कडेलूट - सचिन वसंत पाटील कर्नाळ-सांगली

*मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम मांडणारी कादंबरी: कडेलूट*
                                 - सचिन वसंत पाटील 

        समकालीन मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांना ओळखले जाते. आजवर त्यांच्या प्रकाशित झालेल्या लाॅकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या बहुचर्चित कादंबऱ्यातून ते सिद्धच झाले आहे. त्यांची पहिली कादंबरी 'लॉकडाऊन' ही नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारामुळे त्याचे माणसांवर, मानवी मनावर, पशुपक्षांवर, एकूणच पृथ्वीवर, शेती संस्कृतीवर काय काय दुष्परिणाम झाले आहेत आणि कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? हे सांगणारी आहे. तर 'ऊसकोंडी' ही त्यांची दुसरी कादंबरी ऊस उत्पादक शेतकर्‍याचा संघर्ष मांडणारी आहे. साखर कारखानदार, मजूर आणि एकूणच व्यवस्था यांचं वास्तव चित्र रेखाटणारी आहे. तर गतवर्षी प्रकाशित झालेली 'पाणीफेरा' ही कादंबरी महापुरांमुळे हैराण झालेल्या माणसांचे दुःख समोर आणणारी आहे. नदीकाठच्या गावातील माणसांचे दुःख, व्यथा वेदना दाखवणारी आहे.
        डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. अख्खी हयात गाव-खेड्यात गेल्याने अवती-भवतीचा परिसर, निसर्ग, राजकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेतीसंस्कृती यांचा चांगला अभ्यास त्यांना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना त्यांना अस्वस्थ करतात. ग्रामसंस्कृतीवर होणारी आसमानी, सुलतानी आक्रमणांमुळे त्यांच्यातील लेखक अस्वस्थ होतो. याच अस्वस्थेतून त्यांचे लेखन होत असावे. 
        प्रस्तुत 'कडेलूट' ही निसर्गावर होणाऱ्या मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणारी दमदार कादंबरी संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी मराठी वाचकांच्या भेटीस आणली आहे. प्रकाशिका डॉ. सुनिताराजे पवार यांनी टाईपसेटिंग, मांडणी, कागद, समर्पक मुखपृष्ठ, मजबूत बांधणी याकडे बारकाईने लक्ष देवून  अतिशय सुंदर व आकर्षक स्वरूपात ती सादर केली आहे. या कादंबरीमध्ये डॉ. पाटील यांनी मानवी आक्रमणामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी वाढ याकडे संशोधक, निसर्ग अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले आहे. निसर्ग हा वेळोवेळी संकेत देत असतो, त्याकडे दुर्लक्ष केले की मानवी जीवित व वित्त हानी ही हमखास ठरलेली. या कादंबरीमध्ये निसर्गाने दिलेले काही संकेत, इशारे उदघृत होतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर विनाश अटळ आहे, हेच पाटील यांना सांगावयाचे आहे. ही कादंबरी फक्त समस्या मांडून थांबत नाही तर त्या समस्येच्या मुळाशी जाऊन, चहूअंगांनी विचार करून त्यावर उपाय सुचविते. कादंबरीतील पात्रांकडून, उपपात्रांकडून त्यांच्या वैचारीक कृतींतून लेखकाचा उद्देश अधोरेखित करते. हेच या कादंबरीचे वेगळेपण आहे.  
         अलिकडच्या काळात होणारे अतिपाऊस, अवकाळी, महापूर, भूकंप, भूस्खलन किंवा डोंगर खचून नष्ट होणारी मानवी वस्ती, त्यांची घरे, संपत्ती या घटना फार मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. त्याचे कारण निसर्गावर मानवाचे आक्रमण, त्याने केलेली भयानक वृक्षतोड, आणि प्रदुषण ही आहेत, हे कादंबरी वाचताना लक्षात येते. 
