विजय
*विजय*
एक आटपाट नावाचं नगर होतं. त्या नगरात एक भलं मोठं तळं होतं. त्या तळ्यात खूप खूप वर्षापासून बेडकांची वस्ती होती. आजोबा, आजी, वडील, आई, नातू, नात असा परिवार असलेली अशी अनेक कुटुंबे समाधानाने राहत होती.
तळ्याच्या काठावर एक मोबाईलचा टॉवर उभारला होता. सारे बेडूक त्या टॉवरकडे उत्सुकतेने पाहत होते. पण काही पिलांना माणसांनी हे नवीन काय उभे केले आहे, ते जाणून घेण्याची खूपच उत्सुकता लागली होती. मोठ्यांचा डोळा चुकवून आपण या टॉवरवर जाऊ या याबाबत चर्चा सुरू झाली होती. पण ते आपणाला जाऊ देतील का? याची भीती होती. खरंच ते ऐकून मोठे व जाणते बेडूक मात्र धास्तावलेले होते. हे तळं म्हणजे त्यांचं विश्व होतं. त्या तळ्याच्या बाहेर कुणीही गेले नव्हते. बाहेरच्या जगाचा त्यांना अनुभव नव्हता.
वीरू, राहुल, सौरभ आणि सचिन या नावाची बेडकांची पिल्लं फारच बिलंदर होती. धाडसी होती. नव्या विचारांची होती. त्यांना मोठ्यांचे विचार कधीच पटत नव्हते. ती आपल्या पालकांना नेहमी म्हणत होती, "या तळ्याच्या बाहेर पडायला हवे. जगात काय चालू आहे ते पाहायला हवे. त्याशिवाय आपल्याला माणसांच्या जगातली माहिती कशी मिळणार? आणि आपली प्रगती कशी होणार?"
यावर राहुलचा बाप म्हणाला, "मग तुम्ही आता काय करायचं ठरवलंय?"
यावर सचिन म्हणाला, "आम्ही ठरवलंय की माणसांनी तळ्याकाठी उभारलेल्या त्या टॉवरवर चढायचं."
वीरूचा बाप म्हणाला, "पोरांनो असा वेडेपणा करू नका. जे आपल्या आवाक्यात नाही. त्याचा आपण नाद करू नये. असा कराल नाद तर व्हाल बाद. आपल्या राज्यात अजूनपर्यंत असं कोणी केलेलं नाही. मी तुम्हांला बजावून सांगतो की असं तुम्ही काहीही करू नका. आपलं जग सोडून बाहेर पडू नका तुमचं धाडस अंगाशी येईल. तुम्हाला तुमचा जीव गमावून बसावं लागेल."
राहुल म्हणाला, "तुम्ही आम्हांला अडवू नका. आमचा निश्चय पक्का झाला आहे. आम्ही जाणारच."
मुले ऐकून घेत नाही म्हटल्यावर सर्वात वयस्कर रामूनाना म्हणाला, " आपण सर्वांनी सांगून पाहिले. पण कुणाचेच ऐकत नाहीत. आज-कालच्या या तरुण पोरांना काही सांगायची सोय राहिलीच नाही. ती आपलं खरं करणारच. जाऊ दे त्यांना. रक्त सळसळते ना त्यांचं. घेऊ द्या अनुभव एकदा त्यांना. कारण अनुभवाशिवाय दुसरा गुरु नाही असं म्हणतात तेच खरं. ठेच लागल्याशिवाय शहाणपण यायचा नाही त्यांना."
आणि खरोखरच तो दिवस उजाडला. आपल्या शूरवीरांचा पराक्रम पाहण्यासाठी तळ्यातील सर्वजण त्या टाॅवरजवळ जमली. प्रत्येकाला आतुरता वाटत होती. चौघेही आपापल्या तयारीनिशी आपल्या मोहिमेवर जाण्यासाठी सज्ज झाली. सर्वात पुढे सचिन, त्याच्यामागे सौरभ, पाठोपाठ राहुल आणि पाठीमागे विरू होता. इकडं त्यांच्या आयाने ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली. एकमेकींच्या पोराच्या नावानं त्या बोटं मोडायला लागल्या. 'त्याच्यामुळे माझं पोर बिघडलं', 'त्याच्यामुळे माझं पोर कामातून गेलं', 'माझं पोर फार कुणाचं पण दुसऱ्याच्या संगतीने बिघडलं' असे अनेक संवाद सुरू झाले होते. काही पुरुष मंडळींनीही त्यांची री ओढायला सुरुवात केली. 'आजकालची पोरं फारच बिघडलीत,' 'थोरा-मोठ्यांचं काहीच ऐकत नाहीत.', 'मनाला येईल तशी वागतात,' 'यांना जाऊ नको म्हटलं तरी निघालीत,' 'पराक्रम गाजवायला निघालीत,' 'जे आपल्या हातात नाही त्याचा पाठलाग कशाला करायचा?' 'एक-एक जण हात-पाय मोडून माघारी फिरतील.' मनात येईल तशी बडबड सुरू होती.
