बाबा आमटे

          मी आज तुम्हांला एका महामानवाची ओळख करून येणार आहे. संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे 'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले | तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा ||' या उक्तीप्रमाणे वागणारे आणि 'आचारातून विचाराचा प्रचार' करणारे महामानव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके 'बाबा.'  होय. बाबा आमटे. 
           बाबांचे पूर्ण नाव 'मुरलीधर देविदास आमटे.' त्यांचा जन्म वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट गावामध्ये २६ डिसेंबर १९१४ रोजी एका श्रीमंत जहागीरदार कुटुंबात झाला. १९३४ मध्ये त्यांनी बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९३६ मध्ये कायद्याची एल. एल. बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. लगेच मध्यप्रदेशातील दुर्ग येथे वकिली सुरू केली. १९४० मध्ये वडिलोपार्जित इस्टेट सांभाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे वकिली सुरू केली. त्याबरोबर महात्मा गांधी व विनोबा भावे यांच्या साथीने १९४२ साली सुरू झालेल्या 'छोडो भारत' चळवळीमध्ये सहभाग घेतला. त्यांनी एका विवाहित महिलेला इंग्रजी सैनिकांच्या तावडीतून सोडविले. महात्मा गांधीजींनी त्यांना 'अभय साधक' असे म्हणू लागले. त्यांना त्या काळात कारावासाही भोगावा लागला होता. 
           माणसाच्या जीवनात असे काही प्रसंग घडून येतात, की त्यामुळे त्या माणसाचे सारे जीवनच बदलून जाते. त्याप्रमाणे बाबा आमटे यांना 'महामानव' बनवणारा असाच एक प्रसंग त्यांच्या जीवनात घडून आला. रस्त्याने जात असताना एक व्यक्ती रस्त्याच्या कडेला पडलेली होती. अनेकजण त्या व्यक्तीकडे पहात होते आणि निघून जात होते. पण कोणीही त्याला मदत केली नाही. बाबा तिथून जात होते. त्यांचे लक्ष त्या व्यक्तीकडे गेले. ते जवळ गेले. त्यांनी त्याला जवळ घेतले. त्याला निरखून पाहिले. तर काय? त्या व्यक्तीच्या हाताची बोटे झडलेली होती. त्याला कुष्ठरोग झालेला होता. म्हणून त्याच्या घरातील माणसांनी त्याला घराबाहेर काढलेले होते. त्याच व्यक्तीला बाबांनी जवळ केले होते. त्याची सेवा केली. त्यातूनच 'आनंदवन' या कुष्ठरोग्यांच्या आश्रमाची स्थापना झाली. सुरुवातीला या प्रकल्पात सहा कुष्ठरोगी होते. त्यांची सेवा करण्यासाठी बाबांनी कोलकत्ता येथे कुष्ठरोग निदानावरील अभ्यासक्रम १९४९-५० मध्ये पूर्ण केला. 
         खरं तर ही कुष्ठरोग्यांची सेवा करणे त्यांना फार महागात पडले. कारण त्यांची वडिलोपार्जित सर्व मालमत्ता व वरोरा जवळील गोरज येथील ४५० एकर जमिनीचा त्याग त्यांना करावा लागला. किती मोठे हे अग्निदिव्य!  असे अग्निदिव्य  त्यांना करावे लागले. अंगावरील कपड्यानिशी त्यांना घराबाहेर पडावे लागले होते. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी १९४९ मध्ये 'महारोगी सेवा समिती वरोरा'ची स्थापना केली. त्यांच्याकडे सहा कुष्ठरोगी, १४ रुपये रोख, एक आजारी गाय व पन्नास एकर बंजर झालेली जमीन सरकारने त्यांना दिली होती. या तुटपुंजा भांडवलावरच त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली. नापीक, पडीक जमिनीचे रूपांतर पिकाऊ शेतीत केले. कुष्ठरोग्यांना स्वावलंबी म्हणवून शेती करणे. विविध व्यवसायाची शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली कुष्ठरोगातून मुक्त झालेल्यांसाठी आणि कुष्ठरोगी मुलांसाठी शाळा सुरू केल्या. याचबरोबर त्या भागात मोठ्या प्रमाणात आदिवासी जमाती राहत होत्या. त्यांच्यासाठीही विविध उपक्रम त्यांनी राबविले होते. 
          महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि मध्यप्रदेशच्या सीमा भागातील माडिया-गोंड जमातीसाठी अनौपचारिक शिक्षणाची व्यवस्था करून आधुनिक समाजाची ओळख करून दिली. त्यामुळे ते लोक स्वतःला समजून घेऊ लागले. 
          'जे जगाकडे पाठ करतात. जग त्यांच्या पाठीशी उभे राहते. याचा प्रत्यय बाबांना आला. १९५४ साली १४ देशातील २३ भाषा बोलणारे पन्नास स्वयंसेवक वरोऱ्यात आले होते. त्यांनी कुष्ठरोग्यांसाठी दोन इमारती श्रमदानातून उभ्या केल्या. रेल्वेतील हमालांनी एक विहीर खोदून दिली. 
          बाबांनी सुरू केलेल्या कुष्ठरोगी, अपंग, आदिवासी लोकांच्या सेवेच्या कार्यामध्ये त्यांच्या पत्नी साधनाताई यांनी स्वतःला झोकून देऊन हातभार लावला. अतिशय कष्टमय परिस्थितीतून शिक्षण घेऊन बाबांची मुले प्रकाश आणि विकास डॉक्टर झाले. पण त्यांनी आपले सारे आयुष्य बाबांच्या कार्यात समर्पित केले. हेमलकसा येथे डॉक्टर प्रकाश आणि त्यांची पत्नी मंदाताई यांनी आदिवासी सेवेचे व्रत घेतले. तर आनंदवनमध्येच डॉक्टर विकास आणि त्यांची पत्नी भारती यांनी सेवा सुरू केली. आदिवासींच्या सेवेबरोबरच त्यांना शिक्षणाचे धडे दिले. आदिवासींमध्ये असणाऱ्या अनेक अंधश्रद्धा, रुढी, परंपरा नष्ट करून त्यांना आधुनिक दृष्टिकोन देण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर बाबा आमटे यांची तिसरी पिढी डॉक्टर प्रकाश यांचा मोठा मुलगा दिगंत हाही डॉक्टर होऊन हेमलकशाच्या कार्यात आपले जीवन वाहून घेतले आहे. म्हणजेच बाबांची तिसरी पिढीही समाजसेवेच्या कार्यात आपले योगदान देत आहे. १९८५ साली पंजाब पेटत असताना, स्वतंत्र खलिस्तानची मागणी होत होती. तेव्हा बाबांनी पंजाब विझवण्यासाठी 'भारत जोडो' यात्रा सुरू केली होती. 
            बाबांनी 'ज्वाला आणि फुले', 'करुणेचा कलाम' हे काव्यसंग्रह लिहिले. 'वर्कर्स युनिव्हर्सिटी', 'सार्वजनिक संस्थांचे संचालन', 'माती जागवील त्याला मत', 'उज्ज्वल उद्यासाठी' अशी पुस्तके लिहिली.
           बाबांना 'पद्मश्री', 'पद्मविभूषण', 'गांधी शांतता पुरस्कार' यासारख्या राष्ट्रीय सन्मानापासून 'डॅमिअन दाटन पुरस्कार, अमेरिका', 'मॅगसेसे पुरस्कार, फिलिपिन्स', 'जी.डी.बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार', 'युनायटेड नेशन्स मानवी हक्क पुरस्कार', 'दि टेम्पलन पुरस्कार, अमेरिका' यासारखे आंतरराष्ट्रीय पुरस्कारही त्यांना प्राप्त झालेले आहेत. अशा ह्या महामानवाचे महानिर्वाण वयाच्या ९४ व्या वर्षी शनिवार दिनांक ९ फेब्रुवारी २००८ रोजी झाले. 
          बाबा आमटे नामक महामानवाच्या चरणी नतमस्तक होताना मी त्यांच्याच शब्दात म्हणेन, "माणूस माझे नाव, माणूस माझे नाव | 
दहा दिशांच्या रिंगणात यापुढे माझी धाव ||
बिंदू मात्र मी शूद्र खरोखर, परी जिंकले सातही सागर |
 उंच गाठला गौरीशंकर, अग्नियान मम घेत चालले आकाशाचा ठाव... ||"
                         परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी