*अस्सल ग्रामीण बाजाचा कथासंग्रह----दावं* 

         नुकताच सौ. शरयू शेंडगे या ग्रामीण लेखिकेचा पहिलाच 'दावं' हा कथासंग्रह  माझ्या  वाचनात आला. 79 पानी हात छोटासाच कथासंग्रह असून यात एकूण आठ कथा समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.                                                   यातील पहिली कथा ' *चैत्र* ' यातील लखन्या हा काहीतरी मिळवण्यासाठी मुंबईला गेला, पण मुंबईनंच त्याला मिळवला. दिवसभर काम करायचा आणि रात्रभर दारूच्या नशेत पडायचा. लग्न केलं , पण संसाराचा गाडा बायकोच चालवायची. याला संसाराचं काही सोयरसुतक नाही. गावाकडं त्याची आई रायना. तिनं दोन मुलींची लग्न करून सासरी पाठवली होती.एकुलता एक लखन्या हा वारसाचा धनी. तो परत येईल या आशेवर असलेली आई , पण लखन्या काही गावाकडे यायचं नावच काढत नाही. यावर्षी चैत्र यात्रेला घरी यायचं त्यानं कबूल केलं . यात्रेच्या दिवशीच तो आला. यात्रेचा सर्व खर्च करण्याचं त्यानं सांगितलं होतं. आई-बहिणी त्याच्या येण्याकडे  डोळे लावून बसलेले होते.  येताना त्यांने आई बहिणीला साड्या आणल्या , पण त्या जुन्याच . सगळी यात्रेत गेले , तेव्हा लखन्या घरातच राहिलेला होता . नंतर उठून घरातील सामान घेऊन त्याने विकले आणि दारू पिऊन यात्रेमध्ये आला . भाच्याला पैसे दिले . आईला सारा प्रकार कळला आणि तिने ओळखलं की हे पैसे कसे आले असतील. ती   पळतच घरात गेली.                                                                    दुसरी कथा ' *दौलूतात्या' .* हे त्याचं व्यक्तीचित्र आहे . त्याचं चित्रण सुंदर केलं आहे . काळाकुट्ट गडी , उंची असणारा.कुळवाच्या दांड्या सारखे त्याचे लांब व बारीक पाय . लांबचलांब कामट्यासारखा हात , पांढऱ्या पिळदार मिशा , तीन बटनाचा पांढराखंड पायापर्यंत सदरा,  दुटांगी धोतर आणि डोक्यावर लालभडक फटका असा हा इरसाल गडी. स्वतःचे काम स्वतः करणारा पण त्याला समोरून बाई गेली की काहीतरी पांचट बोलण्याची सवय. कोणी भांडायला आलं की शब्द फिरवायचा . तो खळं मागायला शेजारच्या गावात गेला . रात्रीच्या शेवटच्या बसने घरी येत होता . गर्दी खूप झालेली , बसायला जागा नाही. एक व्यक्ती आली त्याला बसायला जागा दिली . त्याला त्याचा राग आला . मंगळवारी बाजारातून परत येताना गर्दीत कंडक्टरचा धक्का लागला . कंडक्टर तिकीट घ्या म्हणाला.  कुणाचे ?म्हणाला . आमदार की खासदाराचे ? त्याला काही वाटेल तो बोलू लागला . कंडक्टरने माणसांना खाली उतरवलं . त्याला खाली ठेवला आणि बस चालू केली . त्या रात्री चालत घराकडे येऊ लागला. दारूच्या नशेत गावाच्या स्मशान जवळ आला . तिथेच  झोपला तो कायमचाच.                                                          तिसरी कथा आहे ती ' *दावं.'* ही शीर्षक कथा. सनक्या या मुलाचं त्याच्या घरातील  गाईवर खूप जीव. हरणी ही सर्व जनावरांची लीडर होती. एकदा तिने आजोबाचं धोतर तोंडात धरून ओढत विहिरीपर्यंत आणलं. त्या विहिरीत गाभण म्हैस पडली होती. तेव्हा आजोबा व संनक्यानं म्हैशीला वाचवलं. वर काढले होते,  हरणी आजारी होती. तिला दवाखान्यात न्यायचं होतं. घरात पैसे नव्हतं. तेव्हा सनक्या खूप विचारात पडला होता. त्याला त्याच्या शिक्षकाने दोनशे रुपये दिले. आणि हरणीला दवाखान्यात न्यायला सांगितलं. अशा प्रकारे प्राण्यावरती जीव असणारी ही कथा आहे.                                                चौथी कथा ' *झाडाखालची शाळा'.* ही कथा देवदासीच्या मुलीची आहे.   ती मुलगी झाडाच्या आडोशाला थांबून गुरुजी शिकवत असलेले ऐकत होती.  तिला शाळेत यायला आवडत होते , पण ती जोगतीणीची मुलगी असल्यामुळे तिला शाळेत घालायला समाजाचा विरोध.  