त्या ठिकाणी उपस्थित असलेला जाणता व समजदार शामूतात्या म्हणाला, "अरे थांबा. तुम्हाला काही करता येत नसेल तर करू नका. मात्र दुसऱ्याबद्दल चांगलं तरी बोला. किमान गप्प तरी बसा.
एव्हाना वीरांची चढाई सुरू झाली होती. सर्वात मागे असलेला विरू हा गलका ऐकत टॉवरच्या दोन पायऱ्या चढून वर गेला होता. पण या संवादामुळे त्याचं मन विचलित झाले. त्याचे पाय लटलट कापायला लागलेत. त्याला पुढे सरकता येईना. त्याचे दोन्ही हात निसटले. दुसऱ्या पायरीवरून तो खाली पडला. त्याचे दोन्ही पाय मोडले. सर्वजण जवळ जाऊन पाहता तर काय? तो जमिनीवर पडलेला! एकदम गोंधळ सुरू झाला. त्याच्या आईने आक्रोश केला.
'तरी आम्ही याला म्हणत होतो असलं जगावेगळं धाडस करू नको,' 'मोडला ना पाय,' 'मिळाली ना शिक्षा,' 'भोगा आता आपल्या कर्माची फळं.' गर्दीतून असे संवाद ऐकू येत होते.
वीरू खाली पडला. तेव्हा जमलेले सर्व तिघांना खाली बोलवू लागले. "अरे बाबांनो, खाली या. एकानं पाय मोडून घेतले आहेत. तुम्ही आणखी वर जाऊ नका. पडलात तर पायाबरोबर हातही गमावून बसावं लागेल. काय आश्चर्य! कसातरी दहा पायरी चढून वर गेलेला राहुल अचानक खाली पडला. त्याचे पाय आणि हातही मोडला. नुसतं धड तेवढे शिल्लक राहिलं होतं.
पुन्हा आरडाओरडा झाला. "अरे सौरभ, सचिन तुम्ही तरी खाली या." सगळे ओरडत होते. क्षीण आवाजात सौरभला ऐकू येत होते. त्याने मागे पाहिले तर राहुल, वीरू दिसले नाहीत. तो सोळाव्या पायरीवर पोहोचला होता. तो बावरला होता. त्याच्या हातापायातली शक्ती गेली होती. त्याचं शरीर थंड झाल्याचं त्याला जाणवायला लागलं. तसा तो खाली कोसळला. मग एकच हलकल्लोळ माजला.
सर्वजण गळ्याशी प्राण आणून ओरडत होते. सचिनला खाली बोलावत होते. सचिनने तिकडे लक्ष दिले नाही. कारण त्याला आपले लक्ष्य गाठायचे होते. त्याने आपल्याच नादात टॉवरची शेवटची २१ वी पायरी सर केली होती. कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष न देता तो वर पोहोचला होता. टाॅवरच्या अगदी लाल दिव्याजवळ पोहोचला होता. त्याने आपले ध्येय गाठले होते. विजयाच्या धुंदीत बेहोष झाला होता. आपले ईप्सित पूर्ण केले होते. यशस्वीतेनंतर त्याने खाली पाहिले. त्याला दिसत होते की सगळेजण त्याचा जयघोष करत होते. सचिन जिंदाबाद..सचिन जिंदाबाद...सचिन जिंदाबाद.... हे संभाषण त्याला ऐकू जात नव्हते. तरी सर्वांचा जल्लोष पाहून त्याला आनंद झाला होता. त्याने आपली हाताची दोन बोटे उंच करून सर्वांना विजयाची खूण केली होती.
Comments
Post a Comment