१२.चूक एकदाच होते---कथा

                         १२. *चूक एकदाच होते*
           सूर्योदय झाला. सखूच्या आनंदाला पारावर उरला नाही. कारण त्या दिवशी पौर्णिमा होती. तीही वटपोर्णिमा. सकाळपासून ती लगबगीने वावरत होती. एक वेगळाच उत्साह तिच्या चेहर्‍यावर झळकत होता. कामाच्या घाईत सूर्य केव्हा डोईवर आला हे तिला कळलंच नाही. शेजारच्या बायका वडाची पूजा करायला निघाल्या होत्या. सखूचं काम संपता संपेना. भांडीकुंडी, कपडे धुणे, जेवण करणे इत्यादी अशी एक भंकी दोन कामं! त्यात पौर्णिमा म्हटले की पोळ्या कराव्या बंद बळलागल्या. नवरा काहीतरी काम करायचा; पण आज त्याला सुट्टी नसल्यामुळे तो घरी नव्हता. त्याचं नाव सर्जेराव. बँकेत कर्मचारी म्हणून काम करीत होता. 
             सखूचं मन समुद्राच्या लाटांवर हेलकावणारी  सारखंच हेलकावत होतं. गल्लीतल्या सगळ्या बायका वडाची पूजा करून परत आल्या. 'माझं मलाच कळंना झालंया की पूजा करायला जावं की जाऊ नये. जायचं ठरवलं तर काम काही संपना. काम बाजूला ठेवून जायचं तर मन तयार होईना. जायचं तर....वडाजवळ काय मागायचं?.......'असा सवाल तिच्या मनात यापूर्वी कधी आलाच नाही. मग आत्ताच का असा विचार तिच्या मनात आला असावा? त्याचं असं झालं......... 
             सखू आणि सर्जेराव यांचं लग्न दहा वर्षांपूर्वी झालेलं. सुखाने संसार चाललेला होता. सरकारच्या नेमानं 'हम दो हमारे दो' हे तत्त्व अंमलात आणलं होतं. पहिली मुलगी झाली. तिचे नाव जया. ती सात वर्षाची झालेली. दुसरा मुलगा झाला.   त्याचं नाव जयदीप. तो चार वर्षात झालेला. अगदी आनंदात संसार नांदत होता. गावात सगळ्यांच्या तोंडात एकच नाव सखू आणि सर्जेराव. ती दोघं कधीच नवरा-बायको वाटायची नाहीत. ती बहीणभावासारखीच वागायची. त्यांचा 'छोटा संसार सुखी संसार'  होता. सर्जेरावला भाऊ किंवा बहीण नव्हती. तो
 एकटा जीव सदाशिव होता. लहानपणीच त्याची आई देवाघरी गेली होती. बाबानं हाल-अपेष्टा सहन करून त्याला थोडं फार शिकवलेलं होतं. त्यामुळे त्याला बँकेत नोकरी लागलेली होती. पण हे सुखाचे दिवस पाहायला त्याचे बाबा या जगात राहिले नाहीत. असा सोन्याचा संसार सुरू असताना कोणाची तरी दृष्ट लागली. काळ बदलला. अचानक तिच्या पोटात दुखू लागले. कोल्हापुरातल्या नामवंत डॉक्टरांना दाखवलं पण पोटात दुखणं काही थांबलं नाही. शेवटी डॉक्टरांनी ऑपरेशन करावयास सांगितले. कारण कॅन्सरसारख्या आजाराने तिला गाठलं होतं. सखूला चैन पडेना. जीव वरखाली होऊ लागला. सर्जेरावला ऑपरेशन करू नये असं वाटायचं. कारण पैशाचं काय करायचं? कुठून आणायचा इतका पैसा? आणि ऑपरेशन करायचं नाही तर बायकोला गमवावं लागेल. काय करावं हा प्रश्न त्याच्यासमोर नाचू लागला. त्याला काही सूचंना  झालं.   
         सखूच्या बाची परिस्थिती बरी होती. म्हणून त्यांनी सर्जेरावला समजावून सांगितले. सखूला माहेरी नेले. कराडच्या सरकारी दवाखान्यात नेऊन ऑपरेशन केलं. शस्त्रक्रिया यशस्वी झाली. कॅन्सरची गाठ काढून टाकण्यात आली. सखूचा जीव वाचला. जणू तिचा पुनर्जन्म झाला. तिला दवाखान्यातून माहेरी नेली. 
            ........ आणि इथंच तिचं नशीब फिरलं. सखूबरोबर मुलंही आजोळी गेली. सर्जेराव एकटाच घरी होता. सासरी जास्त दिवस राहणे त्याला पसंत नव्हतं. शनिवारी दुपारी तो सासरी जायचा आणि सोमवारी सकाळी परत कामावर हजर व्हायचा. येताना एक दिवसाचे जेवण घेऊन यायचा. त्यात सोमवारचा दिवस भागायचा. मात्र मंगळवारपासून शुक्रवार पर्यंतचा प्रश्न होता. नाहीतरी तो भात आमटी करून खायचा. भाकरीच काय? हा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. 
             त्याच्याशेजारीच मंजुळा राहत होती. तशी ती एकटी नव्हती. तिचा नवरा महिपतराव आणि दोन मुलंही घरात होती. महिपतराव शेतमजुरी करायचा. त्याची स्वतःची शेतजमीन; पण घरात एक गाय  आणि दोन म्हशी होत्या. मंजुळाने सर्जेरावची अडचण ओळखली होती. ती भाकरी करून देऊ लागली. भाकरी करून देताना एके दिवशी ती म्हणाली, "भाऊजी, भात आणि आमटी तरी कशाला करता? इथंच येऊन जेवत जावा की. आमचं घर परकं समजता का? घर तुमचंच समजा. सकाळी, संध्याकाळी जेवून जात जावा. अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत केली पायजे."
              सकाळी उठून सगळं आटोपून भात आमटी करण्यात खूप वेळ जात होता. तसेच संध्याकाळी बँकेतून घरी आल्यावर पुन्हा जेवण करण्यात वेळ जायचा. त्याने विचार केला ठीक झालं. तेवढाच वेळ वाचेल. जेवण करायला लागणारे सर्व साहित्य त्यांना देऊन टाकू. त्यानं पीठ, तांदूळ, बटाटा, वांगी असं साहित्य नेवून दिलं. 
            हळूहळू मंजुळा गुलाबासारखी फुलू लागली. तिला रोज ताजी ताजी भाजी मिळू लागली. ती आपल्या कामाला लागली. जेवण करून देता देता ती सर्जेरावच्या घरी जाऊ लागली. घर स्वच्छ करू लागली. कपडे धुऊन देऊ लागली. सर्जेरावला बरं वाटू लागलं. त्याला मोकळा वेळ मिळू लागला. पण मिळणारा मोकळा वेळ त्याला स्वस्थ बसू देईना. त्याच्या मनात वेगवेगळे विचार भरू लागले. कारण 'रिकामे मन सैतानाचे घर' असते. त्याची अवस्था बिकट झाली. जेवण, धुणं धुण्याची सोय झाली. पण भावनेचं काय? बायको माहेरी जाऊन महिना झाला होता. शारीरिक उपवास घडू लागला. विचार करून करून रात्री जागवू लागला. त्याचं मन नकळत मंजुळाकडं ओढ घेऊ लागलं. मंजुळा दिसायला एक नंबरात नसली; तरी ती बरी दिसत होती. अंगानं धष्टपुष्ट होती. घाटीव शरीराची. जणू एखाद्या साच्यातून काढलेली मूर्तीच. तो मंजुळाकडे आकर्षित होऊ लागला. पण तिला विचारायचं कसं?.....त्याचे धाडस होईना. काय करावं? त्याला सूचंना! विचारायचं पण कसं? आणि काय? नाही विचारावं तर मनाची घालमेल सुरू झालेली. मनाची आग पेटलेली. सर्व शरीर तापलेलं. एखाद्या विहिरीत पडला असता; तर विहिरीचं पाणी तापलं असतं. पण त्याचं शरीर थंड झालं नसतं. रात्रभर अंथरुणावर तळमळत पडायचा. ती येईल आणि दार वाजवंल असं त्याला सारखं वाटायचं. दाराला कडी न लावताच तो झोपायचा. 
            पाच सहा दिवस निघून गेले. असाच एक दिवस उजाडला. त्यादिवशी महिपतराव जनावरांसाठी वैरण आणायला गेला होता. खूप वेळ झाला, तरीही तो घरी आला नव्हता. सर्जेराव जेवायला मंजुळेच्या घरी गेला होता. तिनं ताट वाढून त्याच्या पुढ्यात दिलं. त्याचं लक्ष अन्नाकडे नव्हतं. कशाच्या तरी तंद्रीत होता. तो आढ्याकडे नजर लावून बसला होता. मंजुळानं विचारलं, "भाऊजी, कसला विचार करत आहेसा? बरंबिरं वाटत नाही का तुमास्नी?"
        "अं........" तो तंद्रीतून जागा झाला. 
        "मी इचारते तुम्हास्नी, बरं वाटत नाही का?" मंजुळा म्हणाली. 
      "काय सांगायचं वहिनी, कशातच लक्ष लागत नाही."
        "सखूची आठवण येते का?" 
       "होय. पण नुसती आठवण येऊन काय करायचं?"
        "मी असताना तुम्ही कशाला आठवण काढताय तिची? मी देतेय ना सगळं तुम्हाला!" अशा तिच्या बोलण्यावर तो तिच्याकडं अवाक् होऊन पाहू लागला. 
        "तसं नव्हं, जेवण खाणं वगैरे."
         "जेवणाचं झालं. पण,....."
          "पण काय?"
          "काही नाही."
          "काय वाटतंय ते बोलून दाखवावं माणसानं. असं अर्ध्यात राखून."
          "हूं......."
           "बोला की......"
          "रातच्याला......"
          "तसलं काई बोलू नका!"
          "बरं. मी जातो. वेळ खूप झालाय. बॅंक उघडायची आहे." असं म्हणून तो मंजुळाच्या घराबाहेर पडला. 
          मंजुळाचे मन हरखून गेलं. गुलाबाची कळी उमलावी, तशी ती उमलली होती. आपला डाव साधला जातोय असं तिला वाटू लागलं. जाळ्यात पक्षी आडकतोय याची तिला खात्री पटली. तिच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं.....'दोन-तीन गोळा सोनं मिळवायचं. त्या सोन्याचं गंठण करायचं. पगारदार मासा गळाला लागलाय. वस्तू घ्यायला हयगय करायची नाही.......' या स्वप्नात दिवस कसा निघून गेला हे तिला कळलंच नाही. रात्री सर्जेराव जेवायला आला. मंजुळानं जेवणासाठी खास बेत केला होता. तेल लावून चपात्या केलेल्या. बटाट्याची भाजी, सांडगं तळलेलं होतं. आणि सर्जेरावला आवडतात म्हणून कांद्याची छान छान भजी केली होती. भज्यांचा वास दरवळत होता. न राहून सर्जेरावनं विचारलं, "वहिनी आज झकास बेत आहे वाटतं?"
      "अहो भाऊजी, बायको गेली माहेरी काम करीत शेजारी. शेजारधर्म सांभाळला पायजे. अडचणीच्या वेळी एकमेकांना मदत केली पायजे."
       "अहो वहिनी, किती करतायसा तुम्ही माझ्यासाठी. म्हणून तर मी इथं राहिलोय. नाही तर दररोज चेकरा माराव्या लागल्या असत्या मला. खूप त्रास झाला असता मला."
