नंदूचा वाढदिवस

सोनगाव नावाचे एक गाव होतं. त्या गावात चंदू नावाचा एक शेतकरी राहत होता. त्याची सखू नावाची पत्नी होती. त्या दोघांना नंदू नावाचा एक गुणी मुलगा होता. पण तो फार आळशी होता. त्याला खूप झोप असायची. सकाळी त्याला उठवताना तो उठायचा नाही. अंथरूणात पडून राहायचा. सकाळचे सात वाजून कधी गेले हे त्याला कळायचे नाही. 
          आज त्याचा वाढदिवस होता. तरी तो लवकर उठला नाही. त्याच्या आई-बाबांनी त्याला उठवलं नाही. सकाळचे नऊ वाजले होते. त्याला जाग आली. तो अंथरूणातून उठला. त्याची आई म्हणाली, "बाळ नंदू, अरे आज तुझा वाढदिवस आहे ना? आजही तू लवकर उठला नाहीस. उलट खूप वेळाने उठलास." 
तेव्हा नंदू म्हणाला, "आई, मला रात्री झोपताना माझ्या आठवणीत आज वाढदिवस आहे असं होतं; पण सकाळी विसरलो. आज रविवार  आहे आणि सुट्टीचा दिवस आहे एवढंच माझ्या लक्षात राहिलं. म्हणून मी उठलो नाही." 
आई म्हणाली, "बरं. आता आटप लवकर. तुझ्या मित्रांना वाढदिवसाविषयी सांगितलेस का नाही अजून?" 
" नाही."
"मग कधी सांगणार तू?"
"हे काय आई, मी आंघोळ करतो. चहा, नाश्ता घेतो. मग माझ्या मित्रांना सांगायला जातो."
           नंदूनं आपलं सारं आटोपलं. तो आपल्या मित्रांना संध्याकाळी वाढदिवसासाठी येण्याचं निमंत्रण द्यायला घराबाहेर पडला. जे जे भेटतील त्या सर्वांना संध्याकाळी सात वाजता वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी येण्यासाठी निमंत्रण दिलं. 
         संध्याकाळचे सात वाजायला आले. घरात वाढदिवसाच्या तयारीला सुरूवात झाली होती. कुणी केक आणला. कुणी फुगे आणले. ते बांधून घेतले. चिरमुरे आणले. आईने आरती तयार केली. सगळी तयारी पूर्ण झाली. सगळे नंदूच्या भोवती जमले. ११ मेणबत्त्या पेटवल्या. कारण आज त्याचा अकरावा वाढदिवस होता. सर्वांनी एकसुरात 'हॅप्पी बर्थडे' 'हॅप्पी बर्थडे टू यू नंदू' म्हणायला सुरूवात केली. 'तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पच्चास हजार' असा एकच वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव झाला. 
          नंदूने आपल्या सर्व मित्रांना केक, चिरमुरे, चक्की-गुडदाणी याचं वाटप केलं. त्याने चाॅकलेट दिले नाही. डॉल्बीचा वापर केला नाही. सर्वांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. घरी जाताना आपल्या प्रत्येक मित्राला नंदूने एकेक वृक्षाचे रोप दिले. त्याने सांगितले की आपण सर्वांनी या वृक्षांचे रोपण करा. त्यांचे संवर्धन करा. म्हणजे माझ्या वाढदिवसाचे सार्थक होईल. तुम्हीही सर्वांनी वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षांचे वाटप करावे. आज याची फार आवश्यकता आहे. प्लॅस्टिक वापर टाळा. पर्यावरण रक्षण करा. चाॅकलेटऐवजी चक्की-गुडदाणी वाटप करा. मी घडलो, तुम्हीही घडा ना! 
निसर्गाचा ठेवा जपून ठेवा ना! 
           दुसऱ्या दिवशी नंदूच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाची बातमी शाळेत पोहोचली. मुख्याध्यापकांनी नंदूला प्रार्थनेच्या वेळी पुढे बोलवून सत्कार केला. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात अकरा वृक्षांचे रोपण केले. नंदूच्या अकरा मित्रांना त्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारी दिली. शाळेचा आदर्श विद्यार्थी म्हणून नंदूला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी