प्रकरण -१

प्रकरण-1
          पूर्वीचा काळ अतिशय धगधगीचा आणि आर्थिकदृष्ट्या  मागासलेपणाचा होता. गावात काही मोजकीच घरे श्रीमंतांची असायची. गावातील बरेचसे लोक त्यांच्या दारी सेवेला असायचे. आजच्या इतकी सुधारणा  त्याकाळी नक्कीच नव्हती.  मी जे काय सांगतोय ते ७०-८० वर्षापूर्वीचा काळ आहे. गावात नीट पक्के रस्ते नव्हते. पावसाळ्यात गावातून सारी दलदल असायची. घरातून बाहेर पाऊल टाकला की चार - चार बोटाइतका चिखल असायचा. त्यातून जाण्यासाठी लाकडी खडावा असायच्या. खडावा म्हणजे खाली चार बोटाचा लाकडाचा ठोकळा. त्या ठोकळ्याला मधोमध निम्मा कट केला जायचा आणि वरती पाय अडकण्यासाठी चामड्याच्या पट्ट्या असायच्या. किमान पाव किलो वजनाच्या खडावा उचलत चिखलातून जावं लागायचं.
               त्याकाळी सारी घरं पालापाचोळा , छप्पराची असायची. त्यातील चांगली घरे म्हणजे अगदी साध्या खापरांनी शेखरलेली असायची. गावात एखाद्या श्रीमंत माणसांचे घर पक्क्या दगड विटांनी बांधलेलं असायचे. ते घर म्हणजे त्या गावातील राजवाडाच  जणू तो.
          कोल्हापूर शहरापासून आठ-दहा किलोमीटर अंतरावर आमचे गाव. वरणगे पाडळी. गावं दोन पण नाव एकच जोडनाव . जुळ्या भावासारखी़ दोन्ही गावाच्या मधून एकच रस्ता जातो. या गावात सारे बाराबलुतेदार सुखी व आनंदी जीवन जगत होते. गावाच्या उत्तर -पूर्व - दक्षिण बाजूने नदी वाहते. फक्त पश्चिमेस डोंगर आहे. म्हणजे सभोवती नदीचा वेडाआहे.  त्यामुळे गावाच्या पलीकडे जाण्यासाठी सोय नव्हती म्हणून लोकांना ये-जा करण्यासाठी नावेची सोय करण्यात आली होती. गावात गुराळ घरं होती. कोल्हापूरला गूळ नेण्यासाठी गुराळ घरापासून नदीपर्यंत एक बैलगाडी आणि नदीच्या पलीकडे कोल्हापूरपर्यंत गूळ नेण्यासाठी दुसरी बैलगाडी ठेवलेली असायची. पहिल्या बैलगाडीतून गुळ उतरून नावेत भरायचा आणि नावेतून उतरून दुसऱ्या बैलगाडीत भरायचा असे हलाखीचे जीवन त्याकाळी जगावे लागत होते. तसेच रजपुतवाडी केर्ली , चिखली , आंबेवाडी या भागात कार्पोरेशन (कंपनी) खात्याची जमीन असल्यामुळे ती कसण्यासाठी आमच्या गावातून कामगार जात होते. त्यांचीही ने - आण करण्यासाठी नावेचा उपयोग होत होता. विशेषत: पावसाळ्यामध्ये या नावेचा उपयोग लोकांना फार व्हायचा.  ही नाव चालवण्याचे काम आंबी करत होते.  नाव चालवणे हा त्यांचा आयुष्यभराचा दिनक्रम होता.  सकाळी लवकर उठायचं आणि नावेवर जायचं. दिवसभर नावेवर काम करायचं. अंधार पडल्यावर घरी यायचं . या कामाच्या बदल्यात सारे गावकरी पसाभर धान्य द्यायचे.  त्या काळी आठ दहा पोती भात . दोन पोती मक्का.  एक गाडीभर गूळ . म्हणजे तीस किलोचे २४ रवे मिळायचे.  म्हणजे घरात धनधान्याची मुबलकता होती. थोडेसे शेत आणि जनावरे होती म्हणजे घरात दुभतेही होते.  गावात कुणाकडे काही नाही मिळाले तर गरीब लोक  आंब्याच्या घरी साहित्य नेण्यासाठी येत होते.  आंब्यांची ताई म्हणजे अशा गरीब लोकांसाठी देवमाणूस होती.  तिचं खरं नाव ताराबाई होते. पण सारे गाव तिला ' ताई ' म्हणूनच ओळखत होते. ताईचा पती म्हणजे परसू.  त्यांना लोक    ' काका ' म्हणत होते. काका आणि ताई यांना तीन मुलगे आणि एक मुलगी होती . मुलगीचे नाव आकुबाई.  तिला पाहुण्यातच शिरगाव - वाळवा येथे लग्न करून दिले होते. त्यांच्या तीन मुलांची नावे अशी होती--थोरला मारुती , मधला शंकर आणि तिसरा रामा.  यातील मारुती यांनं काही काळ नाव चालवली. घर कारभार केला. पण बावडा याठिकाणी त्यांना पाहुण्यांच्या घरी दत्तक देण्यात आले.  शंकरचं लग्न गणेशवाडी - शिरोळ येथील कलाबाई हिच्याशी झाले.  रामा याचे लग्न शिरगावला दिलेल्या आकुबाईच्या मुलीशी झाले.  लग्न होऊन काही वर्षे झाली , पण त्यांना मूल होईना. झालेच तर लगेच मरायचे.  असे दोनदा झाले . त्यांना कुणीतरी सांगितले की देवाला नवस बोला आणि नदीला पाळणा सोडा. त्याप्रमाणं नवस केला आणि मूल जन्मले.  त्याचा पाळणा कृष्णा नदीवर भिलवडी - अंकलखोप येथे सोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.  आणि काय आश्चर्य एकापाठोपाठ सहा मुलं झाली.  तेही मुलगेच.  पण त्यातील चौथं अपत्य 'ज्ञानदेव' पाच सहा वर्षाचा असताना आजारी पडून वारले.  म्हणजे पाच मुलगे राहिलेत.  एक नंबरचा संभाजीराव, दुसरा धोंडीराम, तिसरा तुकाराम, चौथा परशराम आणि पाचवा शिवाजी.  शिवाजी दहा महिण्याचा असतानाच आईचं निधन झालं. त्याचा सांभाळ शेजारच्या कमळा आजीनं केला.

Comments

Popular posts from this blog

देणाऱ्याने देत जावे.......

भाषण संत तुकाराम

लॉकडाऊन - काय कमावले काय गमावले 'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार' असे वामनराव पै यांनी सांगितलेले आहे. कोरोना नावाच्या व्हायरसने साऱ्या विश्वाला वेडेपिसे केले आहे. नाना पाटेकर यांचा एक चित्रपट आहे, त्या चित्रपटात त्यांच्या तोंडी एक संवाद आहे - 'एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है|' याप्रमाणे एका कोरोना व्हायरसने साऱ्या मानवजातीला भंडावून सोडलेले आहे. प्रत्येक गोष्टीला चांगली बाजू आणि वाईट बाजू अशा दोन बाजू असतात. अगदी नाण्यालासुद्धा छापा आणि काटा अशा दोन बाजू असतात. त्याप्रमाणे गेले वर्षभर कोरोना व्हायरसने साऱ्या विश्वाला सळो की पळो करून सोडले आहे. या कोरोनाच्या महामारीने सारे विश्वच हादरून गेलेले आहे. यातून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या गेल्या आहेत. सर्वत्र त्रिसूत्रीचा अवलंब केला जाऊ लागला आहे. त्या त्रिसूत्री म्हणजे मास्क वापरा, सॅनिटायझरचा वापर करा, आणि सुरक्षित अंतर ठेवा. अंधार म्हणजे प्रकाशाचा अभाव. पण प्रकाश म्हणजे अंधाराचा अभाव नव्हे . त्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे समस्या म्हणून न पाहता संधी म्हणून पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे या लाॅकडाऊनच्या काळात आपण काय गमावलं ह्यापेक्षा काय कमावलं याचा विचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे असे मला वाटते. आपण सकारात्मक भावनेने प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू पाहूया कोरोनाने आपल्याला जे धडे दिले आहेत अथवा शिकवण दिली आहे. त्यावर विचार करून भविष्यात येणाऱ्या संकटांना वेळीच रोखले पाहिजे. तर मग आपण कोरोना काळातील लाॅकडाऊन मधील परिस्थितीचा लेखाजोखा पाहूया. संपूर्ण जग सध्या कोरोनाच्या कचाट्यात सापडलेले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू होते. अजूनही काही देशांत लाॅकडाऊन सुरू आहे. भारतातसुद्धा हीच परिस्थिती आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला संबोधित करताना सांगितले होते की, 'भारतासाठी हे संकट नसून ती एक उत्तम संधी आहे कारण आपण त्याकडे कसे पाहतो त्यावरच यश आणि अपयश अवलंबून असते, म्हणून कोरोना ही एक आपत्ती आहे असे न मानता ती एक संधी आहे असे मानूया.' म्हणूनच मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हे बोल खरे वाटतात. कारण कोरोनाने जगभरातील लाखो लोकांना वेठीस धरलेले आहे. या कोरोनाने सर्वांना अनेक गोष्टी शिकवल्यादेखील आहेत. सर्वांची जगण्याची पद्धत बदलून टाकलेली आहे. जगभरातील लोकांच्या विचारसरणीवर या संकटाने फरक पाडलेला आहे. 'एखादा आजार लोकांना काहीतरी शिकवून जातो' या वाक्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल आणि काहीना रागदेखील येईल. पण सर्वांनाच मान्य करावे लागेल की, या कोरोनाने आपल्याला कोणकोणत्या गोष्टी शिकवल्या आहेत. त्याचा परामर्श आपण याठिकाणी घेणार आहोत. त्यातील पहिली गोष्ट म्हणजे निसर्गाला गृहीत धरू नका. माणसाने स्वतःच्या प्रगतीसाठी निसर्गाला मोठी हानी पोहोचवली आहे. जलप्रदूषण, वायूप्रदूषण, भूमीप्रदूषण, अवकाशप्रदूषण अशा अनेक क्षेत्रांत प्रदूषण वाढलेले आहे. नदी क्षेत्रात इमारती बांधल्या जात आहेत. झाडांची कत्तल होत आहे. त्या ठिकाणी सिमेंटची जंगले उभी राहिली आहेत. याच प्रदूषणामुळे ग्लोबल वार्मिंग वाढले आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. तुम्ही म्हणाल की, या कोरोनाने काय शिकवलं? याचं उत्तर सोपं आहे. 'तुम्ही निसर्गाला त्रास दिला तर तोही तुम्हांला त्रास देतो.' म्हणजेच 'जैसी करणी वैसी भरणी' त्याला इंग्रजीत 'टिट फाॅर टॅट' असे म्हणतात. ही शिकवण सर्वात महत्त्वाची आहे. कारण निसर्गापुढे कुणाचेच काही चालत नाही. म्हणून निसर्गाची काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाच्या काळात दिसून आले आहे. सारी माणसे लॉकडाऊनमध्ये घरात बंदिस्त झालेली असताना निसर्गाने मात्र मोकळा श्वास घेतला होता. नदी, समुद्र स्वच्छ झाले होते. दिल्लीसारख्या शहरातील वायुप्रदूषणाचे प्रमाण खूपच कमी झाले होते. आता आपण दुसरी गोष्ट पाहू - ती म्हणजे नाती जपणे. नोकरी आणि पोटापाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी लोक घराबाहेर पडून धावपळीचं जीवन जगत आहेत. त्यांचं जगणं अतिशय धकाधकीचं झालं आहे. त्यामुळे घरच्या माणसांना वेळ देणे , गप्पागोष्टी करणे दुर्मिळ झालेलं दिसून येते. शहरातील आई-बाबा नोकरी करत असतात. मुलांकडे लक्ष द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही. ज्येष्ठ लोकांशी संवाद साधता येत नाही. पण या कोरोनाच्या लाॅकडाऊनमध्ये सर्वांना घरात बसायला लागलं. त्यामुळे लोकांना घरातील माणसांना खूप वेळ देता येऊ लागला. आपली नाती घट्ट बनवता आली. आपली कामे आपणच करावीत हा स्वावलंबनाचा धडा याच लाॅकडाऊनकडून मिळाला. या लाॅकडॉऊनमध्येच खरा आनंद मिळाला असं म्हटलं तर ते वावगे होणार नाही. आता आपण तिसऱ्या गोष्टीविषयी चर्चा करूया. ती म्हणजे स्वच्छता ठेवणे. स्वच्छता ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. देशात आणि जगात मोठी असलेली समस्या म्हणजे कचरा. त्यासाठी असणारी उपाययोजना अतिशय थोड्या प्रमाणात आहे. स्वच्छता असेल तर कोणताही आजार जवळ येत नाही. पण सध्या अनेक लोकांना स्वच्छतेची अलर्जी असल्याचे दिसून येते. आजार पसरण्यासाठी अस्वच्छता हीच कारणीभूत असते. याच कारणाने सर्वांना हात स्वच्छ धुवायला शिकवले. हातात हात न घालता भारतीय पद्धतीने नमस्कार करायला शिकवले. मास्क घालायला शिकवले. सुरक्षित अंतर राखून जगण्यास शिकवले. वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व समजले. त्यामुळे कचऱ्याचे होणारे ढीग कमी झालेले आहेत. नदी, नाले, चौक यांनी मोकळा श्वास घेतला. आता आपण चौथ्या गोष्टीविषयी माहिती घेऊया.- ती म्हणजे तब्येतीची काळजी घेणे. आपल्या चित्रविचित्र जीवनशैलीमुळे वेळी-अवेळी खाण्यामुळे आणि हॉटेल संस्कृतीमुळे सध्या आपले आरोग्य खालावलेले आहे. फास्ट फूड, तेलकट पदार्थ खाणे, यामुळे आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली आहे. शुगर, ब्लड प्रेशर असणाऱ्या लोकांना कोरोना विषाणूने आपले पहिले लक्ष केले आहे. ते वृद्धापासून.बचाव करण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली पाहिजे. हे कोरोनाने लॉकडाऊनच्या काळामध्ये शिकवला आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर सर्वच व्याधी आणि रोगापासून आपणाला दूर राहता येते हे या कोरोनाने दाखवून दिले आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले आहे. यातील पाचवी गोष्ट म्हणजे प्राणिमात्रांवर प्रेम करणे. कोरोनामुळे सर्वच देशात लाॅकडाऊन केल्यामुळे निसर्गाचे चक्र सुधारलेले दिसत आहे. प्रदूषणामध्ये मोठी घट झालेली आहे. वन्यजीवन आनंदी झाले आहे. पाळीव प्राणी, वन्य प्राणी मुक्त संचार करू लागले आहेत. पाळीव प्राणी, वन्य प्राणी हे जीवन चक्राचा एक आमुलाग्र भाग आहे. त्यांची संख्या कमी झाल्याने जीवनाचा समतोल बिघडतो. म्हणून त्यांची काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोरोनामुळे प्राण्यांच्या कत्तलीमध्ये घट झाल्याचे दिसून येते. म्हणजेच कोरोनाने आपल्याला 'जिवो जीवस्य जीवनम्' म्हणजेच तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या. हा मूलमंत्र दिला आहे. त्याचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे. कोरोनामुळे जात, धर्म यांच्या शृंखला तोडल्या गेल्या आणि माणुसकीच्या भिंती उभारल्या. शाळा बंद झाल्या पण ऑनलाईन शिक्षण सुरू झाले. काही माणसांचे मृत्यू झाले. पण लसींचा शोध लागला. 'जशी दृष्टी तशी सृष्टी.' म्हणूनच लाॅकडाऊनमध्ये काही गमावले असले तरी त्याचा विचार करून दु:ख करत बसण्यापेक्षा जे कमावले आहे त्याचा सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल केली पाहिजे.