प्रकरण - २

प्रकरण-2
         माझी सर्व भावंडे रजपूतवाडी येथे लहानाची मोठी झाली होती.  रजपूतवाडी हे माझे आजोळ होते.  पण माझे खरे आजोळ वाळवा तालुक्यातील शिरगाव होय.  शिरगाव हे कृष्णा नदीच्या काठावरील गाव.  पूर्वी कृष्णा नदीला पाणी नसायचे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी पिके घेतली जायची.  बाकी आमच्या गावातून बैलगाडीतून शिरगावला  धनधान्य नेले जायचे.  पूर्वी १९६० च्या दरम्यान दुष्काळ पडला होता.  शिरगावातील माझे आजोबा आणि त्यांची भावंडे आमच्या गावी आली होती. त्यावेळी रजपूतवाडी येथील किशाबापूचा बंगला बांधण्याचे काम सुरू होते.  त्या बांधकामावर माझे आजोबा आणि त्यांची भावंडे काम करायला होती. अलीकडे म्हणजे वीस वर्षापूर्वी  रजपूतवाडी येथे आज इंदिरानगर आहे , तेथे चुन्याची घाणी होती.  त्या चुन्याच्या घाणीमध्ये चुना तयार करून बंगल्याचे बांधकाम केले होते.  माझ्या आजोबाचा एक भाऊ आप्पाजी  बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात  जावून राहिलेला आहे. तर एक भाऊ गुंडाप्पा  केर्लीमध्ये जावून राहिलेला आहे.  माझे आजोबा गणपती  रजपूतवाडी येथे घर खरेदी घेऊन राहिलेले आहेत.  तर बापूजी  , शिवाप्पा आणि मुलाप्पा असे तिघे भाऊ परत शिरगावला जाऊन राहिले आणि शेती करू लागले . आता कृष्णा नदीला पाणी आले. शिरगाव गाव सुपीक झाले. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की रजपूतवाडी म्हणजे गोकुळातील नंदनवन होते. शाहू महाराजांची छावणी होती. सोनतळी ही रजपूतवाडीलगतच आहे.  आमच्या आजोळी रजपूतवाडीत  पाहुण्यांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. घरात म्हशी भरपूर होत्या. त्यामुळे दुधाला कमी नव्हते.  शेजारी कार्पोरेशनचे शेत असल्यामुळे तेही कसण्यासाठी मिळालेले होते.       
           यादरम्यान वरणगे प्रयाग चिखलीच्या मध्ये कासारी नदीवर छोटा पूल झालेला होता.  त्यामुळे त्या पुलावरून उन्हाळा व हिवाळा वाहतूक सुरू होती.  पूल लहान असल्यामुळे पावसाळ्यात अगदी सुरुवातीलाच त्या पुलावर पाणी यायचे.  तेव्हा वरणगे -केर्ली याठिकाणी पावसाळ्यात नाव सुरु असायची. वरणगे , पाडळी , निटवडे , यवलूज , पडळ , माजगाव अशा गावांतील लोकांची वाहतूक पावसाळ्यात या नावेतून व्हायची.  पावसाळ्यातील वाहतुकीसाठी या गावांतून दिवाळीच्या वेळेस सुगीला भात , मक्का व गूळ बैतं म्हणून धान्याच्या स्वरूपात मिळत होते.  माझे वडील,  चुलता आणि माझे भाऊ पावसाळ्यात नाव चालवण्याचे काम करत होते. नाव चालवत असताना दिवसभर पावसात उभे राहावे लागत असल्यामुळे काही व्यक्तींच्या सहवासामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले होते.  संध्याकाळी नावेवरून येतानाच दारू पिऊन यायचे.  पावसाळा संपल्यानंतर मात्र वडिलांचं काम असायचं ते म्हणजे रजपूतवाडीतील म्हशीचे दूध विकायला कोल्हापूरला जायचे.  कोल्हापुरातील गंगावेशमधील मिठारी यांचे हॉटेल.  तसेच चहा गाडीवाले व काही ग्राहक यांना दूध दिले जायचे.  दारूचे व्यसन असल्यामुळे वडील परत येताना काही वेळेला बिकट प्रसंग घडायचे. एकीकडे सायकल , दुसऱ्या बाजूला घागरी पडलेल्या असायच्या.  या प्रसंगावरून घरात अनेकदा भांडणे व्हायची. आजोबा शिव्या घालायचे. पण वडील खाली घातलेली मान कधी वर करायचे नाहीत.  आजोबा त्यांच्या सुनेला म्हणजे मामीला म्हणायचे , " इंदे , घाल त्या रावशाला काहीतरी खायाला. काही खाल्लं नसेल अजून." माझ्या वडिलांचं नाव रामा असलं तरी त्यांना ' रावसाहेब ' म्हणून सारी बोलवत होती.       