       "म्हणून मी म्हणते की, शनिवारी तरी कशाला जाता गावी? ऱ्हावा की इथंच." मंजुळाने आग्रहानं विनंती केली.
       "पण बायकोला काय सांगायचं?"त्याने शंका उपस्थित केली. 
        "घर राखायला हवं. घर टाकून कसं येऊ? असं सांगायचं. जा-जा ये-ये फुकट. त्यापेक्षा एक आड एक आठवड्यानं जायचं सासुरवाडीला."
        "पण बायकोला पटायला पाहिजे नव्हं. ती काय म्हणेल?"
        "इतकं बायकोला भितायसा !"
         "तसं नव्हं!"
         "मग कसं?"
         "आपलं तिकडं गेलं की तिला आधार वाटतो. ऑपरेशन झाले तिचं. तिच्याजवळ असलेलं बरं. नाहीतरी तिथं जाऊन तरी मी काम काय करतोय? फुकटचं 'खायला खार आणि भुईला भार'......."
        "म्हणून मी म्हणते की, इथं राहिलं काय आणि तिथं राहिलं काय? फरक कसला पडतोय?" अशा गप्पांमध्ये जेवण संपलं आणि सर्जेराव घरी झोपायला गेला. 
        रविवार सुट्टीचा दिवस. सर्जेराव जरा वेळाने उठला. आंघोळीला आठ वाजले. अंघोळ करून आत आला. तोच मंजुळा हातात चहाचा कप घेऊन दारात दत्त म्हणून हजर झाली. तिने कप पुढे केला. त्याने हात पुढे केला. कपासह हात हातात आला तिचा त्याच्या. सर्वांगातून रोमांच उभे राहिले त्याच्या. कप तसाच टेबलावर ठेवला. त्याने तिला बाहुपाशात ओढून घेतली........... 
           बऱ्याच दिवसापासून सर्जराव सर्जेराव उपाशी होता. त्यांने उपवास सोडला. मंजुळा आपला डाव साधला होता. 'असेच प्रसंग वारंवार यावेत म्हणजे आपलं स्वप्न पूर्ण होईल'  याच विचारात थंड झालेला चहाचा कप घेऊन मंजुळा सर्जेराव च्या घरातून बाहेर पडली. 
       .....इकडे सखूच्या मनात पाल चुकचुकू लागली. कारण प्रत्येक शनिवारी येत असलेला आपला या शनिवारी कसा काय आला नाही. ती आपल्या आईला म्हणाली, "मला आता गेलं पाहिजे, आई."
       "असं का म्हणतेस गं?" आईने सखूला विचारलं. 
       "तसं नव्हं गं आई."
        "व्हय गं पोरी. पर अजून महिनासुदीक झाला नाही अजून ऑपरेशन होऊन. गडबड कशाला करतेस?"
         "माझ्या घरी मला गेलं पाहिजे. ते एकटंच आहेत तिकडं."
          "त्याला यायला सांगू या इकडं. राहिला असंल. काहीतरी काम निघालं असंल. तू काही मनात आणू नकोस. अगं पोरी, 'मन चिंती ते वैरी न चिंती.' काही काळजी करू नकोस. येईल पुढच्या शनिवारी तो. मनातून विचार काढून टाकण्यासाठी तिचा बाबा तिला म्हणाला. 
          "तरीही सखू ऐकायला तयार होईना. ती आपला हेका सोडायला तयार होईना. शेवटी बाबा तिला घेऊन बुधवारी घरी आले. आपल्याबरोबर त्यांनी आपल्या लहान मुलीला आणले होते. तिचं नाव सारजा. आठवीच्या वर्गात शिकत होती. ती किमान आमटी-भात तरी करून घालीन, असा बाबाने विचार केला होता. सायंकाळी पाचच्या गाडीने ते परत आपल्या गावी गेले. 
