प्रकरण - ४

प्रकरण चार
         अजूनही बालपणातील तो प्रसंग आठवला की अंगावर काटा उभा राहतो.  आईचं निधन झालं , त्यावेळी मी चार-पाच वर्षाचा होतो. लहान भाऊ शिवाजी दहा महिन्याचा होता.  त्याचा सांभाळ कमळाजीनं केला होता. शिवाजी तिला आई म्हणून बोलवायचा. 
          घरात वडील आणि आम्ही पाच जण भाऊ.  चंद्रकांत म्हणून माझा मावस भाऊ हा लहानपणापासूनच आमच्या घरी होता.  म्हणजे घरात आम्ही एकूण सात जण पुरुषच होतो.  जेवण करण्यासाठी कोणीही बाई -माणूस घरात नव्हते. म्हणून रजपूतवाडीतील थोरली मामीअनुबाई ही जेवण करण्यासाठी आणून ठेवलेली होती.  सर्वात मोठा भाऊ संभाजी होता.  त्याचं लग्न करायचं ठरविलं होतं. नवरी मुलगी पाहण्यासाठी सुरुवात केलेली होती. आंबेवाडी येथील शिवाजी आंबी यांची मोटारगाडी घेऊन कोल्हापूर जिल्हा , सांगली जिल्हा आणि कर्नाटकातील पाहुण्याच्या घरी भेटी सुरू झाल्या.  सगळीकडे फिरवून झाल्यावर आंबेवाडी येथील हरिभाऊ आंबी यांची मुलगी छाया ऊर्फ जनाबाई.  तिच्याशी मोठ्या भावाचं लग्न झालं.  लग्न झाल्यानंतर काही दिवसात मी आजारी पडलो होतो.  तो आजार पण इतका भयानक होता. मला संडासला लागले होते. संडासवाटे रक्त आणि सेम पडत होता. त्याबरोबरच अंगही बाहेर येत होते.   महिनाभर माझा हा आजार होता.  माझी भावजय  जनाबाई हिनं कोणताही विचार न करता माझं बाहेर आलेले अंग फडक्याने ती आत बसवत होती. माझे आयुष्य असेपर्यंत मी हे विसरू शकणार नाही.  महिनाभर मी अंगात चड्डी घातली नव्हती. कमरेभोवती फक्त रुमाल बांधलेला होता.   १९७४-७५ चा तो काळ होता.आजच्या सारखी त्यावेळी गावात औषध दुकानं, दवाखानं काहीही नव्हते. नगारजीचा दवाखाना होता, पण दवाखान्यात जायला लोकं घाबरायचीत.   एखादा डॉक्टर  कोल्हापुरातून यायचा. भैरोबाच्या  मंदिरात थांबायचा. मला वाटतं की धर्माधिकारी असे त्या डाॅक्टरांचे नाव असावे. ते  तपासून परत जायचे. पण माझा हा आजार कमी व्हायचं नाव नव्हते. महिनाभर  मी हे दुखणं सहन करत होतो.  त्यावेळी शेजारच्या चंद्राबाई पाटील , अनुबाई यादव अशा बायका मला नवनवीन पदार्थ करून आणत होत्या. बिन आईचं  
पोर म्हणून भरवत होत्या.  गावातील झाडपाला किंवा इतर औषधं चालू होती.  माझा आजार थांबला. पण खूपच अशक्त आलेला होता. दिवाळीचा सण होता. मला वहिणीनं आपल्या माहेरी आंबेवाडीला नेलं होतं. मला नवी कपडे घेतली होती. मला खूप आनंद झाला होता. 
          या आजारपणात एके दिवशी एक मोठा मुंगळा माझ्या अवघड जागेला लावला होता.  त्यावेळी मला खूप वेदना झाल्या होत्या. अक्षरशः मी दोन्ही हातांनी बोंबलत होतो. शेवटी त्या मुंगळ्याला मारला. तेव्हा माझी सुटका झाली.  
          घर म्हटले की भांड्याला भांडे लागायचंच.  या पद्धतीने आमच्या घरातही भांडणं व्हायची. भांडण होऊन व्हायचे तेच झाले.  वडिलांचं आणि थोरल्या भावाचं पटलं नाही.  तो आपल्या बायकोला घेऊन बाजूला राहिला. आंबेवाडीत जाऊन राहिला. 
