रोटरी पुरस्कार २०२१

रोटरी क्‍लब ऑफ कोल्हापूर, सनराईज यांच्यामार्फत २०२०-२०२१चा 'नेशन बिल्डर ॲवार्ड' हा पुरस्कार बालसाहित्यिक व आदर्श शिक्षक परशराम रामा आंबी यांना प्रदान करण्यात आला आहे. यानिमित्ताने आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ता म्हणून व्यासंगी, विनम्र, शांत आणि मनमिळावू व्यक्तिमत्व म्हणजे परशराम आंबी. 
           पंचगंगेच्या संगमावर वसलेले वरणगे हे त्यांचे जन्मस्थळ. त्यांचा पारंपरिक व्यवसाय म्हणजे नाव चालवणे. त्यावरूनच त्यांचे आडनाव पडले 'आंबी.' पूल नसताना वरणगे, पाडळी, निटवडे, यवलूज, पडळ या गावातील लोकांना कोल्हापूरला जाण्यासाठी नावेशिवाय पर्याय नव्हता. वाहतुकीसाठी पूर्वी याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. आता पूल झाल्याने नावेचा व्यवसाय बंद पडला.  
             उदरनिर्वाहासाठी शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या आईचे निधन झाले. १९७५ मध्ये 'काकासाहेब जाधव' या शिक्षकांच्या प्रेरणेमुळे ते शाळेत जावू लागले. त्यांची बुद्धिमत्ता पाहून काकासाहेब जाधव यांनी त्यांना चौथी स्कॉलरशिप परीक्षेला बसवले. स्वतः त्यांनी लागणारी पुस्तके, वह्या परशरामला दिल्या.  त्यांच्या प्रेरणेमुळे आणि परशराम यांच्या जिद्द, चिकाटीमुळे ते स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत कोल्हापूर जिल्ह्यात एकविसावे आणि करवीर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने  उत्तीर्ण झाले. सन १९७८-७९ मध्ये स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत येणारे गावातील ते पहिलेच विद्यार्थी ठरले. परशरामसहित  शिवाजी जाधव, संजय कांबळे, मिलींद कांबळे यांचाही तालुका स्तरावर स्काॅलरशिप परीक्षेत क्रमांक आले होते. 
        काकासाहेब जाधव यांनी परशराम यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेची शाळा 'राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन या शाळेत प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दाखल केले. विद्यानिकेतनमध्ये असतानाही ते इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता यादीत आले होते. 
             परशराम आंबी यांनी आपल्या गुरूंचा आदर्श घेऊन महावीर कॉलेजमधून बी.ए.बी.एड. (संयुक्त) परीक्षा जून १९९२ मध्ये उत्तीर्ण झाले. बी.ए.बी.एड.चा निकाल लागण्यापूर्वीच ते नवनाथ हायस्कूल पोहाळे तर्फ आळते तालुका पन्हाळा या शाळेत सहाय्यक शिक्षक म्हणून कार्यरत झाले. १९९४मध्ये मराठी विषयामध्ये एम.ए. केले. २००४-२००५ मध्ये संस्कृत विषयामध्ये एम. ए. केले. त्यांनी आपल्या शाळेत मा. मुख्याध्यापक निकाडेसर  यांच्या मार्गदर्शनातून आणि सहकार्यातून अनेक नवनवीन उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये वाचन वृद्धीसाठी 'नित्य वाचन' हा उपक्रम सुरू केलेला आहे. प्रत्येक वर्षी १ जानेवारीपासून एका नवीन पुस्तकाचे वाचन केले जाते. त्या पुस्तकावर मुलांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेतल्या जातात. आतापर्यंत डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे 'अग्निपंख',  डाॅ. नरेंद्र जाधव यांचे आम्ही आणि आमचा बाप', ज्ञानेश्वर मुळे लिखित 'माती ,पंख आणि आकाश', नसीमा हुरजूक लिखित 'चाकाची खुर्ची', तन्वी डोके लिखित 'मे आय कम इन...' अशा पुस्तकांचे वाचन शाळेत झाले आहे.