परंतु शिक्षकाने परिवर्तन केल्यानंतर फुला शाळेत येऊन शिकू लागली.  लोकांनी शिक्षकाशी मारामारी  केली. त्यामध्ये शिक्षक बेशुद्ध होऊन पडले.  कमळाला बातमी कळल्यानंतर तिनं सगळ्या गावकऱ्यांना अडवलं आणि शिक्षकांचे प्राण वाचवले.                                                                पाचवी कथा ' *नाटक पहिलं आणि शेवटचं '* गावातल्या हौशी लोकांना नाटक बसवायची हौस. यासाठी सगळ्या प्रकारचे प्रयत्न करून ते नाटक बसवतात. त्या नाटकांमध्ये एक स्त्री पात्र आहे ते करण्यासाठी शहर गावावरून एक नटी आणतात.  नाटक सुरु झालेलं . रंगात आलेलं असते. त्याच वेळेला त्यामध्ये असणारा म्हादू.  त्यांनं सर्व व्यवस्था केलेली असते. नाटक रंगात येते , त्यावेळेला तेथे त्याचा बा येतो. पोरानं बाईचा हात धरलेला पाहून  बाबा स्टेजवर येऊन नाम्याला बडबडू लागला आणि साऱ्या नाटकाचा बट्याबोळ झाला. नाटक बंद पडलं. दुकानदाराची उधारी,  सजावट , रिक्षाचं भाडं , मेकअप याचा पाच हजार खर्च पोरांच्या अंगावर बसला.                                                      सहावी कथा ' *वाळवी* .'  या कथेतील जयवंताला खूप शिकून  शिक्षक व्हायची इच्छा आहे.  पण  दुष्काळानं सारं चित्र नष्ट झालं. फी भरणं कठीण झाले होते. तरी तो बी.एड. झाला .  त्याला शिक्षकाची नोकरी आली होती , पण संस्थापकाने नोकरीसाठी पैसे भरायला सांगितले.  तेवढे पैसे त्याच्याकडे नव्हते काही जोडणी करून पैसे भरून नोकरी करायचीच असं त्याने ठरवलं. पैसे जमा झाले नाहीत. नोकरी गेली. तो खुळ्यागत करू लागला. आप्पानं हाय खाल्ली. तो मरण पावला .  आप्पा गेला आणि दुष्काळ संपला .  घर पडू लागलं . घर पडताना वाशातून नोटा पडू लागल्या , पण नोटांना वाळवी लागली होती आणि जयंताच्या स्वप्नांना वाळवीनं मातीमोल केलं होतं .                                                         सातवी कथा *'एक घाव '* याकथेत गावातील राजकारण व राजकारणातून होणारी भांडण याचं वर्णन लेखिकेनं केलेलं आहे . राजकारणात कोणकोणते खेळ खेळले जातात  , त्याचं वर्णन या कथेत आलेलं आहे. चांगलं काम करणाऱ्याला सुद्धा राजकारणी लोकं काम करू देत नाहीत. हेच या कथेत दाखवलेलं आहे.       या कथासंग्रहातील शेवटची।                              आठवी कथा ' *डांगर भाकरी'* आहे याकथेत ग्रामीण भागात रोजगार करणाऱ्या स्त्रियांच्यावरती कशी वेळ येते त्याचं वर्णन केलेलं आहे . काम नसतं तेव्हा कुर्डूची भाजी , घोळीची भाजी खाऊन दिवस काढावे लागतात.  काही वेळेला नाचण्याची भाकर आणि डांगर खाऊन  दिवस काढावे लागतात . अशीच परिस्थिती शांतावर आली होती . गावातून फिरली ,  पण कुणीच काही दिलं नाही. तेव्हा तिच्या चुलत सासऱ्यांननं माणसांसाठी आणलेले जेवण तिला दिलेलं होतं . त्या डांगर भाकरीवरती शांतानं आपल्या मुलाची भूक भागवलेली आहे.                                                      सुंदर  व वाचनीय असा ग्रामीण भाषेतील हा कथासंग्रह आहे.  वाचताना ग्रामीण भागातील चित्र आपल्या नजरेपुढे उभे राहते. काही कथा वाचताना शंकर पाटील यांच्या कथांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.  'दावं' कथासंग्रह वाचावा असाच आहे.  लेखिकेच्या हातून अशीच साहित्य सेवा व्हावी व ती अधिक दर्जेदार व्हावी असा आशावाद बाळगतो. त्यांच्या पुढील लेखन कार्यास शुभेच्छा देतो.                 
              *परशराम आंबी*                                 संमेलनाध्यक्ष २१ वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन पणुत्रे

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.