'भाकरचोर' परीक्षण- श्री. धनाजी माळीसर

श्री. नवनाथ हायस्कूल पोहाळे शाळेचे शिक्षक.... वाचन-चळवळ वृद्धिंगत व्हावी व मुलांच्या जडणघडणीसाठी शाळेत पुस्तक वाचन, वक्तृत्व, कथाकथन, एकांकिका अशा विविध स्पर्धा आयोजित करणारे आमचे मार्गदर्शक, बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे सचिव व वारणा साहित्य परिषदेचे सदस्य आदरणीय परशराम आंबी सर यांचे 'भाकरचोर' हे पुस्तक नुकतेच वाचनात आले.
लेखक परशराम आंबी सरांच्या 'भाकरचोर' या पुस्तकात एकूण सोळा कथा असून प्रत्येक कथेतून कोणती ना कोणती तरी शिकवण मिळतेच. दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांना लेखकाने कथेचे रूप दिले आहे. कथेतील भाषा सोपी, ओघवती आहे. योग्य ठिकाणी संवाद आलेले आहेत. म्हणींचा वापर अगदी योग्य आणि चपखलपणे केलेला आहे.
लग्न जमवताना किती अडचणी येत असतात, हे आपण कधी ना कधी अनुभवलेले असतेच. अन् मुलीचे लग्न जमवताना तर तिच्या आई-बाबांना किती चिंता सतावत असतात, याची कल्पनाच केलेली बरी. 'वाट ही पुनवेची' या कथेत आपल्या उपवर मुलीबद्दल आईला वाटणारी हुरहूर, लग्न जमणार अशी थोडीफार वाटणारी आशा आणि अपेक्षाभंग यांचं सुंदर चित्रण वाचायला मिळतं.
सत्त्वपरीक्षा ही एक सुंदर सुखांतिका असणारी कथा आहे. मधुकरच्या प्रामाणिकपणाची सत्त्वपरीक्षा पाहणारी ही एक आगळी वेगळी नि वाचनीय कथा आहे.
लेखक एक संवेदनशील शिक्षक आहेत. शाळकरी वयात किंवा शिक्षक म्हणून सेवा बजावत असताना त्यांच्या जीवनात अनेक अनुभव आलेले असणार. याच अनुभवातून त्यांना विविध कथाबीजे सापडली असणार. 'रावसाहेब ' या कथेत त्यांनी प्राथमिक शाळेतला प्रसंग चितारला आहे. सरांनी मनाला भिडणारं कथानक ओघवत्या शैलीत मांडलं आहे. बाप-लेकीच्या प्रेमाची, त्यांच्या आदर्श नात्याचं सुंदर कथानक असलेली 'नेत्रदान श्रेष्ठ दान' ही कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेणारी आहे. ही कथा वाचताना वाचकाचं मन कृतज्ञतेनं भरून येतं. ही कथा सतत वाचत राहावी, असंच वाटतं. 'भाकरचोर' शीर्षक असलेली कथा पोटासाठी भाकरी चोरणाऱ्या शाळेतल्या एका प्रामाणिक मुलाची आहे, तशीच ती गरीब पण हुशार व होतकरू मुलाला... त्यानं चांगलं शिकून, उत्तम व चारित्र्यसंपन्न नागरिक घडावं, या हेतूनं मदत करणाऱ्या संवेदनशील मुख्याध्यापकांचीही आहे. ' कोसळता पाऊस ', ' आर्मीवाला दादा ' ह्या पावसाळ्यात घडलेल्या प्रसंगावर आधारित छान कथा आहेत.
आयुष्यात चांगला जोडीदार मिळाला नसला की,संसाराची धुळधाण होते. विनाकारण केलेली ईर्षा माणसातल्या चांगुलपणाचा कसा अंत करते अन् मग सारेच उद्ध्वस्त होते, हे ' दीपलक्ष्मी ' या कथेत वाचायला मिळते. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा अन् मुलगी म्हणजे आई-बापाच्या जीवाला नुसता घोर. समाजात आजही मुलीला दुय्यम स्थान दिले जाते. त्यामुळे मुलगी जन्मालाच न आलेली बरी अशीच समाजाची मानसिकता होऊन गेलेली आहे. स्त्रीभ्रूण हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे, हा छान संदेश 'दोष कोणाचा?' या कथेत आंबी सरांनी दिलेला आहे. आपल्या मुलानं चांगलं शिकावं, शिकून समाजात नाव मोठं करावं, असं प्रत्येक आई-बापाला वाटत असतं. अन् तसं घडलं तर त्यांना होणारा आनंद हा अवर्णनीय असतो हे ' सपान ' या कथेत वाचायला मिळते. 'मुलग्यापेक्षा मुलगी बरी | प्रकाश देते दोन्ही घरी ||' या गोष्टीचा बोध कुलदीपिका या कथेतून होतो.
चांगल्या गोष्टीतही राजकारण आल्यामुळे कामाचा कसा पचका होतो, हे 'असे घडले साहित्यसंमेलन' या कथेत वाचायला मिळते. भाकरचोरमध्ये अशीच एक रसभरित कथा आहे. प्रापंचिक स्त्रीयांनी वाचून तिच्यातून योग्य तो बोध घ्यावा, अशी एक कथा आहे 'चूक एकदाच होते'. ज्या समाजात आपला जन्म होतो, ज्या समाजात आपण जगतो, त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागत असतो, हे फार मोठे तत्त्वज्ञान ' देणाऱ्याने देत जावे... ' या कथेत वाचायला मिळते. आपणही यातून काहीतरी बोध घेतला तर जगात नक्कीच चांगुलापणा वाढायला मदत होईल. शाळा, चंद्रमुखी यासुद्धा अशाच वाचनीय कथा आहेत.
एकंदरित, 'भाकरचोर' हा कथासंग्रह नक्कीच वाचनीय झाला आहे. त्यातील पात्रे, घटना, प्रसंग, ग्रामीण जीवन जगताना माणसाच्या स्वभावातील गुण-दोषांचे दर्शन, माणसातील चांगुलपणा, योग्य म्हणींचा चपखल वापर यामुळे हा कथासंग्रह सर्वांगसुंदर झालेला आहे. लेखक परशराम आंबी सरांचे अभिनंदन व पुढील साहित्यिक वाटचालीस खूप खूप शुभेच्छा !
पुस्तकाचे नाव-भाकरचोर
पृष्ठे-१२८
किंमत-१८० /- रुपये
प्रकाशन- हृदय प्रकाशन,कोल्हापूर
पुस्तक परिचय-धनाजी माळी(मो.नं. ९६७३२८७०९९ )

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.