आत्माराम - नाट्यछटा - ११

            नाट्यछटा ---
           'आमुचा रामराम घ्यावा'
नमस्कार मंडळी. कसे आहात? बरे आहात ना? बरे असायलाच पाहिजे. अहो, इकडे तिकडे काय बघताय? मी तुमचा आत्माराम बोलतोय. होय मी आत्मारामच आहे. अहो, तुमच्यासमोर असलेल्या फोटोतील आत्माराम बोलतोय. अहो राम तर कधीचा गेला. मी फक्त त्याचा आत्मा बोलतोय. काय म्हणताय? तुमचा विश्वास बसत नाही. कसा बसणार? फोटोतील व्यक्ती कधी बोलते का? नाही ना! अहो सही रे सहीवाला भरत जाधव यांच्या 'श्रीमंत दामोदर पंत' या चित्रपटामधील फोटोतील माणसं बोलतात ना!  हे तुम्ही पाहिलेच आहे ना! काय म्हणताय? हा चित्रपट आहे! चित्रपटात तसं काहीबी चालतंय! अहो, तसाच मीसुद्धा आज तुमच्याशी बोलतोय. हे मात्र चित्रपट किंवा नाटक समजू नका बरं का? खरंच मी या फोटोतील आत्मारामचा आत्मा बोलतोय. अहो मंडळी, आज तुम्ही माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने येथे जमलेला आहात ना! होय रं माझ्या लेकरा. आज बरोबर एक वर्ष झालं मला जाऊन. म्हणूनच तुम्ही या ठिकाणी जमलेला आहात. माझ्या आठवणी जागृत करण्यासाठी. हां बरोबर आहे. माझ्या वर्षश्रद्धाच्या निमित्ताने भोजन करण्यासाठीही आलेले आहात ना? बरोबर आहे ना माझं? पण खरं सांगा की यामध्ये किती जणांना माझ्या विषयीचा तळमळा आहे? खरंच माझ्यावर जिवापाड प्रेम करणारे किती जण आहात? माझ्या पत्नीला बरं वाटावं म्हणून काहीजण आलेले आहात. माझ्या मुलाला बरं वाटावं म्हणून काहीजण आलेले आहात. बरोबर आहे ना मंडळी! काहीजण जेवायसाठी आलेली आहात. तर काहीजण या निमित्ताने एकमेकांची भेट होतीया म्हणून आलेली आहात. कुणी मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी काही जमतंय का पाहण्यासाठी आलेली आहेत? मात्र खरं सांगायचं म्हणजे माझ्यामुळे झालेल्या  दु:खानं कोण आलं आहे हे शोधणे कठीणच आहे! 
       अहो मंडळी, तुम्ही माझ्या पत्नीच्या डोळ्यात पहा. खरं दुःख म्हणजे काय असतंय हे तिच्या डोळ्यात पाहिल्यावरच तुम्हांला कळेल. कारण तिच्या आयुष्याचा जोडीदार तिला सोडून गेलेला आहे. एक वर्षभर ती माझ्या आठवणीशिवाय राहू शकली नाही. दररोज सकाळी आणि संध्याकाळी माझ्या फोटोला नमस्कार केल्याशिवाय, नैवेद्य दाखवल्याशिवाय तोंडात पाण्याचा थेंबसुद्धा घेत नाही. आणि बरं का? हा माझा मुलगा सर्व काही करत आहे. माझ्या स्मृतीच्या निमित्ताने गोड गोड जेवणाचा बेत त्यानं ठेवलेला आहे. पुरी बासुंदीचं झकास जेवण केलेलं आहे. दूर गावावरून माझी मुलगी आलेली आहे. माझ्या कार्याच्या आठवणी आपणांस आता येणार आहेत. आपल्यातील काहीजण दोन शब्द व्यक्त करणार आहात. पण मी तुम्हांला सांगू का? हे सारं जग नश्वर आहे. माणसाच्या आयुष्याबरोबर काय येतं? सांगा ना? तर त्यानं केलेलं कार्य, त्यानं जोडलेल्या माणसांच्या भावना. पण तेही फारसं खरं नाही असं मला वाटतं. मी माझ्या आयुष्यात खूप कार्य केलं. माणसं जोडून गावात,  तालुका पातळीवर,  जिल्हा पातळीवर, राज्यपातळीवर अनेक संघटना उभ्या केल्या. अनेक माणसं जोडली; पण जेव्हा माझा देहान्त झाला. त्यावेळी त्यातील किती  माणसं हजर होती? किती माणसांनी माझी आठवण काढली असेल? आणि किती जण माझ्या अंत्यविधीसाठी आले असतील? अहो, हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं हजर होती. होय बाळ, तू म्हणतोस ते बरोबर आहे. कोरोनाच्या भीतीनं माणसं आली नसतील. अरे पण रक्षाविसर्जनाला किती माणसं उपस्थित होती? तीही अवघी विसेक माणसंच हजर होती. पण त्यातील किती माणसं भावनाशील होती? माझ्याबाबत आदर होता. जी माणसं आली होती. कुणी आलं होतं ते आपल्या मुलग्याचं किंवा मुलगीचं कुठं लग्न जमतं का? त्याचा धागादोरा मिळेल का? यासाठी कोणी आलं होतं. तर कुणी आलं होतं की, मी नाही गेलो तर दुसरे लोक काय म्हणतील? म्हणून ती माणसं आलेली होती. 'मरावे परी कीर्तीरुपी उरावे' असं संत रामदासांनी म्हटलं आहे. मी माझी कीर्ती मागे ठेवली, पण त्याची किती जणांनी आठवण ठेवली आहे? खरंच आजचं जग इतकं बदललं आहे, की ते भावनाशून्य झालेलं आहे. कोणीतरी सांगितलं आहे की  नातेवाईक, मित्रमंडळी ही स्मशानभूमीपर्यंत येतात. तर पत्नी ही दारापर्यंत येते. पण तिलाच खरं दु:ख झालेलं आहे. बरं मला आता गेलं पाहिजे. खूपच वेळ झाला आहे. नमस्कार येतो आता. तुमचं आपलं चालू द्या नेहमीप्रमाणे. मला निरोप द्या आता. 'आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा रामराम घ्यावा. 
लेखन :- परशराम आंबी 

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.