भाकरचोर कथासंग्रह मनोगत नवीन

'भाकरचोर' कथासंग्रह 
मनोगत....... 

मनुष्य हा गोष्टी वेल्हाळ प्राणी आहे. प्रत्येक व्यक्तीला गोष्टी ऐकायला, वाचायला खूप आवडतात. अगदी प्राचीन काळापासून कथांचा उगम झालेला आपणास पहावयास मिळतो. अगदी सुरुवातीच्या काळात पद्य हा वाड़मय प्रकार होता. या पद्यामध्येही कथाबीज होते. गद्य स्वरूपातील साहित्य प्रकार महानुभाव पंथ काळापासून अस्तित्वात असलेला आपणास पहावयास मिळतो. तो चक्रधर स्वामींच्या आठवणींच्या लीळाचरित्राच्या स्वरूपात होता. प्राचीन कथा, मध्ययुगीन कथा, लघुकथा पूर्वकथा, लघुकथा, नवकथा असा कथांचा प्रवास झालेला आपणांस पाहायला मिळतो. पूर्वीच्या कथा मौखिक पद्धतीच्या होत्या. परंतु इंग्रज भारतात आल्यानंतर त्यांनी मुद्रण कला भारतात आणली. ह. ना. आपटे यांनी लघुकथेचा पाया घातला असे मानले जाते. त्यानंतर दिवाकर कृष्णांनी मराठी कथेला नवे वळण दिले आहे. ना.सी.फडके वि. स. खांडेकर यांनी कथेला उच्च शिखरावर नेले आहे. य.गो.जोशी, श्री. म. माटे, चिं. वि. जोशी यांनी कथेची भाषाशैली, तंत्र, अनुभव, दृष्टीकोन याबाबत बदल  करत आपली वेगळी कथा निर्मिती केलेली दिसून येते. 
          गंगाधर गाडगीळ, कुसुमावती देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, पु. भा. भावे यांनी नवकथेला वेगळ्या उंचीवर नेलेले आहे. या कथांमधून वास्तवता, वास्तववादी दृष्टीकोन, व्यक्तिमत्त्वाबाबत बदललेली कल्पना, मानवी मनावर प्रभाव पडलेला दिसून येतो. १९६० नंतर कथेने नवनवीन क्षितिजे सर केलेली दिसून येतात. यामध्ये अनुभवांचा अस्सलपणा, रचनेचा स्वतंत्रपणा, अभिव्यक्तीतील नवचैतन्य यांनी कथा समृद्ध झालेली पहावयाला मिळते. रा. रं. बोराडे, उद्धव शेळके, मधु मंगेश कर्णिक यांसारख्या लेखकांनी कथा समृद्ध केलेली आहे.     
           ग्रामीण कथा, दलित कथा, स्त्री विषयक कथा असे प्रवाह निर्माण झालेले आढळून येतात. यातून मानवाच्या जीवनाचे वास्तव चित्रण करणाऱ्या कथा निर्माण झाल्या आहेत. कलात्मक दृष्टिकोन, सामाजिकता, लोकांचे व पशूंचे जीवन चित्रण कथांमधून येऊ लागले. मनोविश्लेषण व आत अंतर्मनाचा ठाव घेणारी कथा निर्माण होऊ लागली. 
            कथा हे जीवनाचे साधन न होता , ते जीवनाचे माध्यम व्हावे अशी नवी दृष्टी निर्माण झाली. समाजातील घडणारे बदल, परिवर्तन माणसांच्या विचारांमध्ये होत गेलेला बदल, जीवनमूल्यांचा ऱ्हास, हरवत चाललेली माणुसकी यांचे चित्र कथांमधून येऊ लागले. याचाच अर्थ वास्तव जीवनाचे दर्शन कथांमधून होऊ लागले. समाजाचे प्रतिबिंब साहित्यातून उमटू लागले. 
             समाजात डोळे उघडे ठेवून पाहत असताना जे घडलं, जसं दिसलं, जे अनुभवलं ते कथेच्या रूपात प्रकट होत गेलं. देवदर्शनाला किंवा प्रवासाला जाणे ही एक साधारण घटना आहे; पण प्रवास करताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी, घटना आणि माणसा-माणसातील सहसंबंध आणि त्यावेळी मनात आलेले विचार माझ्या 'वाट ही पुनवेची' या कथेतून आपल्या दर्शनास येईल. आजकाल लग्न जमवणे हा बिकट प्रसंग निर्माण झालेला आहे. यातूनच दलाल लोकांची निर्मिती झालेली आहे. आज मुलांचे शिक्षण कमी तर मुलींचे शिक्षण खूप होत आहे. त्यामुळे लग्न जुळवणे अवघड होत आहे. पण माणुसकी म्हणून आपल्याच रक्त संबंधातील व्यक्तीचे कल्याण करणे हा मूलभूत विचार सांगणारी माझी 'सत्त्वपरीक्षा' कथा. रक्ताचं नातं श्रेष्ठ की जोडलेलं नातं श्रेष्ठ असा प्रश्न पडणाऱ्यांसाठी मानवता हेच नातं श्रेष्ठ आहे, हे सांगणारी 'रावसाहेब' कथा. आज नेत्रदान, देहदान, अवयव दान, रक्तदान या संकल्पना रुजू होत आहेत. वडील आणि मुलगी यांच्या नात्याची महती सांगणारी कथा म्हणजे 'नेत्रदान श्रेष्ठदान' ही कथा अनुभवावयास मिळते.
                जीव जगवण्यासाठी चोरी करावी लागते. खरं तर माणूस हा वाईट नसतो, तर परिस्थितीने तो वाईट बनतो याचे ज्वलंत चित्रण माझ्या 'भाकरचोर'  कथासंग्रहाचे शीर्षक असणाऱ्या कथेतून आपणास पाहायला मिळतील. विज्ञान युगात आपण खूप प्रगती केली ; पण मुले परदेशी शिक्षणासाठी पाठवली जातात. ती तिथेच स्थायिक झाली. त्यामुळे मुलाविना घरी असलेल्या म्हातारा म्हातारी यांची काय दशा होते. याचं दुःख 'कोसळता पाऊस' मधून आले आहे. शिक्षण घेणे किती खडतर आहे याचा अनुभव 'दीपलक्ष्मी' आणि 'सपान' या कथातून आपणांस पाहायला मिळते. 
               मुलींचा टक्का घसरला आहे. तरीसुद्धा समाजामध्ये नवजात स्त्रीभ्रूण हत्या केली जाते. याचे वास्तव दर्शन 'दोष कोणाचा?' कथेतून आलेले आहे. मुलगा हा वंशाचा दिवा म्हणून आपल्या समाजात पाहिले जाते;  पण मुलापेक्षा मुलगी बरी हे सांगणारी कथा म्हणजे 'कुलदीपिका.' 
         एखादी गोष्ट पूर्ण करताना किती अडचणीला सामोरे जावे लागते, त्यावर कशी मात करावी याचा संदेश देणारी कथा 'असे घडले साहित्यसंमेलन' ही कथा जन्म घेते. "स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंत काळाची माता आहे. याचे वास्तव दर्शन घडवणारी कथा म्हणजे 'चूक एकदाच होते' ही कथा. 'चंद्रमुखी', 'आर्मीवाला दादा' यातून संस्कार किती थोर आहेत. ते कसे जपले पाहिजेत याची महती सांगितली आहे. 'विना सहकार नहीं उद्धार' हा संदेश देणारी व सहकाराचे महत्व पटवून देणारी कथा म्हणजे ' देणाऱ्याने देत जावे'.
         अशा 'भाकरचोर' कथासंग्रहाचे आपण सुज्ञ वाचक स्वागत कराल याची मला खात्री आहे. 
        सन २०२२ मध्ये माझी तिसरी साहित्यकृती 'भाकरचोर'  कथासंग्रहाच्या रूपाने प्रकाशित होत आहे. यातील कथा 'महान मराठा', 'कृषिराज', 'ज्ञानमाऊली', 'शब्दसुगंध',  अशा विविध दिवाळी अंकातून पूर्वप्रकाशित झालेल्या आहेत.   'सत्त्वपरीक्षा' आणि 'वाट ही पुनवेची' या कथांचे कोल्हापूर आकाशवाणीवरून प्रसारण झालेले आहे. 
           श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. जी. पाटील, स्कूल कमिटी चेअरमन श्री. व्ही. एस. काटकर आणि संचालक मंडळ यांचे सदैव मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला आहे. माझे सर्व शिक्षक बंधू, भगिनी, कर्मचारी आणि मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर, महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा वारणानगर, अखिल भारतीय शिक्षक-साहित्य-कला-क्रीडा मंडळ या संस्थांचे मला मोलाचे सहकार्य मिळालेले आहे. अनेक मित्रांनी कथा लेखन करण्यास प्रोत्साहन दिलेले आहे. 
              'भाकरचोर' कथासंग्रहासाठी डॉ. शिवाजी शिंदे कुलसचिव, अहिल्याबाई होळकर विद्यापीठ, सोलापूर यांची सुंदर प्रस्तावना लाभलेली आहे. डॉ. श्रीकांत पाटीलसर यांनी पाठराखण (ब्लर्ब) केलेली आहे. अभि पोवार यांनी आकर्षक मुखपृष्ठ रेखाटलेले आहे. आरोही ग्राफिक्स यांनी डी.टी.पी. करून दिले आहे. वीरा प्रिंट सर्व्हिसेस यांनी मुद्रण केलेले आहे. श्री. चंद्रकांत निकाडेसर यांनी मुद्रित शोधन केलेले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची जबाबदारी हृदय प्रकाशन, कोल्हापूर यांनी घेऊन पूर्ण केली आहे. माझी पत्नी आणि कुटुंबीय यांचेही मोलाचे सहकार्य मला मिळाले आहे. अशा ज्ञात-अज्ञात व्यक्तींमुळे माझा 'भाकरचोर' कथासंग्रह प्रकाशित होत आहे. या सर्वांचे आभार व्यक्त करणे उचितच आहे; पण त्यापेक्षाही मी त्यांच्या ऋणात राहणे अधिक पसंत करीन. 
 परशराम आंबी
  वरणगे
गुढीपाडवा      शालिवाहन शके १९४४ प्रारंभ     
शनिवार दि. ०२/०४/२०२२                                        

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.