             घरात येरे माझ्या मागल्या सुरु झालं. दुसर्‍या भावाचं लग्न करावं , तर तो वयाने लहान होता.  काही लोकांनी वडिलांना लग्न करायचा सल्ला दिला.  पण वडिलांनी मुलांना सावत्र पणाचा त्रास होईल म्हणून लग्न करण्यास नकार दिला.  जेवणाची आभाळ होऊ लागली.  भात आमटी हाताने करायची.  भाकरी कोणीतरी करून द्यायचं.  रोज रोज कोण करून देणार ? हा प्रश्न होताच.  तेव्हा आमच्या शेजारची सोनाक्का  गावातच  भैरव गल्लीत आंबेकरांच्या घरी दिली होती.  तिने सांगितले , " रोज सकाळी आणि संध्याकाळी पीठ घेऊन या. भाकरी करून देतो." पण पीठ घेऊन कोण जाणार? धोंडिराम व चंद्रकांत सकाळी शेतात जाऊन वैरण आणायचे. तुकाराम शिक्षणासाठी रजपूतवाडीत होता. शिवाजी तर तीन-चार वर्षाचा होता. राहिलो तो मीच. मी दररोज ताटलीत पीठ घेऊन सोना मावशीच्या घरी जात होतो. सोनाक्काला आम्ही सर्वजण सोना मावशी म्हणायचो. त्यांच्या भाकरी होईपर्यंत थांबायचं. त्यांच्या भाकरी झाल्यानंतर ती आमच्या भाकरी करून देत होती.  काही वेळेला तिला कामाचा ताप झालेला असायचा , तेव्हा तीसुद्धा वैतागायची . काहीतरी म्हणायची.  तेव्हा मी भाकरी करून आणायला नकार देत होतो.  मग अण्णा म्हणजे वडील दुसऱ्या एखाद्या घरी पाठवून देत होते. तेथे पीठ घेऊन जाऊन भाकरी करून आणायचं  माझं काम होतं. असे पाच-सहा महिन्याचा कालावधी निघून गेला. शेजारच्या यशवंत पाटील (वकील) यांची बहीण अनुबाई हिचं लग्न कसबा ठाणे पैकी महाडिक वाडी येथील श्री. महाडिक यांचेशी झालेलं होतं , परंतु  काही कारणावरून भांडण झालेलं होतं.  त्यामुळे ती मुलांसह माहेरी राहत होती. ती आपल्या भावाला सगळ्या कामात मदत करायची. तिच्याबरोबर मीही आमची जनावरे घेऊन पावसाळ्यात चारण्यासाठी पाडळीच्या डोंगराखाली घेऊन जात होतो. दिवसभर गुरे चारत बसायचो. जनावरं चरत राहायची. लांब गेली तर हाकलून आणायची. दुपार झाली की जेवायचं. बाकी खड्यांनी , जिबलीनं किंवा गोट्यांनी खेळायची. तेव्हा पोरगा - पोरगी असा फरक जाणवायचा नाही.  त्यावेळी आमच्या घरात मुलगी नव्हतीच. त्यामुळे शेजारची मुलगी ही आपली बहीण असायची. प्रत्येक रक्षाबंधनला राखी बांधून घ्यायची. भाऊबीजेला ओवाळून घ्यायचं , हे दरवर्षी  ठरलेलं असायचं. शेजारी हे शेजारी नव्हतेच. घरातीलच माणसे असायची. फक्त रात्री झोपायला ज्याच्या घरी. आजच्या भाषेत बोलायचं तर प्रत्येकाची रूम वेगळी. त्यामुळे परकेपणा कधीच वाटला नाही. मुलगा-मुलगी , आपला- परका असा भेद वाटला नाही.  त्यामुळे एकत्र खेळत होतो. सायंकाळ झाली की जनावरे घेऊन घरी परत येत होतो. 
