बालसाहित्य आणि संस्कार
वरणगे गावात साहित्य संमेलन आयोजित केले होते. या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगेसर होते. या साहित्य संमेलनामध्ये श्याम कुरळे, रा. तु. भगत, किसनराव कुराडे, प्रा. दिनकर पाटील अशी नामवंत साहित्यिक मंडळी होती. त्यावेळी ग्रामीण लोकांमध्ये चर्चा चालली होती. "साहित्य म्हणजे काय रे भाऊ?" अशिक्षित लोकांना याबाबत काय माहिती असणार? ते आपल्या परिचयाच्या वस्तूंची नावे सांगत होती. एक गावकरी म्हणाला, "खोरं, टिकाव, पाट्या इत्यादी"
दुसरा गावकरी म्हणाला, "तसलं नव्हं रं बाबा. ते आपलं शेतकऱ्याचं शेतात काम करण्याचं साहित्य असतंया." "मग कसलं असतं रे साहित्य?" पहिल्याचा प्रश्न.
त्यावर दुसरा म्हणाला, "अरे बाबा, आपलं शिंदे गुरुजी आहेत नव्हं! त्यांच्या डोक्यात जे विचार येतात, ते कागदावर लिहून काढतात. त्याला साहित्य म्हणतात."
साहित्यामध्ये कथा कविता नाटक निबंध असे विविध प्रकार असतात. मनोरंजन हा साहित्याचा मुख्य हेतू असतो. त्यातूनच ज्ञान आणि प्रबोधन करणे हे योगानेच येते. समाजाला दिशा देण्याचे काम साहित्य करत असते.
प्रौढ साहित्य आणि बालसाहित्य असे ढोबळमानाने साहित्याचे दोन प्रकार पडतात. मोठ्या लोकांना मनोरंजन, प्रबोधन आणि कामाच्या व्यापातून विरंगुळा म्हणून साहित्याची आवश्यकता भासते. तर बालसाहित्य हे लहान मुलांना मनोरंजनाबरोबरच ज्ञान संपादन करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. साहित्य हे मनुष्याला घडविण्याचे एक माध्यम आहे.
प्रौढ साहित्य अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकांनी लिहिलेले आहे. बालसाहित्याचे लेखन तसे कमी प्रमाणात झाले आहे. प्रौढ साहित्य लिहिणे तसे अवघड वाटत नाही; पण बालसाहित्य लिहिणे हेही सोपे वाटत नाही.
बालसाहित्याचा प्रारंभ काळ इ. सन १८०६ ते इ. सन १८५० मानला जातो. त्या काळातील बालसाहित्य स्वतंत्रपणे लिहिलेले किंवा ग्रंथ रूपात लिहिलेले नव्हते. ऋग्वेद, रामायण, महाभारत ते बुद्ध - जैन काळापर्यंत म्हणजे पाच ते सहा हजार वर्षापर्यंत प्राणीकथा, जातककथा, पंचतंत्र, हितोपदेशकथा यातून मनोरंजन आणि नीती शिक्षण दिले जात होते.
१८५० ते १९४७ पर्यंत बालसाहित्य निर्माण झाले. त्यावर इंग्रजी भाषेतील साहित्याचा प्रभाव पडलेला दिसून येतो. त्याचप्रमाणे पंचतंत्र, इसाफनीती अशा संस्कारक्षम साहित्याचा प्रभाव दिसून येतो.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य सभा पुणे या संस्थेने १९७५ सालापासून साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य सुरू केले. त्याच्या नावातील काही बदल आणि काही वेळा संस्था संस्थगित करण्यात आली होती. पण बालसाहित्य चळवळ वाढविण्याचे महान कार्य या संस्थेने आजतागायत सुरू ठेवलेले आहे.
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर ही संस्था सन १९९२ मध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर सुरू झाली. 'करी मनोरंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभुशी तयाचे' हे ब्रीद वाक्य घेऊन संस्थेची मुहुर्तमेढ रा. वा. शेवडेगुरुजी यांनी रोवली होती. श्याम कुरळेसर, प्रा. टी. आर. गुरवसर, वसंतराव निगवेकर, मुकुंदराव निगवेकर, शशिकांत महाडेश्वर, रजनी हिरळीकर डॉ. लीला पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली होती. मराठी बालकुमार साहित्य सभेने आजवर मुलांच्यासाठी बालसाहित्य लिहिण्याचे महान कार्य केलेले आहे. या सभेच्या वतीने मुलांच्यासाठी विविध कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. कथालेखन, काव्यलेखन, निबंध लेखन यांच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत. मुलांना सृजनशील बनवून त्यांच्यातून काही प्रतिनिधिक स्वरूपात कथासंग्रह व कवितासंग्रह निर्माण केलेले आहेत. आज या संस्थेने बालसाहित्याला मूर्त स्वरूप दिलेले आहे. मुकुंदराव निगवेकर यांनी जंगल आणि प्राणी यांच्या माध्यमातून मुलांच्या वरती संस्कार करणाऱ्या कथा लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर शशिकांत महाडेश्वर यांनी संस्कारक्षम बोधपर कथा लिहिलेल्या आहेत. रजनी हिरळीकर, श्याम कुरळे यानी बालसुलभ कविता लिहिलेल्या आहेत. डॉ. श्रीकांत पाटील यांनी सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल ही बालकादंबरी व झाडोरा कवितासंग्रह यातून मुलांच्या वरती संस्कार बिंबवण्याचे काम केलेले आहे. गोविंद गोडबोले यांनी चॉकलेट बुक नावाची बुक सिरीज सुरू करून लाखावर पुस्तक विक्री केलेली आहे. त्याचबरोबर त्यांनी विविध वर्तमानपत्रातून साप्ताहिक बोधकथा लिहिलेल्या आहेत. मराठी बालकुमार साहित्य सभेचे अध्यक्ष चंद्रकांत निकाडे यांनी मुलांच्यासाठी शाळा शाळांमधून जाऊन कथाकथनाची आणि काव्य लेखनाची कार्यशाळा घेतलेली आहे. मुलांना प्रेरणा द्यायची हे कार्य केलेले आहे. संभाजी चौगले, नसीम जमादार, प्रणिता तेली, परशराम आंबी, कमल कुरळे, रवींद्र खैरे, संदीप व्हनाळे, गायत्री माळी यासारख्या नवलेखकानी मुलांच्यासाठी संस्कारक्षम लेखन करून मुलांना प्रोत्साहित करण्याचे कार्य केलेले आहे. खरंच आज मुलं वाचत नाहीत असे म्हटले जाते ; पण मला हे पटत नाही. आज नवीन मुलंसुद्धा प्रतीत यश लेखन करताना दिसत आहेत. यामध्ये वैष्णवी सुतार (उंड्री) मोहर काव्यसंग्रह, अनिकेत सुतार यासारखी मुलंही संस्कारक्षम, दर्जेदार साहित्य लिहिण्याचा प्रयत्न करत आहेत.
लहान मुलं ही संस्कारक्षम असतात. हे वय संस्कार होण्याचे असते. त्यांच्यावरती पुस्तकातून संस्कार होत असतात. म्हणून बालसाहित्य लिहिणे अत्यावश्यक आहे असे माझे स्पष्ट मत आहे. आमच्या लहानपणी चांदोबा किशोर यासारखी मासिके होती. आजही किशोर मासिक प्रभावशाली निघत आहे. मन, मनगट आणि मस्तक घडवायचं असेल तर पुस्तकेच घडवू शकतात. म्हणून मुलांसाठी संस्कारक्षम पुस्तके लिहिणे आवश्यक आहे. आजही बाल साहित्यिक सुंदर संस्कारक्षम आणि मुलांच्या विचारणा प्रेरणा देणारी पुस्तके लिहीत आहेत.
मुलांमध्ये विकास आणि संस्कार असणे आवश्यक आहे असे भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले आहे. मुलांमध्ये अनुकरणशीलता आणि कल्पनाशक्ती मोठ्या प्रमाणात असते. त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे. चारित्र्याचा विकास होतो आणि ज्ञान वाढते. जग जाणून घेण्याची इच्छा व्यक्त होते. याच वयात मुलांचे जडणघडण होते. त्यासाठी चांगल्या साहित्यातून चांगले विचार मुलांच्या मनावर बिंबवले जातात आणि मुले विचार सुदृढ होत असतात. मौखिक विचारांतून आणि बडबडगीतांतून मुलांचे भावविश्व व्यापक होत जाते. शाळेत गेल्यावर बालगीतातून मुलाचे आयुष्य घडत जाते. अशावेळी संस्कारक्षम कविता आणि कथा त्याच्या वाचनात येतात. त्यातून एकप्रकारे मूल विकसित होत जाते.
"बालमनाला स्पर्श करणारी आणि त्याच्या जीवनावर सुसंस्कार करणारी स्फूर्तीदायक गोष्ट म्हणजे बालसाहित्य" असे मालती दांडेकर म्हणतात.
"बाल मनाच्या गरजा, मर्यादा आणि अपेक्षा लक्षात घेऊन लिहिलेले साहित्य म्हणजे बालसाहित्य" असे गोपीनाथ तलवळकर म्हणतात.
Comments
Post a Comment