पिंपळपान काव्यसंग्रह अनिता दिलीप कुमार कांबळे

                  रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन. यानिमित्ताने माझ्या वाचनात कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांचा ललित पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेला काव्यसंग्रह वाचनात आला. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला हा काव्यसंग्रह आहे. 
              खरं म्हणजे मनोगतात कवयित्रीनी 'कविता करणं' ही स्वप्नवत असणारी गोष्ट आहे असे नमूद केले आहे. कारण त्या विज्ञान आणि गणित या विषयाच्या अभ्यासक आणि विषय शिक्षिका आहेत. सन २०१९ आणि २०२० ही दोन वर्षे कोरोना महामारीने पर्यायाने लॉकडाऊनच्या छायेखाली होती. अनेक दृष्टीने हा कालावधी, शाप वाटत असला, तरी मिळालेल्या संधीचा ज्यांनी फायदा करून घेतला. त्यांना हा कालावधी वरदानच ठरलेला आहे. लॉकडाऊनचा हा काळ कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांनी सदुपयोग करून घेतला असे मला वाटते. या लाॅकडाऊनच्या काळात 'पिंपळपान' हा काव्यसंग्रह आकारास आला. 
           साहित्य लेखन करत असताना तुम्ही गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी किंवा कोणत्या विषयाच्या अभ्यासक आहात हे  महत्त्वाचे ठरत नाही, तर आपण जे अनुभवलं, साहिलं, पाहिलं आणि वाचलेलं असतं. ते कुठेतरी आपल्या मनामध्ये खदखद करत असतं. मन अस्वस्थ होतं. ते शब्दांच्या माध्यमातून कागदावरती येत असतं. मुळात कवयित्रीच्या घरी याचा वसा आणि वारसा होता. तो त्यांच्या वडिलांच्या संस्कारातून. तसेच त्यांना त्याचे पती, त्यांचे नातलग यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले होते असे मला वाटते. त्यांच्या विचारांतून पुरोगामी, विज्ञानवादी आणि विवेकवादी विचारांचा प्रभाव दिसून येतो. तसेच गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पडलेला प्रभावसुद्धा त्यांच्या कवितेतून आपणाला पाहायला मिळतो. सत्य, समता, बंधुता, समाजवाद या मूल्यांची पेरणी त्यांच्या साहित्यात आपणाला पाहायला मिळते. 
            बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून सापडलेला विचार गौतमांनी लोकांपर्यंत पोहोचवले. तेच विचार कवयित्रीने आपल्या पिंपळपान कवितेत मांडलेले आहेत. सिद्धार्थ यांच्या पदस्पर्शाने ही धरणी पवित्र झाली असे कवयित्री म्हणते. 'महात्मा' कवितेत महात्मा फुलेंचे मोठेपण वर्णन करताना कवयित्री म्हणतात, "जे मारेकरी ज्योतिबाचा जीव घेण्यासाठी आले. त्यांनाच शिक्षणाचे दान यांनी दिलेले आहे."  कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हाच विचार त्यांनी 'राजर्षी शाहू महाराज' या कवितेत मांडून 'गाव तेथे शाळा, गाव तेथे ग्रंथालय' हा विचार या कवितेतून सांगितला आहे. छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचं वर्णन 'कुळवाडीभूषण' या कवितेत केलेले आहे. अशा अनेक कवितेतून सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या नाम शीर्षकावरून त्यांच्या कार्याची महती कवितेतून मांडलेली आहे. प्रथा, देवदासी, लोकसंस्कृतीचे उपासक, परंपरेची गुलामी यासारख्या कवितेतून जाती, धर्म, रूढी, परंपरा याच्यावर कडाडून टीका केली आहे. जात, धर्म याच्या पलीकडे मानवता हीच श्रेष्ठ आहे, हे कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 'संविधान' या कवितेत कवयित्रींनी डॉ. आंबेडकरांनी दिलेली मूलभूत कर्तव्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये, स्त्री-पुरुष समानता, उच्च नीचतेची भिंत नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संविधान आणि इतिहास बदलला असे सांगितलेला आहे. पोस्टकार्ड, कागद, आई, जोडीदार, छत्री, मुसळधार पाऊस, शाळा अशा वेगळ्या विषयाच्या कविताही मोठ्या ताकतीने रेखाटण्याचा कवयित्रींचा प्रयत्न स्तुत्य आहे. 
हा काव्यसंग्रह माझे मित्र उत्तम नलवडे यांचेकडून प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. 
                  त्यांच्या पहिल्या पिंपळपान या काव्यसंग्रहासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा. 
परशराम आंबी 
(कोषाध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर) 
(उपाध्यक्ष,  अ. भा. शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच, कोल्हापूर शाखा) 
वरणगे पाडळी
ता. करवीर
जि. कोल्हापूर

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.