              घरी येऊन अनुमावशी भाकरी करून देत होती.  पंधरा- सोळा दिवस झाल्यानंतर तिनं चंद्रकांतला भाकरी कशा करायच्या हे शिकवलं होतं. मी त्याला चंदूदादा म्हणत होतो. चंदुदादाही मन लावून भाकरी करायला शिकला होता.  तव्यात पाणी गरम करायचं. ते गरम पाणी  उतवणी म्हणून भाकरीच्या पिठात ओतून घ्यायचं. ते पीठ एकजीव होण्यासाठी परातीत मळायचं. त्या मळलेल्या पिठातील एक गोळा करून हातानं थापायचा. थापलेली भाकरी उचलून तव्यात टाकायची. तव्यात भाजलेली भाकरी चुलीला लावायची. ती ठुमदिशी फुगायची. त्याचा पापड मोठा व्हायचा. भाकरी खाताना तिला एक वेगळीच चव असायची.  वर्ष-दोन वर्षे त्यानं भाकरी करून घातल्या.  त्यावेळी चंदुदादा आमटी करायचा ती अफलातून.  आजच्या सारखा आमटीला तेलाचा तवंग नसायचा . पण चव मात्र फार टेस्टी असायची. चुलीवर भांडं ठेवायचं. चुलीत लोखंडी उलतणं तापवायचं. भांड्यात चमचाभर(चहाचा) तेल घालायचं. लालभडक झालेलं उलतणं घ्यायचं . त्यावर लसणाच्या दोन कुड्या ठेवून ते भांड्यात सोडायचं , थोडी चटणी ,मीठ , डाळ घालायची. त्यात पाणी घालायचं.  वर झाकण म्हणून प्लेट ठेवायची. मिनिटभरात  त्याचा वास घरभर पसरायचा. त्याला अस्सल फोडणी म्हणायची . त्यावेळी एक किलो गोडे तेल महिनाभर जायचं. 
            धोंडिराम थोडा मोठा झाला. आम्ही त्याला भाऊ म्हणतो. भाऊच्या लग्नाचा विषय घरी सुरू झाला.  सांगरूळमधील बाबुराव आंबी यांची बहीण कोयना.  तिच्याशी भाऊचं लग्न झालं.  आणि विस्कटलेल्या संसाराची घडी पूर्ववत झाली. घरात बाईमाणूस आलं.  त्यावेळी मी इयत्ता सहावीला होतो. माझी शाळा शिंगणापूर येथील जिल्हा परिषदेची.  राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन असे नाव होते.   
       नुकतेच लग्न झालेली कोयना वहिनी कपडे धुण्यासाठी पाडळीतील घाटावर गेलेली होती.  तिच्याबरोबर मी आणि लहान भाऊ शिवाजी होता.  शिवाजी त्यावेळी सात - आठ वर्षाचा होता. वहिनी खाली मान घालून धुणे धूत होती.  मी पोहत नदीच्या पल्याड किनाऱ्यावरती गेलो होतो. शिवाजी काठावरती बसलेला होता.  खेळता खेळता न कळत  बाजूला असणा-या खोल पाण्यात गेला.  पलीकडे किना-यावर मी होतो. तो बुडताना मी पाहिलं आणि पोहतच अलीकडे येऊन त्याला बाहेर काढले. त्याचा जीव वाचला आणि वहिनीचं नांदणंही वाचलं .  
              चंदुदादा आणि आमचे वडील यांचे भांडण झाले. वडिलांना आम्ही सारे ' ' अण्णा ' म्हणत होतो.  चंदुदादा म्हणायचा , " अण्णा , तुला जशी पाच मुलं आहेत तसा मी सहावा. मला घरातली आणि शेतातली वाटणी हवी आहे.  लहानपणापासून मी येथेच आहे.  तुझ्या मुलांना मी भाकरी करून घातली आहे." त्यावर अण्णा म्हणाले , " तुला लहानाचा मोठा केला . तुला खायला घातले. ज्या घराचं खाल्लंस त्या घराचं असं पांग फेडतोस काय?  तुला काही मिळायचं नाही.  तू आता इथं राहू नकोस . तुझ्या तू गावाकडे जा. "  रागारागानं चंदुदादा आपल्या  गावी कुरुंदवाडला निघून गेला.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.