मुलांतील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रत्येक वर्षी भित्तीपत्रक आणि हस्तलिखित चालवतात. त्यातूनच त्यांनी मुलांनाही लिहिते केले आहे. 'कर्तव्य' हा त्यांचा पहिला एकांकिका संग्रह प्रकाशित झाला. 'परिवर्तन', 'भाकरी', 'जिद्द', 'रक्षण करू या पर्यावरणाचे', 'कन्या वाचू या' अशा मुलांच्याच भावविश्वातील आणि मुलांना आवडतील अशा एकांकिकांचे लेखन केले. त्याचे प्रत्येक वर्षी मुलांच्याकडून सादरीकरण करून कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघामार्फत होणाऱ्या स्पर्धेत प्रत्येक वर्षी त्यांच्या एकांकिकाना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे बक्षीस मिळालेले आहे. त्यांची वेगळी खासियत म्हणजे त्यानी दुर्मिळ अशा नाट्यछटांचे लेखन केले आहे. दिवाकरानंतर 'नाट्यछटा' हा लेखन प्रकार हाताळणारे लेखक अपवादानेच  आढळतात. परशराम यांनी 'आमच्या वेळेला असं काही नव्हतं' 'जयहिंद' 'सावित्री' अशा संस्कारक्षम व बक्षीसपात्र नाट्यछटांचे लेखन केले.  त्याचे 'यशस्वी नाट्यछटा' या नावाने पुस्तक प्रकाशित केले आहे. 'सपान', 'दीपलक्ष्मी' 'राजकन्या चंद्रमुखी', 'भाकरी' 'विजय' अशा अनेक संस्कारक्षम बालकथांचे लेखन करून सादरीकरण केले आहे. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर यांच्यामार्फत अनेक शाळांतून विविध उपक्रम राबवले आहेत.
       शैक्षणिक, साहित्यिक कार्याबरोबर त्यांना सामाजिक कार्याचीही आवड दिसून येते. त्यांनी 'ज्ञानमाऊली सार्वजनिक वाचनालय पाडळी बुद्रुक' याची स्थापना केली. त्यामार्फत 'प्रयाग साहित्य संमेलने' आयोजित केली. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून श्याम कुरळेसर, चंद्रकुमार नलगेसर, रा. तु. भगतसर  अशामान्यवर साहित्यिकांनी आपले योगदान दिले आहे. वाचनालयामार्फत   'चंद्रकुमार नलगेसर' यांची 'पुस्तकतुला' केली. सर्व पुस्तके वाचनालयास भेट दिली. यासाठी वाचनालयाचे अध्यक्ष उत्तम नलवडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
       'महाराष्ट्र राज्य आंबी नावाडी संघटना' या  राज्य संघटनेवर ते सन २००३ पासून संचालक म्हणून काम करत आहेत. मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर या संस्थेशी त्यांचा घनिष्ठ ऋणानुबंध आहे. या संस्थेचे  'कोषाध्यक्ष' म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांचे उत्तम काम पाहूनच त्याला २०१४ सालचा बालकुमार साहित्य सभेचा 'सेवा गौरव' पुरस्कार देण्यात आला. त्यांनी ग्रामीण भागातील अनेक शाळांमधून लेखन शिबिरे आयोजित केली आहेत. लेखन स्पर्धेच्या माध्यमातून अनेक शाळापर्यंत मराठी बालकुमार साहित्य सभा पोचवली. बाल साहित्य संमेलनातून कविता वाचन, कथाकथन कार्यक्रम सादर केलेत.  
           अशा  शैक्षणिक, साहित्यिक, सामाजिक कार्यामुळे त्यांना पुढील पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 
१) सन २०१४ मध्ये स्वातंत्र्य सैनिक एल. वाय. पाटील ट्रस्ट हुपरीचा 'आदर्श शिक्षक' पुरस्कार. 
२) सन २०१५ मध्ये बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर मार्फत 'साहित्य सेवा गौरव' पुरस्कार.  
 ३) सन २०१६-१७ मध्ये चंद्रकुमार नलगे वाचनालय उजळाईवाडीचा उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार 'यशस्वी नाट्यछटा' पुस्तकास. 
४) सन २०१८ मध्ये कोल्हापूर जिल्हा मराठी अध्यापक संघ आयोजित 'प्रेरणा' पुरस्कार. 
           अशा हरहुन्नरी शिक्षक परशराम आंबी यांना पुढील शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक कार्यास मनापासून हार्दिक शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.