७. * दीपलक्ष्मी*

          ७.   *दीपलक्ष्मी*
             आजही तो प्रसंग आठवला की ऊर भरून येतो माझा . माझे मलाच कळत नव्हते . माझ्या मनाची द्विधा अवस्था झालेली होती .  समोर दिसणारे दोन प्रसंग .......त्यातील पहिला प्रसंग असा - मी सोप्यामध्ये बसलेलो आहे . पूर्वेकडील भिंतीवर लावलेली समोरची शोकेस . ती बक्षिसांनी भरलेली आहे.  त्यामध्ये अनेक शिल्ड ओळींनी लावलेली आहेत.  वक्तृत्व , निबंध आणि इतर स्पर्धा मधून मिळवलेली अनेक बक्षिसे.  त्यावरून सारा भूतकाळ  समजतो आहे. दीपा पहिलीत गेल्यापासून ते पदवी आणि पदविका मिळवेपर्यंतची .........आणि दुसरा प्रसंग असा आहे की -त्याचवेळी सासरी जमिनीवर निश्चित पहुडलेली ती . अगदी शांत शांत....तिच्या भोवतीने बायका जमलेल्या . आठवणीने तिच्या पराक्रमाच्या गोष्टीचे रडत गुणगान करणाऱ्या .  त्यातच माझी बायकोही सामील झालेली . की जी या सर्व पराक्रमाची साक्षीदार होती . डोळ्यातील आसवांचा बांध फुटलेला .  अनपेक्षित झालेल्या दुःखाने व्याकूळ झालेली . कारण तिच्या जीवाचा तुकडा तिच्यापासून दूर गेलेला.  ज्या आशेने तिने हाडाची काडं करून तिला लहानाची मोठी केली होती . संस्काराची खाण रीती केली होती. जिच्या रूपानं  भविष्याचा वेध घेण्याचे ठरवले होते . आज एकाएकी प्रेत होऊन ती समोर निपचित पडलेली .  आपली मुलगी गेली यावर विश्वासच बसत नव्हता . कसा बसणार ? वेलीवर नुकतंच उमललेलं फूल .  वाऱ्याच्या झुळूकीवर डोलणारं .  उनाडक्या करणार्‍या मुलांनं यावं आणि पूर्ण उमलण्यापूर्वीच ते तोडून टाकावं.  असंच काहीतरी माझ्या मुलीच्या बाबतीत घडलेलं होतं . ती अर्ध्यावर डाव मोडून चाललेली होती .    
          माझी सोनुली दीपलक्ष्मी . जमिनीवर निश्चित पहुडलेली दीपलक्ष्मी . या विचारात गढून गेलेलो मी. माझं मलाच कळंना की सत्य कोणतं ?......
      शोकेस कडे पाहिले . तर बाजूला धडपडणारी माझी दीपा .  मी भूतकाळात केव्हा गेलो हे माझे मलाच समजले नाही .......
            पंचवीस वर्षांपूर्वी माझा शशिकलाशी विवाह झाला होता .  मला सुस्वरूप पत्नी मिळाली .  त्यामुळे खूप आनंद झाला होता . त्यापेक्षाही शिकलेली आणि नोकरी करणारी पत्नी मिळाली होती.  हे माझे भाग्यच ! सर्वांत महत्वाचे म्हणजे तिचे मन माझ्याशी जुळले होते .  संसाररुपी वेलीवर एक सुंदरशी कळी उमलली होती . तिचे नाव ठेवले होते दीपलक्ष्मी . कारण तिचा जन्म दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झालेला होता . 
          चंद्र कलेप्रमाणे दीपलक्ष्मी वाढत होती .         'बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ' या उक्तीप्रमाणे दीपलक्ष्मी बालपणीच तल्लख बुद्धीची होती . मनमोहक आणि गोड बडबड करणारी होती .  तिची आई तिला वर्ष - दोन वर्षाची असतानाच शाळेत घेऊन जात होती .  शाळेत मुलांना सुंदर गाणी शिकवायची . आवाज गोड असल्यामुळे कवितांना सुंदर चाली लावायची . मुले मधल्या सुट्टीत किंवा ऑफ तासाला कविता चालीवर म्हणायचीत.  त्या कविता , गाणी ऐकून दीपलक्ष्मी आपल्या बोबड्या बोलीत म्हणायची .  ती गाताना आम्हांला खूप मजा वाटायची .  देहभान विसरून आम्ही दोघेही टाळ्या वाजवायचो . मग दीपलक्ष्मी थोडी लाजायची .  लाजताना तिच्या उजव्या गालावर खळी उमलायची . आणि काय आश्चर्य ! दीपलक्ष्मीच्या या बोबड्या बोलांनी तिच्या आईला कवयित्री  केव्हा करून टाकले हे समजलेच नाही . दीपलक्ष्मी बोबडे बोल बोलायची त्यावेळी बोबडे गीत जन्म घ्यायचे .  तिची आई त्याचं बडबडगीत तयार करायची . अशी अनेक बडबडगीते तयार झाली . मग मी तिला बडबड गीतांचे पुस्तक काढायला सांगितले .  त्यावेळी त्या पुस्तकाचे खूप कौतुक झाले . ते पुस्तक आम्ही आमच्या चिरंजीव  दीपलक्ष्मीला आशीर्वाद म्हणून समर्पित केले .  पुस्तकाचे नाव ठेवले होते -  'दीपांजली ' 
          दीपलक्ष्मीला आम्ही लाडानं  ' दीपा '  म्हणायचो .   दीपा सहा वर्षाची झाली  आणि तिचं नाव पहिलीच्या वर्गात दाखल केलं .  तेही तिच्या आईच्या शाळेत . माझ्या शाळेत तिला नेणं शक्य झालं नव्हतं .  कारण मी दूरच्या शाळेत शिक्षक होतो .  त्यामुळे घरातून लवकर बाहेर पडावे लागायचे  आणि घरात वेळाने पोचावे लागायचे .  शिवाय लहान मुलीला आईची जास्त आवश्यकता असते . तिची शाळा घरापासून जवळ होती . म्हणून तिच्याच नगरपालिकेच्या  ' शाळा क्रमांक नऊ ' या शाळेत दीपा जाऊ लागली . पण ती चौथी च्या वर्गाला शिकवत होती .  पहिलाला सौ. भोई मॅडम शिकवत होत्या . ती दीपाला पहिलीच्या वर्गात बसवून चौथीच्या वर्गात निघाली की दीपा तिच्या पाठोपाठ चौथीच्या वर्गात हजर होई .  आईला सोडून पहिलीच्या वर्गात बसायला दीपा तयार व्हायची नाही .  तेव्हा सौ. भोई मॅडमनी उत्तम मार्ग काढला . त्या म्हणाल्या ,       "पाटील मॅडम , बसू द्या तिला तुमच्या वर्गात  काही दिवस . मी तिची हजेरी लिहिते . 
             काही दिवस निघून गेले सौ. भोई मॅडम दररोज चॉकलेट घेऊन यायच्या आणि मधल्या सुट्टीत जेवायला बसताना ते चॉकलेट दीपाला द्यायच्या . हळूहळू दीपाला भोई मॅडम यांचा लळा लागला .  ती पहिलीच्या वर्गात जाऊन बसू लागली . 
           दिवसा मागून दिवस चालले होते . एके दिवशी भोई मॅडमला दीपाचा नवा पैलू आढळला .  तो दिवस प्रजासत्ताक दिन होता . मॅडमनी तिला एक छोटेसे भाषण लिहून दिलं होतं . ते भाषण दीपानं जसंच्या तसं म्हणून दाखवलं .  सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात तिचं कौतुक केलं .  प्रमुख पाहुणे चंद्रकात सुतार यांनी तिला पाच रुपये दिले होते बक्षीस म्हणून .  येथेच उगम झाला दीपाच्या वक्तृत्व कलेचा .  प्रत्येक कार्यक्रमात तिनं भाग घेतला पाहिजे असा हट्टच असायचा तो भोई मॅडम यांचाच . आमच्या मुलीपेक्षा ती त्यांची विद्यार्थिनी म्हणून जवळची बनली  होती. तिची आई तिला वेगवेगळ्या वर्तमानपत्रातील माहिती  संकलन करून आणि विविध पुस्तकातील महत्त्वाचे उतारे एकत्र करून देऊ लागली . दीपाही वाचनात गुंग होऊन जायची . तेव्हापासून तिला कोडी सोडवायचा छंद लागला होता . तिच्या ज्ञानात भर पडत गेली . 
