माझी मराठी माझी जबाबदारी

🔴 *माझी मराठी माझी जबाबदारी.*
======================
        मराठी ही आमची मायबोली असून तिची गोडी हवी आहे. मराठीच्या समृद्धीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानदेवापासून अलीकडच्या काळातील नव साहित्यिकांच्या पर्यंत अनेक कवी, लेखकांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. मराठीला ग्रांथिक आकार दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मायबोली मराठीचे सुपुत्र आणि आपला लढा उभारला. त्याचीच परिमिती म्हणून एक मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
            संतांबरोबर पंडित कवी, शाहीर कवींनी मराठीत ग्रंथरचना करून लोकांना अध्यात्म काव्यपरिचय करून दिला. आणि पोवाड्यांची रचना करून मराठीचा झरा अखंड ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच काळात अनेक आक्रमणांनी इथला भाग जिंकून घेतला. भाषिक आक्रमणे ही मराठीवर झालीत. अनेक परकीय आणि परभाषीय शब्द मराठीत स्थिरावले. संत एकनाथांना तर ज्ञानेश्वरीची पाठ्यशुद्ध प्रत तयार करावी लागली. पण मूळचीच रसाळ, मधाळ असणाऱ्या मराठी भाषेने या प्रतिकूल आणि संभ्रमाच्या काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. 
       १८१८ साली मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि  इंग्रजांचे राज्य आले. याच काळात येथील पिढीला शिक्षणाची गोडी लागली.  त्यांच्या सहवासाने अनेक इंग्रजी कवी-लेखकांचे साहित्य इथल्या पिढीच्या वाचनात आले. कथा, कविता, नाटक, चरित्र, इतिहास लेखन या रचना प्रकारांचा त्यातील आकृतिबंधाचा परिणाम इथल्या ग्रंथकरांवर झाला. अव्वल इंग्रजी काळात स्वांत सुखासाठी आणि लोकप्रबोधनासाठी मराठी माणूस लिहू लागला. आपल्या व्यथा, वेदना, घटना, प्रसंग आपल्या साहित्य प्रकारातून मांडू लागला. सामाजिक समस्यांचा वांग्मयामध्ये आविष्कार करणाऱ्या अनेक साहित्यकृतींचा जन्म झाला. मराठीने आपले अस्तित्व भाषा संप्रेषणाबरोबर साहित्य चळवळीतूनही टिकवून ठेवले.
             पूर्वीच्या काळी अक्षरे धुळीत गिरवली जायचे. त्यामुळे त्यांना जोडाक्षरे म्हणायचे. हळूहळू गुरुकुले, देवळे, मठातून शाळा भरायच्या. पुढे स्वतंत्र शाळांची उभारणी झाली. *मुळाक्षरे मुळाक्षरांच्या रूपात पाटील जाऊ लागली* शाळा महाविद्यालयातून मराठीचे अध्ययन व अध्यापन होऊ लागले. रसग्रहण, कवितेतील सौंदर्य, बोलीभाषेची वैशिष्ट्ये, वृत्तालंकारांचा साज नवशिक्षितांच्या नजरेसमोर आला. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे याची अंमलबजावणी झाली. परिणामी अनेक भाषिक आक्रमणे पचवून मराठी पुन्हा जनसंवादाबरोबर अध्ययन अध्यापनासाठी वापरली जाऊ लागली.
       'हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू'
भाषा संवर्धन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.
         आपल्या घरी-दारी, समाजात, शासकीय कार्यालयात आपण प्राधान्याने मराठीचा वापर करतो. पण दुर्दैवाने पालकांच्या इच्छेनुसार मुलांना मात्र इंग्रजी शाळेत दाखल करतो. आज गावागावांत मराठी शाळा ओस पडत चाललेल्या असून इंग्रजी शाळांचे पेव फुटत आहे. तसेच मराठी शाळांतून सेमी माध्यमाच्या नावाखाली विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जात आहेत. बालकुमारांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून होत असेल तर त्यांना मराठीचे आकलन, वाचन प्रकटन, संवाद ही कौशल्ये कशी आत्मसात करता येणार याची चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच बालवयात मातृभाषेतून संज्ञा व संबोध जेवढे समजतात तेवढे इतर भाषेतून आकलन कक्षेत येत नाही याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे ते जागतिक समूह संपर्काची भाषा आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण मराठी ही आपली मातृभाषा आहे ही जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे याकडे सर्वांनीच लक्ष देणे अपेक्षित आहे. 
          व्याकरण हा मराठी भाषेचा पाया आहे. व्याकरण हे हे सुगम आणि आकलन सुलभ आहे. पण उगीचच व्याकरण विषयक घटकांचा बाऊ करून एक अनामिक भीती निर्माण केली जाते. वर्षानुवर्षे तीच तीच उदाहरणे दिल्यामुळे त्यांनी रस शुष्क वाटू लागते, यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावरील अध्यापक बंधू भगिनींनी व्याकरण सुलभ, सोप्या पद्धतीने व आपल्या अनुभव कक्षेतील उदाहरणे देऊन शिकविले पाहिजे. एकंदरीत विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागली पाहिजे.
         मराठीच्या संवर्धनासाठी आपण कुटुंबात, समाजात, कार्यालयात आपल्या भाषेतून संवाद साधला पाहिजे. कार्यालयीन कामकाजात मराठीचा अग्रक्रमाने वापर केला पाहिजे. मराठी शाळांमध्ये आपली मुले पाठवून त्यांना ऊर्जेतावस्था प्राप्त करून दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या दुकानावरील पाट्या स्वयंस्फूर्तीने मराठीत लावून आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा यासाठी अग्रक्रमाने पसंती देऊन त्यांना जगवले पाहिजे. ग्रंथालयात मराठी साहित्यातील सर्व प्रकारचे वांग्मय उपलब्ध करून त्याकडे वाचक वर्ग कशाप्रकारे आकर्षित होईल याबाबत लक्ष दिले गेले पाहिजे. एकंदरीत कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक,  शैक्षणिक विभागात प्राधान्यानेच नव्हे तर अनिवार्यपणे मराठीचा वापर करून मराठीचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपण स्वयंस्फूर्तीने पार पडली पाहिजे.
            मराठीची पूर्वपीठिका, त्याचे प्रमाण, वारसा समृद्ध आणि विशाल-विपुल अशी साहित्य परंपरा पुढील पिढीकडे संक्रमित करण्याची जबाबदारी ओळखून नव्या पिढीतून सकस बोलणारे वक्ते व समृद्ध साहित्याची निर्मिती करणारे लेखक यांना प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य हे आपण पार पडले पाहिजे .
 माझा मराठीची बोलू कौतिके           परी अमृतातेही पैजा जिंके
 ऐसी अक्षरे रसिके 
 मेळविण |
           मराठीचा पाया रचणाऱ्या ज्ञानदेवांना तिचा आपल्या लेखन कार्यासाठी अवलंब करून वैभव प्राप्त करून देणाऱ्या वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे व या परंपरेतील अन्य साहित्यिकांनी निर्माण केलेला हा चिरंतन वारसा आपण जपूया. नव्या पिढीबरोबर, भाषिक संस्काराबरोबर, श्रवण संस्कार, वाचन संस्कार, लेखन संस्कार करूया. दैनंदिन व्यवहारासाठी मराठीचा जागर धरूया व आपली जबाबदारी पार पाडूया. 
        डॉ श्रीकांत श्रीपती पाटील.
  राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक.
राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.

Comments

Popular posts from this blog

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी