमज करून बसले होते. पाणी वाढू लागले. बघता बघता कधी पूररेषा ओलांडून पुढे गेलं, ते समजून आलेच नाही. तासाला फुटाने पाणी पातळी वाढत होती. होय रे सर्जा, तू म्हणतोयस तसंच झालं. माणसांची धावपळ सुरू झाली. गावातील उंच भागावर काहीजण जमा झाले, तर काही दुसऱ्या मजल्यावर जाऊन चढून बसले. काही वेळानंतर पाणी वसरू  लागेल अशी आशा होती. पण ती आशा संपली. पाऊस कमी झाला नाही की पाणी कमी होण्याचं नावच नाही. मग एकच गडबड गोंधळ उडाला. त्यात लाईट नाही. मोबाईल चार्जिंग नाही. संपर्काचे साधन नाही. पण काहीचे मोबाईल सुरू होते. कारण त्यांच्या घरी इन्व्हर्टर होता. त्यांनी जिल्हाधिकारी ऑफिसशी संपर्क साधून बोटी मागवून घेतल्या. तीन दिवस बोटीतून माणसं काढायला सुरुवात होती. सुमारे ५००० माणसं पुरातून बाहेर रजपुतवाडीच्या माळावर काढली. सारी जनावरं गंगामाईनं वाहून नेली.  जनावरांचे गोटे पाण्यात बुडून गेले. छाती एवढ्या पाण्यात जाऊन जनावरांची दावी कापून दिलीत. तर काही लोकांनी दुसऱ्या मजल्यावर जनावरे चढवून नेली. होय ग छक्की, कुसुमाग्रजांनी याचं यथार्थ वर्णन केलेलं आहे. ते लिहितात- 
गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली. काय म्हणतेस संगे? या महापुरानं काय दिलं? मग ऐक तर - जमाखर्च हा पूरग्रस्तांचा मी मांडतो आहे काय मिळवलं आणि काय हरवलं ते सांगतो आहे. सगळी माणसं या पावसाला नाकं मुरडाय लागलीत. शिव्याशाप द्यायला लागली आहेत. या पावसानं सगळ्यांचं नुकसान केलं. कोणाचं शेतीचं नुकसान केलं, रानातलं उभं पीक वाहून गेलं. तर कोणाच्या घरात पाणी शिरून मोठं नुकसान झालं. त्याचा संसार उघड्यावर पडला. या महापुरानं फार मोठी कामगिरी केली. पूरग्रस्तांना अनेक लोकांनी मदत केली. संस्थांनी मदत केली. शाळेतील मुलांना वह्या, पेन आणि दप्तर दिले. पण या महापुरानं जाती-पातीची बंधनं तोडून, हिंदू मुस्लिम शीशी, ईसाई या धर्माच्याही पलीकडे एक धर्म आहे आणि तो म्हणजे मानवता धर्म. मानवता हाच खरा धर्म, तो सर्वश्रेष्ठ धर्म आहे हे दाखवून दिलं. म्हणूनच साने गुरुजी म्हणाले आहेत - खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे. जगाला प्रेम अर्पावे. 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.