        दीपा चौथीच्या वर्गात गेली .  तिला स्कॉलरशिप  परीक्षेसाठी बसण्याचा आग्रह   तिच्या आईने केला होता . त्यामुळे तिला वक्तृत्वाकडे थोडे दुर्लक्ष करायला सांगितले होते . तर ती खवळून उठली .  माझ्याशी ती बोलायची बंद झाली . आईशीही तिने अबोला धरला होता .  शेवटी आम्हांला माघार घ्यावी लागली .  तिने स्कॉलरशिपबरोबर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्याचा निर्णय घेतला .  फेब्रुवारी महिन्यात स्कॉलरशिप परीक्षा आणि शिवजयंती कार्यक्रम आलेला होता .  एकीकडे स्कॉलरशिप परीक्षेची तयारी आणि दुसरीकडे  वक्तृत्वाची तयारी अशी दुहेरी कसरत तिला करावी लागत होती .  वक्तृत्व स्पर्धेसाठी विषय होता - 'छत्रपती शिवाजी महाराज -जाणता राजा . '  त्यात तिने पहिला क्रमांक पटकावला . संपूर्ण शहरातून कौतुक झालं तिचं . नगराध्यक्षांच्या हस्ते मिळालेलं स्मृतिचिन्ह आजही त्या प्रसंगाची आठवण करून देते.  ते स्मृतिचिन्ह शोकेसच्या डाव्या बाजूला अगदी पुढे ठेवलेले आहे .  जून महिन्याच्या तीस तारखेला स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला . दीपाचा कोल्हापूर जिल्ह्यात २१ वा आणि शहर विभागात दुसरा क्रमांक आला होता . आम्हांला दीपाच्या यशाचा खूप आनंद झाला होता .  पण आमच्या पेक्षाही भोई मॅडम यांना त्याचा आनंद अधिक होता .   कारण सारं श्रेय त्यांचं होतं .  त्यांनी संपूर्ण शाळेत साखर वाटली होती .  दीपा तर त्यादिवशी मोरासारखी थुई थुई नाचत होती . शशिकलानं पुरणपोळीचा बेत केला होता .  संपूर्ण गल्लीला  जेवणासाठी बोलावलं होतं . सर्वांच्या जीवनातील तो एक अविस्मरणीय क्षण ठरला होता .  भोई मॅडमनी  दिलेला शब्द खरा करून दाखवला होता . दीपा आणि भोई मॅडम यांचे सत्कार अनेक ठिकाणी झाले होते. पण नगराध्यक्ष कोरे साहेबांनी केलेला सत्कार अवर्णनीय होता .  त्यांनी केलेले कौतुक मॅडमच्या कामगिरीला साजेसे होते . सत्काराला उत्तर देताना मॅडम  रडल्या होत्या .  त्या म्हणाल्या ,  "या यशाची खरीखुरी मानकरी दीपाच आहे .  माझ्या हाती कोहिनूर होता .  त्याला फक्त पैलू पाडण्याचे काम मी केले आहे . बोलताना त्यांच्या शब्दांशब्दांतून  दीपाबाबतचा सार्थ अभिमान व्यक्त होत होता . 
           एकेक पायरी सर करत दीपा आता दहावीच्या वर्गात गेली होती .   जीवनाच्या नव्या उंबरठ्यावर ती उभी होती .  दहावीचं वर्ष महत्वाचं मानलं जातं.  विद्यार्थ्यांबरोबर पालकांना टेन्शन असतं .  ताणतणावाचं वर्ष असते . अभ्यासाकडे खूप लक्ष द्यावे लागते .  दीपानं नववीपर्यंत  कधीही पहिला क्रमांक सोडला नाही .   नेहमी ९० टक्‍क्‍यांच्या घरात ती खेळत होती .  त्यामुळे नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री . नाळे एस . एम .  आणि सर्व शिक्षकांना  तिच्याबाबत खूप अपेक्षा निर्माण झाल्या होत्या . सर्वांचे एकच ध्येय होतं , की दीपाला बोर्डाच्या यादीत  चमकावायचे आहे . त्यासाठी पडणारे सारे कष्ट सोसायला सगळे तयार होते . मुख्याध्यापक श्री . नाळेसरांनी नवनीत , सन्मित्र ,  चाणक्य , दहाड  अशा अनेक प्रकारच्या प्रकाशनांच्या  प्रश्नपत्रिकांचे संच  खरेदी करून ठेवले होते .  टॉप टेन विद्यार्थी निवडून त्यांना विशेष मार्गदर्शन ठेवले होते . दीपावली सुट्टी पूर्वीच  सर्व अभ्यासक्रम संपवून दुसऱ्या सत्रात केवळ  प्रश्नपत्रिका सोडवण्यावर भर दिला होता .  जिल्ह्यातील प्रत्येक विषयातील तज्ज्ञ विषय शिक्षक  बोलावून व्याख्यानमालेचे आयोजन केले होते .
