माझी मराठी माझी जबाबदारी
🔴 *माझी मराठी माझी जबाबदारी.*
======================
मराठी ही आमची मायबोली असून तिची गोडी हवी आहे. मराठीच्या समृद्धीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानदेवापासून अलीकडच्या काळातील नव साहित्यिकांच्या पर्यंत अनेक कवी, लेखकांनी आपली लेखणी झिजवलेली आहे. मराठीला ग्रांथिक आकार दिला आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी मायबोली मराठीचे सुपुत्र आणि आपला लढा उभारला. त्याचीच परिमिती म्हणून एक मे १९६० रोजी स्वतंत्र मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली.
संतांबरोबर पंडित कवी, शाहीर कवींनी मराठीत ग्रंथरचना करून लोकांना अध्यात्म काव्यपरिचय करून दिला. आणि पोवाड्यांची रचना करून मराठीचा झरा अखंड ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे. याच काळात अनेक आक्रमणांनी इथला भाग जिंकून घेतला. भाषिक आक्रमणे ही मराठीवर झालीत. अनेक परकीय आणि परभाषीय शब्द मराठीत स्थिरावले. संत एकनाथांना तर ज्ञानेश्वरीची पाठ्यशुद्ध प्रत तयार करावी लागली. पण मूळचीच रसाळ, मधाळ असणाऱ्या मराठी भाषेने या प्रतिकूल आणि संभ्रमाच्या काळात आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे.
१८१८ साली मराठी सत्तेचा ऱ्हास झाला आणि इंग्रजांचे राज्य आले. याच काळात येथील पिढीला शिक्षणाची गोडी लागली. त्यांच्या सहवासाने अनेक इंग्रजी कवी-लेखकांचे साहित्य इथल्या पिढीच्या वाचनात आले. कथा, कविता, नाटक, चरित्र, इतिहास लेखन या रचना प्रकारांचा त्यातील आकृतिबंधाचा परिणाम इथल्या ग्रंथकरांवर झाला. अव्वल इंग्रजी काळात स्वांत सुखासाठी आणि लोकप्रबोधनासाठी मराठी माणूस लिहू लागला. आपल्या व्यथा, वेदना, घटना, प्रसंग आपल्या साहित्य प्रकारातून मांडू लागला. सामाजिक समस्यांचा वांग्मयामध्ये आविष्कार करणाऱ्या अनेक साहित्यकृतींचा जन्म झाला. मराठीने आपले अस्तित्व भाषा संप्रेषणाबरोबर साहित्य चळवळीतूनही टिकवून ठेवले.
पूर्वीच्या काळी अक्षरे धुळीत गिरवली जायचे. त्यामुळे त्यांना जोडाक्षरे म्हणायचे. हळूहळू गुरुकुले, देवळे, मठातून शाळा भरायच्या. पुढे स्वतंत्र शाळांची उभारणी झाली. *मुळाक्षरे मुळाक्षरांच्या रूपात पाटील जाऊ लागली* शाळा महाविद्यालयातून मराठीचे अध्ययन व अध्यापन होऊ लागले. रसग्रहण, कवितेतील सौंदर्य, बोलीभाषेची वैशिष्ट्ये, वृत्तालंकारांचा साज नवशिक्षितांच्या नजरेसमोर आला. प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले पाहिजे याची अंमलबजावणी झाली. परिणामी अनेक भाषिक आक्रमणे पचवून मराठी पुन्हा जनसंवादाबरोबर अध्ययन अध्यापनासाठी वापरली जाऊ लागली.
'हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडू'
भाषा संवर्धन करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. नव्हे ते आपले कर्तव्यच आहे.