           सखू परत आलेली पाहून मंजुळाच्या अंगाचा तिळपापड झाला. ही परत कशाला आली 'अवदसा'. तिच्या मनात जळफळाट सुरू झाला होता. तिला वाटत होते की अजून दोन महिने तरी सखू परत येणार नाही. तोपर्यंत आपणाला आपलं स्वप्न साकार करता आलं असतं. काय म्हणून ही रांड परत आली. माझ्या स्वप्नाचा चक्काचूर झाला. माणूस ठरवतो एक आणि घडतं बॅक. यालाच जीवन असं म्हणतात का?  एखाद्या माणसानं जीवनात काही इच्छा, आकांक्षा बाळगायच्या की नाहीत? त्या पूर्ण व्हायची वेळ आली होती. पण ही 'बया' मध्येच उपटली. इच्छा अशा संसारागत जाळून टाकायच्या का? माहेर होतं गरीब आणि सासरही मिळालं गरीबच. सारा जनमच गेला गरिबीत. आता कुठं चार दिवस सोन्याचं दिसत होतं. तोवर आली ही बया बिब्बं घालायला. या विचारानं ती रात्रभर अंथरुणावर तळमळत पडत होती. 
         अनपेक्षित आलेली सखू पाहून सर्जेरावसुद्धा गोंधळून गेला. नाकासमोर चालणारा तो 'कुणाच्या अध्यात ना मध्यात' पडत नव्हता. घडून गेलेल्या घटनेबाबत काय करावं त्याला काही सुचंना. 'बायकोला सांगावं की नको? तिचा विश्वास बसेल? की ती जीवाचं काही बरं वाईट करून घेईल? मला समजावून घेईल की न माझी नफरत करेल? दोन मुलासह संसाराची काय वाताहत होईल? काय करावं त्याचं त्यालाच कळंना त्याच्या जीवाची घालमेल होऊ लागली. त्यातच पाच दिवस निघून गेले. घरात आले की घर खायला उठायचं. तो प्रसंग जसाच्या तसा त्याच्या डोळ्यासमोर उभा राहायचा. बँकेत गेले की कामात लक्ष लागायचं नाही. पाणी भरायला गेला की चावी तशीच सुरू राहायची. फाईल आणायला गेला की रिकामा परत यायचा. काहीच लक्षात राहायचं नाही त्याच्या. साहेब त्याच्यावर रागवायचे. ते म्हणायचे, "सर्जेराव, लक्ष कुठे आहे तुझं? नीट लक्ष घाल कामात. बायको घरी नाही म्हणून आठवण येते का तिची?"
          बँकेतील सर्वजण त्याला खुळ्यात काढत होती. त्याचं चित्त थाऱ्यावर नव्हतं. घरी सखूशी तो नीट बोलत नव्हता. तिला टाळण्याचा तो प्रयत्न करायचा. पळून पळून किती पळणार होता तो. त्याचं वागणं सखूच्या लक्षात येऊ लागलं. तिने त्याला पानसून पानसून विचारलं. "अहो, असं का वागताय माझ्याशी? मी परत आलेली आवडलेली नाही का तुम्हाला? बँकेत कोणाशी काही बिनसले का तुमचं?" 
        सखू, सखू माझं चुकलं गं. माफ कर मला. माझ्या हातून अक्षम्य असा गुन्हा घडला आहे." असं म्हणून त्यानं बायकोच्या पायावर डोकं ठेवलं.  तो म्हणाला, "मला माफ केल्याशिवाय पाय सोडणार नाही तुझं!"
        "असं काय करताय? पाय सोडा आधी माझं. नवरा कधी पाय धरतो का बायकोचं? सोडा पाय आधी."
        "मला माफ करणार असशील तरच पाय सोडणार तुझं." त्यानं सांगितलं. 
       "बरं बाबा, केलं माफ. पण गुन्हा काय घडला आहे माझ्या राजाचा, ते तरी कळू दे आधी."
        "खरंच! माफ केलंस मला."
        "हो केलं."
        "कसं सांगू? आणि काय सांगू? हे कळंना झालंया मला."
        "आहो, सांगितल्याशिवाय तरी कसं कळणार? काय असेल ते स्पष्ट सांगा?"  तिला वाटलं होतं की बँकेतली किंवा घरातली एखादी वस्तू हरवली असेल. 
          "ऊं....."तो अडकळला. 
           "बोला की --"
           "माझा फक्त एकदाच मंजुळाशी संबंध आला.
           "काय?........" असं किंचाळून ती खाली कोसळली. 
         आठवडाभर झाला तरी तिच्या मनातून हा विचार जाईना. वेड लागायची वेळ आली होती. मन मोकळं करायचं तर कोणाजवळ? या काय बोलायच्या गोष्टी आहेत कुणाला? आतल्या आत विचाराने ती खंगू लागली होती. 
         काही दिवसांनी तिचे आई-बाबा आले. आईने विचारलं, "अशी का गं ठकलीस? ऑपरेशन केल्यावर तू बरी होतीस. तुझी तब्येत चांगली झाली होती. पण आता तुझी तब्बेत बिघडली आहे. दवाखान्यात दाखवलं की नाहीस?" आई विचारत होती. 
         "काही नाही गं आई. घागर उचलल्यामुळं टाकं जरा सुजलंत. मला भूकच लागत नाही बघ."
         "तरी मी तुला सांगत होते की, आणखी दोन महिने तरी आमच्या घरी राहा. इकडं येऊ नकोस; पण आमचं ऐकलं नाहीस. तू आलीसच. आता चल आमच्याबरोबर. चांगली झालीस की मग ये परत." आई आग्रहानं सांगत होती. सखूनं साफ नकार दिला. आई-बाबा निघून गेले.
         हळूहळू सखू सावरली. तिला संसाराची काळजी वाटत होती. मुलांना शिकवायचं होतं. मोठं करायचं होतं. शिवाय नवऱ्याला धीर द्यायचा होता. 'वेळीच एक टाका घातला तर बाकीचे नऊ टाके वाचतील.' असा तिनं मनाशी निश्चय केला. नवऱ्याचा स्वभाव तिला माहीत होता. नकळत एखादी चूक झाली असेल. आपण ती किती दिवस उघळत बसायची. त्यामुळे स्वतःला त्रास होतो. दुसऱ्यांना त्रास होतो. आणि संसाराचेही वाटोळे होते. त्यापेक्षा आपण समजूतदारपणा दाखवून घर वाचवूया. असा विचार सखूनं केला. संध्याकाळी जेवताना तिनेच विषय काढला----
     "अहो, माणूस म्हटला की त्याच्या हातून चूक होतीया.  इतकं मनाला लावून घेऊ नका. हे बघा, मी सारं विसरून गेलीया. तुम्हीपण सारं विसरून जावा."
      "कसं विसरून जाऊ मी? माझं मनच खातंय."
      "सगळं काढून टाका मनातून. काहीच घडलं नाही असं समजा. अपघात होता तो, असं समजायचं. अपघातातून सावरतो ना आपण. तसच सावरायचं यातून."
     "हो. किती मोठ्या मनाची गं तू!"
     "पुरे हं कौतुक आता. मुलासाठी जगलं पाहिजे आपणाला. माणसाच्या हातून चूक होते. चुकत नाही तो माणूस कसला?" 
    "खरंच! खरंच माफ केलंस तू मला?"
     "पूर्णपणे. पण लक्षात ठेवा की, चूक एकदाच होते. पुन्हा घडते ती चूक नसते."
      "धन्य तुझी आई-वडील की ज्यांनी तुला जन्म दिला. आणि तुझ्यावर इतके चांगले संस्कार केलेत. आणि एक बोलू
आता.....?"
      "आणखी काय बोलता?"
      "आणि धन्य मी, की तुझ्यासारखी बायको मिळाली मला.
छे! छे! बायको नव्हेस तू ....तू तर माझी माताच आहेस....... "
       कितीतरी दिवसानंतर सर्जेराव मनसोक्त जेवत होता.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.