              शिक्षकांच्या या प्रयत्नाला आम्हीही आमच्या परीने मदत करत होतो .  रात्री उशिरापर्यंत दीपा अभ्यासासाठी बसायची . तिच्याबरोबर तिची आई जागायची . तर मी सकाळी लवकर उठून  दीपाला अभ्यासाला बसवायचं काम करत होतो .  जणू दीपाच्या यशासाठी  सगळ्यांनी  जिद्द केली होती . 
        ५ मार्च १९९९ रोजी  एस. एस. सी. परीक्षा सुरू झाली होती .  पहिला पेपर मराठीचा चांगला गेला होता . हिंदीचाही पेपर चांगला गेला होता .  हे आम्हांला तिच्या घरी येण्यावरून कळत होते .  अगदी खुशीत पळत ती घरी यायची .  तिसरा पेपर इंग्रजीचा होता . अगदी मन लावून दीपा पेपर सोडवत होती . निम्मा पेपर सोडवून झाला असेल ,  अचानक भरारी पथकाने त्या परीक्षा केंद्रावर धाड टाकली . भरारी पथकातील लोकं  सर्व वर्गातून फिरून  दीपाच्या परीक्षा हॉलमध्ये आले . त्यावेळी अघटित असं घडलं . अधिकारी तपासणी करत दीपापर्यंत आले . तिला उठवले . कारण तिच्या पायात कागद पडलेला त्यांना  दिसला होता . अधिकाऱ्यांनी तिला खडसावून विचारले , "बोल ही कॉपी कुणाची आहे?  तुझीच आहे ना ही काॅपी ? "  
         " मी कॉपी केलेली नाही . "  असे तिनं उत्तर दिलं . 
      " मग कोणी केली ? कशी आली इथे ? "
    " मला काय माहिती ?" दीपा म्हणाली .
       "असं काय !  तुला माहीत नाही ?  दे तो पेपर इकडे . त्यावर शेरा लिहितो लाल शाईने काॅपी म्हणून ."   असं म्हणून  त्या अधिकाऱ्याने पेपर हिसकावून घेतला .  दीपा ओक्साबोक्शी रडू लागली .  गोंधळ ऐकून शेजारच्या रूममध्ये पर्यवेक्षण करणारे  सानेसर तेथे आले .  त्यांनी अधिकाऱ्यांना समजावून सांगितले .  ते म्हणाले ,  "साहेब , ही मुलगी कॉपी करणं शक्य नाही . तिचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत . ती आमच्या शाळेची आदर्श विद्यार्थिनी आहे . तिनं कॉपी केली नाही अशी मी साक्ष देतो ."  
      जेव्हा त्या अधिकाऱ्यांना दीपा आमची मुलगी आहे असं समजलं . तेव्हा त्यांना खात्री पटली .  त्यांनी तिची पाठ थोपटली .  ' शांतपणे पेपर लिही ' असं म्हणून ते हॉलच्या बाहेर पडले .  पण त्या अनपेक्षित प्रसंगाने  दीपा  मात्र गोंधळलेली होती .  तिच्या मनावर दडपण आलं होतं .  त्याचा पेपरवर परिणाम झाला होता . कारण तिला इंग्रजी पेपरमध्ये  अपेक्षेपेक्षा सहा गुण कमी पडले होते . आणि इथंच तिचा गुणवत्ता यादीतील क्रमांक हुकला होता . गुणवत्ता यादीत येण्यासाठी  तिला एक गुण कमी पडला होता . याचं तिला खूप दुःख झालं होतं . आम्हीही नाराज झालो होतो . पण त्याहीपेक्षा जास्त शाळेतील सर्व घटकांना वाईट वाटत होतं . कारण एका गुणाने शाळेचा इतिहास घडला जाणार होता .  संपूर्ण शाळा , शहर हळहळत होतं .  हीच संधी होती . यापूर्वी कुणीही गुणवत्ता यादीत आलं नव्हतं  आणि यानंतर कुणी येऊ शकेल हे सांगता येणार नाही .  सर्वांचाच अपेक्षाभंग झाला होता . शाळेचे मुख्याध्यापक  श्री . नाळेसर आमच्या घरी आले होते . कारण दोन दिवस झाले दीपा जेवली नव्हती .  तिला आपली चूक आहे असं  वाटत राहायचं .  मुख्याध्यापक , शिक्षक व  माझे आई-वडील , माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांची  मी अपराधी आहे .  म्हणून ती स्वतःला दोषी समजत होती . ती कोणाशीही मोकळेपणाने वागत नव्हती . तिचा चिडचिडेपणा फार वाढलेला होता . म्हणून आम्हीच मुख्याध्यापकांना घरी बोलावलं होतं . तेच काहीतरी मार्ग काढतील असं वाटत होतं . 