आपल्या घरी-दारी, समाजात, शासकीय कार्यालयात आपण प्राधान्याने मराठीचा वापर करतो. पण दुर्दैवाने पालकांच्या इच्छेनुसार मुलांना मात्र इंग्रजी शाळेत दाखल करतो. आज गावागावांत मराठी शाळा ओस पडत चाललेल्या असून इंग्रजी शाळांचे पेव फुटत आहे. तसेच मराठी शाळांतून सेमी माध्यमाच्या नावाखाली विज्ञान व गणित हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकवले जात आहेत. बालकुमारांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जर इंग्रजी माध्यमातून होत असेल तर त्यांना मराठीचे आकलन, वाचन प्रकटन, संवाद ही कौशल्ये कशी आत्मसात करता येणार याची चर्चा होणे अपेक्षित आहे. तसेच बालवयात मातृभाषेतून संज्ञा व संबोध जेवढे समजतात तेवढे इतर भाषेतून आकलन कक्षेत येत नाही याचा पालकांनी विचार करणे गरजेचे आहे. इंग्रजी हे वाघिणीचे दूध आहे ते जागतिक समूह संपर्काची भाषा आहे याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. पण मराठी ही आपली मातृभाषा आहे ही जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे याकडे सर्वांनीच लक्ष देणे अपेक्षित आहे.
व्याकरण हा मराठी भाषेचा पाया आहे. व्याकरण हे हे सुगम आणि आकलन सुलभ आहे. पण उगीचच व्याकरण विषयक घटकांचा बाऊ करून एक अनामिक भीती निर्माण केली जाते. वर्षानुवर्षे तीच तीच उदाहरणे दिल्यामुळे त्यांनी रस शुष्क वाटू लागते, यासाठी शाळा महाविद्यालय स्तरावरील अध्यापक बंधू भगिनींनी व्याकरण सुलभ, सोप्या पद्धतीने व आपल्या अनुभव कक्षेतील उदाहरणे देऊन शिकविले पाहिजे. एकंदरीत विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागली पाहिजे.
मराठीच्या संवर्धनासाठी आपण कुटुंबात, समाजात, कार्यालयात आपल्या भाषेतून संवाद साधला पाहिजे. कार्यालयीन कामकाजात मराठीचा अग्रक्रमाने वापर केला पाहिजे. मराठी शाळांमध्ये आपली मुले पाठवून त्यांना ऊर्जेतावस्था प्राप्त करून दिली पाहिजे. सर्व प्रकारच्या दुकानावरील पाट्या स्वयंस्फूर्तीने मराठीत लावून आपली मराठी अस्मिता जपली पाहिजे. मराठी नाटक, सिनेमा यासाठी अग्रक्रमाने पसंती देऊन त्यांना जगवले पाहिजे. ग्रंथालयात मराठी साहित्यातील सर्व प्रकारचे वांग्मय उपलब्ध करून त्याकडे वाचक वर्ग कशाप्रकारे आकर्षित होईल याबाबत लक्ष दिले गेले पाहिजे. एकंदरीत कौटुंबिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विभागात प्राधान्यानेच नव्हे तर अनिवार्यपणे मराठीचा वापर करून मराठीचे जतन आणि संवर्धन करण्याची जबाबदारी आपण स्वयंस्फूर्तीने पार पडली पाहिजे.
मराठीची पूर्वपीठिका, त्याचे प्रमाण, वारसा समृद्ध आणि विशाल-विपुल अशी साहित्य परंपरा पुढील पिढीकडे संक्रमित करण्याची जबाबदारी ओळखून नव्या पिढीतून सकस बोलणारे वक्ते व समृद्ध साहित्याची निर्मिती करणारे लेखक यांना प्रोत्साहन देण्याचे कर्तव्य हे आपण पार पडले पाहिजे .
माझा मराठीची बोलू कौतिके परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके
मेळविण |
मराठीचा पाया रचणाऱ्या ज्ञानदेवांना तिचा आपल्या लेखन कार्यासाठी अवलंब करून वैभव प्राप्त करून देणाऱ्या वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे व या परंपरेतील अन्य साहित्यिकांनी निर्माण केलेला हा चिरंतन वारसा आपण जपूया. नव्या पिढीबरोबर, भाषिक संस्काराबरोबर, श्रवण संस्कार, वाचन संस्कार, लेखन संस्कार करूया. दैनंदिन व्यवहारासाठी मराठीचा जागर धरूया व आपली जबाबदारी पार पाडूया.
डॉ श्रीकांत श्रीपती पाटील.
राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक.
राज्य शासन पुरस्कार प्राप्त लेखक.
Comments
Post a Comment