बाबा आमटे
मी आज तुम्हांला एका महामानवाची ओळख करून येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||' या उक्तीप्रमाणे वागणारे आणि 'आचारातून विचाराचा प्रचार' करणारे महामानव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके 'बाबा.' होय. बाबा आमटे.
बाबांचे पूर्ण नाव 'मुरलीधर देविदास आमटे.' त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट गावामध्ये २६ डिसेंबर १९१४ रोजी एका श्रीमंत जहागीरदार कुटुंबात झाला. १९३४ मध्ये त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९३६ मध्ये कायद्याची एल. एल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. लगेच मध्यप्रदेशातील दुर्ग येथे वकिली सुरू केली. १९४० मध्ये वडिलोपार्जित इस्टेट सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे वकिली सुरू केली. त्याबरोबर महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या साथीने १९४२ साली सुरू झालेल्या 'छोडो भारत' चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी एका विवाहित महिलेला इंग्रजी सैनिकांच्या तावडीतून सोडविले. महात्मा गांधीजींनी त्यांना 'अभय साधक' असे म्हणू लागले. त्यांना त्या काळात कारावासाही भोगावा लागला होता.
माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग घडून येतात, की त्यामुळे त्या माणसाचे सारे जीवनच बदलून जाते. त्याप्रमाणे बाबा आमटे यांना 'महामानव' बनवणारा असाच एक प्रसंग त्यांच्या जीवनात घडून आला. रस्त्याने जात असताना एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेली होती. अनेकजण त्या व्यक्तीकडे पहात होते आणि निघून जात होते. पण कोणीही त्याला मदत केली नाही. बाबा तिथून जात होते. त्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे गेले. ते जवळ गेले. त्यांनी त्याला जवळ घेतले. त्याला निरखून पाहिले. तर काय? त्या व्यक्तीच्या हाताची बोटे झडलेली होती. त्याला कुष्ठरोग झालेला होता. म्हणून त्याच्या घरातील माणसांनी त्याला घराबाहेर काढलेले होते. त्याच व्यक्तीला बाबांनी जवळ केले होते. त्याची सेवा केली. त्यातूनच 'आनंदवन' या कुष्ठरोग्यांच्या आश्रमाची स्थापना झाली. सुरुवातीला या प्रकल्पात सहा कुष्ठरोगी होते. त्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी कोलकत्ता येथे कुष्ठरोग निदानावरील अभ्यासक्रम १९४९-५० मध्ये पूर्ण केला.
खरं तर ही कुष्ठरोग्यांची सेवा करणे त्यांना फार महागात पडले. कारण त्यांची वडिलोपार्जित सर्व मालमत्ता व वरोरा जवळील गोरज येथील ४५० एकर जमिनीचा त्याग त्यांना करावा लागला. किती मोठे हे अग्निदिव्य! असे अग्निदिव्य त्यांना करावे लागले. अंगावरील कपड्यानिशी त्यांना घराबाहेर पडावे लागले होते. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी १९४९ मध्ये 'महारोगी सेवा समिती वरोरा'ची स्थापना केली. त्यांच्याकडे सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, एक आजारी गाय व पन्नास एकर बंजर झालेली जमीन सरकारने त्यांना दिली होती. या तुटपुंजा भांडवलावरच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. नापीक, पडीक जमिनीचे रूपांतर पिकाऊ शेतीत केले. कुष्ठरोग्यांना स्वावलंबी म्हणवून शेती करणे. विविध व्यवसायाची शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी आणि कुष्ठरोगी मुलांसाठी शाळा सुरू केल्या. याचबरोबर त्या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमाती राहत होत्या. त्यांच्यासाठीही विविध उपक्रम त्यांनी राबविले होते.
महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमा भागातील माडिया-गोंड जमातीसाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था करून आधुनिक समाजाची ओळख करून दिली. त्यामुळे ते लोक स्वतःला समजून घेऊ लागले.
'जे जगाकडे पाठ करतात. जग त्यांच्या पाठीशी उभे राहते. याचा प्रत्यय बाबांना आला. १९५४ साली १४ देशातील २३ भाषा बोलणारे पन्नास स्वयंसेवक वरोऱ्यात आले होते. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी दोन इमारती श्रमदानातून उभ्या केल्या. रेल्वेतील हमालांनी एक विहीर खोदून दिली.
बाबांनी सुरू केलेल्या कुष्ठरोगी, अपंग, आदिवासी लोकांच्या सेवेच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी स्वतःला झोकून देऊन हातभार लावला. अतिशय कष्टमय परिस्थितीतून शिक्षण घेऊन बाबांची मुले प्रकाश आणि विकास डॉक्टर झाले. पण त्यांनी आपले सारे आयुष्य बाबांच्या कार्यात समर्पित केले. हेमलकसा येथे डॉक्टर प्रकाश आणि त्यांची पत्नी मंदाताई यांनी आदिवासी सेवेचे व्रत घेतले. तर आनंदवनमध्येच डॉक्टर विकास आणि त्यांची पत्नी भारती यांनी सेवा सुरू केली. आदिवासींच्या सेवेबरोबरच त्यांना शिक्षणाचे धडे दिले. आदिवासींमध्ये असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा, रुढी, परंपरा नष्ट करून त्यांना आधुनिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर बाबा आमटे यांची तिसरी पिढी डॉक्टर प्रकाश यांचा मोठा मुलगा दिगंत हाही डॉक्टर होऊन हेमलकशाच्या कार्यात आपले जीवन वाहून घेतले आहे. म्हणजेच बाबांची तिसरी पिढीही समाजसेवेच्या कार्यात आपले योगदान देत आहे. १९८५ साली पंजाब पेटत असताना, स्वतंत्र खलिस्तानची मागणी होत होती. तेव्हा बाबांनी पंजाब विझवण्यासाठी 'भारत जोडो' यात्रा सुरू केली होती.
बाबांनी 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' हे काव्यसंग्रह लिहिले. 'वर्कर्स युनिव्हर्सिटी', 'सार्वजनिक संस्थांचे संचालन', 'माती जागवील त्याला मत', 'उज्ज्वल उद्यासाठी' अशी पुस्तके लिहिली.
बाबांना 'पद्मश्री', 'पद्मविभूषण', 'गांधी शांतता पुरस्कार' यासारख्या राष्ट्रीय सन्मानापासून 'डॅमिअन दाटन पुरस्कार, अमेरिका', 'मॅगसेसे पुरस्कार, फिलिपिन्स', 'जी.डी.बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार', 'युनायटेड नेशन्स मानवी हक्क पुरस्कार', 'दि टेम्पलन पुरस्कार, अमेरिका' यासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशा ह्या महामानवाचे महानिर्वाण वयाच्या ९४ व्या वर्षी शनिवार दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी झाले.
बाबा आमटे नामक महामानवाच्या चरणी नतमस्तक होताना मी त्यांच्याच शब्दात म्हणेन, "माणूस माझे नाव, माणूस माझे नाव |
दहा दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव ||
बिंदू मात्र मी शूद्र खरोखर, परी जिंकले सातही सागर |
उंच गाठला गौरीशंकर, अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव... ||"
परशराम आंबी
Comments
Post a Comment