           श्री . नाळेसर घरी येऊन दीपाला म्हणाले , " जे व्हायचं होतं ते झालं . इंग्रजी पेपरच्या वेळी घडलेल्या रामायणामुळे हे घडलं .  तू वाईट वाटून घेऊ नकोस . अगं  तुझ्यासारखी अनेक जण  या गुणवत्ता यादीपासून दूर राहिलेले आहेत .  हे बघ दीपा ,  ही परीक्षा म्हणजे सर्वस्व नव्हे . अजून आयुष्यामध्ये भरपूर परीक्षा द्यावयाच्या आहेत तुला . मला खात्री आहे की , तू सर्व परीक्षांमध्ये पास होशील .  असा आशीर्वाद आहे माझा . दीपा , निराशा  हा काही जीवनातील  उद्दिष्टपूर्तीचा मार्ग नव्हे . त्यासाठी आशेतूनच  उद्दिष्टपूर्तीसाठी मार्गक्रमण करता येईल ."     
       श्री . नाळेसरांच्या  बोलण्याचा प्रभाव दीपावर झाला . ती सावरली . तिला एस. एस. सी. परीक्षेत ८९.७ टक्के गुण मिळाले होते . .तिचा अनेक ठिकाणी सत्कार झाला .  तिने शाळेत नवीन रेकॉर्ड निर्माण केले होते .  तरीही ती गुणवत्ता यादीत आली नव्हती ही बोच तिच्या मनात होती . 
          अकरावीला कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा याबाबत मतमतांतरे होती . श्री . नाळेसर  आणि सर्व शिक्षकांना वाटायचं  तिनं इंजिनीयर व्हावं . तिची इच्छा होती की , आपण डॉक्टर व्हावं . पण आम्हां माता-पित्यांना वाटायचं  की तिनं आमचा वारसा पुढे चालवावा .   शेवटी तिच्या इच्छेप्रमाणे  तिचा प्रवेश विवेकानंद कॉलेजमध्ये अकरावी सायन्सला घेतला . वाऱ्यासारखी दोन वर्षे भुर्रकन उडून गेली .  तिने बारावी सायन्सची परीक्षा मार्च २००१ मध्ये दिली .  जूनमध्ये बारावीचा निकाल लागला . अपेक्षेपेक्षा खूपच कमी गुण तिला मिळाले  होते . आपोआप मेडिकल आणि इंजीनियरिंगचा मार्ग बंद झाला होता.  ती म्हणायची , "डोनेशन न देता मेडिकलला प्रवेश मिळाला तरच घेणार ." ८० टक्केला मेडिकलला प्रवेश मिळणे अवघड होते . त्यामुळे तिला डी. एड . कॉलेज , कोल्हापूर येथे प्रवेश घ्यावा लागला .  या ठिकाणी तिच्या कलागुणांना वाव मिळाला . प्रत्येक कार्यक्रमात ती सहभाग घ्यायची . वक्तृत्व , निबंध , चित्रकला  स्पर्धावर तिची हुकुमत होती .  सांस्कृतिक कार्यक्रमात ती हिरीरीने भाग घ्यायची . प्रथम वर्ष डी. एड. मध्ये  तिनं वीस बक्षिसं मिळवली होती .   त्यावेळी प्राचार्य म्हणाले होते ,  "दीपा  दुसऱ्यासाठी काहीतरी बक्षिसं ठेव  शिल्लक ."
           डी . एड.  द्वितीय वर्षातील  द्वितीय सत्रात असताना  तिला एक स्थळ आलं होतं .  मुलगा एका विद्यालयात शिक्षक पदावर काम करत होता .  तो नोकरीवर कायमचा झालेला होता.  त्यामुळे तो दीपाच्या नोकरीसाठी प्रयत्न करणार हे निश्चित होतं . म्हणून तिचं लग्न करून दिलं . तिचा नवरा विनायक हा स्वभावाने शांत होता .  त्याच्याबरोबर घरी विधवा आई होती . कोल्हापुरातील एका उपनगरात त्याने फ्लॅट घेतलेला होता . 
          .........दोघांचा राजा-राणीचा संसार सुरू झाला होता . दीपाचं डी. एड.  पूर्ण झालं . विनायकनं दीपाला जवळच्या शाळेत नोकरीला लावलं . संसाररूपी वेलीवर एक सुंदर फूल उमललं . मोठ्या थाटामाटात बारसं घातलं . तिच्या पाय गुणाने दीपाला नोकरी लागली , म्हणून तिचं नाव गुणवंता ठेवलं . पोर सुद्धा गुणाची होती . शांत स्वभावाची . भूक लागली की कुरकुरायची . खायला घातले की हसत पडायची .  ती हळूहळू मोठी होऊ लागली . ती  'गुणा ' नावानं परिचित झाली . गुणा सहा वर्षाची झाली .  ती पहिलीच्या वर्गात जाऊ लागली . दीपाच्या शाळेत जात असल्यामुळे कोणतीही अडचण नव्हती .   
          त्यांच्या सुखी संसाराला दृष्ट लागली. विनायक आणि दीपा यांच्यात खटके उडू लागले . कारण दीपाचे होणारे कौतुक विनायकला सहन होत नव्हते . दीपाचा वर्ग सुधारू लागला .  मुलांमध्ये दीपा मिसळून गेली होती . शाळेत विविध उपक्रम राबवत होती . केंद्रप्रमुख , शिक्षणाधिकारी यांनी दीपाच्या कार्याचं कौतुक केलं होतं . अनेक शाळांमधून तिची व्याख्याने होऊ लागली . तिला सहकार्य करायचे सोडून तो तिचा द्वेष करु लागला . कारण त्याचा पुरुषी अहंकार जागृत झाला होता . तो तिच्याशी भांडू लागला .  तिचा पगार झाला की , तो सगळा पगार काढून घेऊ लागला . तिच्या नावावर कर्ज काढू लागला . स्वतःचा पगार आणि तिचाही पगार तो व्यसनांमध्ये संपू लागला . इतके महाभारत होऊनही तिने आम्हाला काहीही कळू दिले नाही . मुकाटपणे ती सारे सहन करत होती . 
 ...........आणि तो काळा दिवस उगवला . त्या दिवशी रविवार होता. तो सुट्टीचा दिवस होता . सकाळी उठल्याबरोबर तो दारू ढोसून आला होता . कर्जाच्या पासबुकावरून दोघांच्यामध्ये संघर्ष झाला . दीपा म्हणाली ,   "असं दिवसागणिक मरण्यापेक्षा एकदमच मारून का टाकत नाही ?"
       " थांब तुला एकदमच मोक्ष देतो ." असं म्हणून त्यानं दीपाच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले . दीपा त्यात संपूर्ण भाजलेली होती .  तिला सरकारी दवाखान्यात विनायक घेऊन गेला होता . दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच तिने या जगाचा निरोप घेतलेला होता ..........
.........आणि अचानक आमच्या दारात अम्बॅसिडर गाडी उभी राहिली . गाडीत बसून दीपाच्या घरी पोहोचलो . तर आत सोप्यात तिला झोपलेली . विनायक ताडमाड उभाच . शशिकला आत गेली . दीपाच्या प्रेतावर पडून ओक्साबोक्सी रडू लागली . माझ्या डोळ्यात आसवं आली .  भिंतीला टेकून टिपं  गाळत उभा होतो . हळूहळू शेजारी-पाजारी जमा झाले . पाहुण्यांना कळवलं . शशिकलाची तर सारखी दातखिळी बसत होती .......
 ......... दीपाचं प्रेत उचललं . स्मशानभूमीकडे नेलं . ती आता आमच्यापासून खूप दूर निघून गेली होती . खूप दूर ....खूप दूर .....खूप दूर....



लेखन :
 परशराम रामा आंबी
श्री नवनाथ हायस्कूल 
पोहाळे तर्फ आळते
ता. पन्हाळा जि. कोल्हापूर
मोबा . नं . ९४२१२०३७३२

Comments

  1. कथा मिळाली की कळवा.

    ReplyDelete
  2. कथा मिळाली की कळवा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सारांश लेखन

बोलतो मराठी

बहुरंगी बहुढंगी नाट्यछटा - डॉ. श्रीकांत पाटील