               काही वर्षांनंतर माझे मामा शिक्षणासाठी कोल्हापूरला जाऊ लागले.  तेच शाळेला जाताना दुधाच्या घागरी घेऊन जात आणि  हाॅटेल , चहागाडीवाले व   गि-हाईकांना दूध घालून शाळेत जात होते.  माझा थोरला भाऊ संभाजी हाही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होता.  दुसरा धोंडीराम व तिसरा तुकाराम हेही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होते.  
             मी लहान होतो.  मला फारसे कळत नव्हते . तरीही मला आठवणारा हा प्रसंग. मी चार - साडेचार वर्षाचा असेल.  तेव्हा रजपूतवाडीत होतो.  माझी आई माझ्या पाचव्या भावासाठी बाळंत झाली होती.  रजपूतवाडीतून ज्वारीच्या थाटांनी भरलेल्या बैलगाडीत बसून मी वरणगे गावी माझ्या घरी आलो होतो.  तेव्हा आईसाठी तूपभात केला होता.  त्यातील भाताचे मुटके करून मला भरवलेले आजही मला आठवतात.  असेच काही दिवस निघून गेले . माझी आई आजारी पडली . अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यावेळी नगारजी म्हणून डाॅक्टर गावात येत होते.  त्यांनीच आईला मिरजेला घेऊन जावा असे सांगितले. आईला मिरजेला नेऊन आणले.  पण  त्याचा काही उपयोग झाला नाही.  तिच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही कसे निधान झाले  होते. तिला घरी आणले ,  तेव्हा मी  रजपूतवाडी होऊन घरी आलो .  आजही ते दृश्य मला जसेच्या तसे दिसते आहे ..... 
.....आई मधल्या सोप्यात म्हणजे स्वयंपाक खोलीत झोपलेली आहे.  मी बैलगाडीतून उतरून पहिल्या सोप्यात गेलो. तेथून त्या खोलीत गेलो.  गंजातील पाणी प्यालो . पाणी पिऊन बाहेर  निघालो.  आई डोळे फिरवून माझ्याकडे बघते आहे. काही समजण्याचे ते वयही नव्हते.  आजही मला त्या दृश्याचा उलगडा होत नाही.  ती माझ्याकडे पाहून काय सांगत असावी? किंवा तिला काय म्हणायचे होते? हे मला आजही कळलेले नाही. मी तिथेच राहिलो. 
              चार दिवसानंतरचा तो प्रसंग..... आईला जास्त झाले होते.  माझे आजोबाही राहिलेले होते.  रात्री अकरा -साडे अकराची वेळ.  आईचे निधन झालेले होते.  घरात रडारड सुरू झाली होती.  पण आजोबांचा जीव थाऱ्यावर नव्हता .  कारण मामा  आणि मामी रजपूतवाडीत होते.  आजच्या सारखी  त्या काळात प्रसारमाध्यमे  नव्हती.  निरोप द्यायचा तर एखाद्या व्यक्तीला पाठवून द्यावे लागत होते.  तशी ती रात्रीची वेळ होती. वाहनाची सोय नव्हती. कुणाला पाठवून द्यायचे तर सायकल घेऊन जावे लागत होते.  सायकलवर पाठवून दिले तरी जायला अर्धा तास आणि चालत यायला तासभर तरी वेळ जाणार होता.  माझे आजोबा घरातून बाहेर यायचे आणि मोठ्याने ' पांडू ' म्हणून ओरडायचे . आमचे गावातील घर आणि रजपूतवाडीतील घर तसे एका रेषेत आहेत.  मधले अंतर काढले तर अडीच ते तीन किलोमीटर इतके भरेल. त्यावेळी रात्री खूप शांतता असायची . वाहनांची वर्दळ नाही की कशाचा गोंगाट नाही. खरंच त्यावेळी इथून हाक दिल्यानंतर तिथे पोहोचत होती.  काही वेळानंतर आजोबांनी हाक मारल्यानंतर सादाला प्रतिसाद आला. म्हणजे मामांनी  ' हो ' दिलेली ऐकू आली. आजोबांचा जीव भांड्यात पडला.  म्हणजे  मामा निम्म्या वाटेवर आलेले होते.  मामा घरी येईपर्यंत चार वाजत आले होते.  थोरला भाऊ संभाजी मोठ्याने रडत होता.  धोंडीराम आणि तुकाराम जवळच बसून मुसमुसत रडत होते. शिवाजी तर अवघा नऊ-दहा महिन्यांचा होता.  तो पाळण्यातच पडलेला होता. माझी अवस्था ती काय सांगावी?  मला काहीच कळत नव्हते.  मी रडतही नव्हतो. फक्त तेथे असलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे  टक लावून पहात होतो.  सकाळ होताच आईला  नदीकडेला असलेल्या मळी नावाच्या शेताकडे नेले.  खोल खड्डा काढलेला होता. त्यात दिवळी केलेली होती. त्यात तिला बसवली .  पाणी पाजले. आरती म्हटली. मीठ घातले. माती घातली.  नदीला आंघोळ करून घरी परतलो. आणि  आमच्या संध्याकाळला  सुरुवात झाली.........

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.