आदर्श विद्यार्थी कथा
सोनगाव नावाचे एक गाव होतं. त्या गावात चंदू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची सखू नावाची पत्नी होती. त्या दोघांना नंदू नावाचा एक गुणी मुलगा होता. पण तो फार आळशी होता. त्याला खूप झोप असायची. सकाळी त्याला उठवताना तो उठायचा नाही. अंथरूणात पडून राहायचा. सकाळचे सात वाजून कधी गेले हे त्याला कळायचे नाही.
आज त्याचा वाढदिवस होता. तरी तो लवकर उठला नाही. त्याच्या आई-बाबांनी त्याला उठवलं नाही. सकाळचे नऊ वाजले होते. त्याला जाग आली. तो अंथरूणातून उठला. त्याची आई म्हणाली, "बाळ नंदू, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना? आजही तू लवकर उठला नाहीस. उलट खूप वेळाने उठलास."
तेव्हा नंदू म्हणाला, "आई, मला रात्री झोपताना माझ्या आठवणीत आज वाढदिवस आहे असं होतं; पण सकाळी विसरलो. आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस आहे एवढंच माझ्या लक्षात राहिलं. म्हणून मी उठलो नाही."
आई म्हणाली, "बरं. आता आटप लवकर. तुझ्या मित्रांना वाढदिवसाविषयी सांगितलेस का नाही अजून?"
" नाही."
"मग कधी सांगणार तू?"
"हे काय आई, मी आंघोळ करतो. चहा, नाश्ता घेतो. मग माझ्या मित्रांना सांगायला जातो."
नंदूनं आपलं सारं आटोपलं. तो आपल्या मित्रांना संध्याकाळी वाढदिवसासाठी येण्याचं निमंत्रण द्यायला घराबाहेर पडला. जे जे भेटतील त्या सर्वांना संध्याकाळी सात वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी निमंत्रण दिलं.
संध्याकाळचे सात वाजायला आले. घरात वाढदिवसाच्या तयारीला सुरूवात झाली होती. कुणी केक आणला. कुणी फुगे आणले. ते बांधून घेतले. चिरमुरे आणले. आईने आरती तयार केली. सगळी तयारी पूर्ण झाली. सगळे नंदूच्या भोवती जमले. ११ मेणबत्त्या पेटवल्या. कारण आज त्याचा अकरावा वाढदिवस होता. सर्वांनी एकसुरात 'हॅप्पी बर्थडे' 'हॅप्पी बर्थडे टू यू नंदू' म्हणायला सुरूवात केली. 'तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पच्चास हजार' असा एकच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव झाला.
नंदूने आपल्या सर्व मित्रांना केक, चिरमुरे, चक्की-गुडदाणी याचं वाटप केलं. त्याने चाॅकलेट दिले नाही. डॉल्बीचा वापर केला नाही. सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. घरी जाताना आपल्या प्रत्येक मित्राला नंदूने एकेक वृक्षाचे रोप दिले. त्याने सांगितले की आपण सर्वांनी या वृक्षांचे रोपण करा. त्यांचे संवर्धन करा. म्हणजे माझ्या वाढदिवसाचे सार्थक होईल. तुम्हीही सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षांचे वाटप करावे. आज याची फार आवश्यकता आहे. प्लॅस्टिक वापर टाळा. पर्यावरण रक्षण करा. चाॅकलेटऐवजी चक्की-गुडदाणी वाटप करा. मी घडलो, तुम्हीही घडा ना!
निसर्गाचा ठेवा जपून ठेवा ना!
दुसऱ्या दिवशी नंदूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची बातमी शाळेत पोहोचली. मुख्याध्यापकांनी नंदूला प्रार्थनेच्या वेळी पुढे बोलवून सत्कार केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात अकरा वृक्षांचे रोपण केले. नंदूच्या अकरा मित्रांना त्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी दिली. शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून नंदूला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
परशराम आंबी
Comments
Post a Comment