        कादंबरीची पात्ररचना करताना डॉ. पाटील यांनी विशेष भान राखले आहे. देशात सत्तर टक्के लोक शेती करतात तर त्याहून अधिक लोक खेड्यात राहतात. हा खेड्यातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य सेवा उद्योग व्यवसाय करणारा दुकानदार, टपरीवाला, हाॅटेलवाला हा गावातील माणूस नायक, उपनायक म्हणून त्यांच्या डोळ्यांसमोर आहे. लेखक स्वतः खेडे गावात राहत असल्याने खेडूताची मानसिकता, राहणीमान, चांगुलपणा, निसर्ग जपण्यासाठीची धडपड ही समकालीन पीढीची आहे. म्हणून कादंबरीचा नायक तुकाराम हा या कादंबरीचा नव्हे तर संपूर्ण समकालीन पीढीचे प्रतिनिधीत्व करणारा नायक मानता येईल. तसा तुकाराम हा हाडाचा शेतकरीही आहे. गावात राहणाऱ्या व जोडधंदा म्हणून उपजीविकेसाठी रोडलगत हॉटेल चालवणाऱ्या सामान्य माणसाची ही गोष्ट आहे. 
        लहानपणी संज्या, तुका, बंड्या, पिंट्या, बजरंग या मित्रांच्या संगतीने कथनायक गावातील निसर्गरम्य वातावरणात वाढला आहे. त्यांच्या बरोबरीने करवंदं, जांभळं, चिंचा, बोरे, आंबे अशा रानमेव्याचा त्याने आस्वाद घेतला आहे. जनावरांच्या पाठीमागे तो झाड-झाडोरा, डोंगर कपारीतून फिरला आहे. त्यामुळे गावची शिव, पंचक्रोशी, सह्याद्रीच्या कडाकोपरा यांचाही त्यांनी धांडोळा घेतला आहे. 
        तुका शेतकरी आहे तसाच दूध उत्पादकही आहे. शेती आली म्हटलं की जणावरांचं लोढणं बरोबर आलंच. वैरणीच्या निमतानं शेताकडं जाणं-येणं होतं, हा जनावरं पाळण्यापाठीमागचा उद्देश असतो. पण तुका याहूनही आधुनिक आहे. त्याला जणावरांना दावं लावून बंधनात अडकवणे पसंत नाही म्हणून त्याने आपल्या अल्पशा शेतातच मुक्तगोठा पद्धती केला आहे. तिथे त्याच्या मुक्त जनावरांचा संचार आहे. नैसर्गिक गोष्टींची त्याला मुळातूनच आवड आहे हे या कृतीतून सिद्ध होते. 
        कादंबरी वाड्मय प्रकार हा साहित्य विश्वातील लोकप्रिय वाड्मय प्रकार आहे. कादंबरीच्या स्वरूपाकडे पाहताना आस्वाद, आकलन आणि लेखकाची भूमिका या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. यादृष्टीने वेळोवेळी अभ्यासकांनी, समीक्षकांनी कादंबरी या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिले आहे.
        ग्रामीण लेखणीचा निसर्गसौंदर्य हा गाभा असतो. लेखकाचं कसब आणि कौशल्य त्यात सामावलेले दिसते. या कादंबरीत काही नेमक्या वाक्यातून चित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत... 
उदाहरणार्थ : 
* आग ओकणारा सूर्य मावळतीकडे झुकला. (पान नं. ९)
* आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. (पान नं. १२) 
* पावसाची संततधार सुरू होती. (पान नं. ६०) 
* डोंगरावर महादेवाचं मंदिर होतं. कधीकधी पायवाटेनं मंदिराकडे जायचो. (१६२) 
* हायवेवरून बेफाम जाणार्‍या लक्झरी ट्रॅव्हलचा कर्कश आवाज डोंगरकपारी हादरवत जायचा 
         संवाद हा लेखनाचा आत्मा असतो. बोली संवादाला वेगळीच उंची प्राप्त करून देते. स्थानिक वारणाकाठच्या बोली भाषेचा योग्य वापर हे या कादंबरीचे आणखी एक बलस्थान आहे. या बोलीला वेगळाच कडकपणा आणि ठसका आहे. कोल्हापुरी बोलीचा रांगडेपणा आणि कर्नाटकी कानडी बोलीचा लडीवाळपणा त्यामध्ये आहे. 
उदाहरणार्थ : 
* का वं... रात्री काय बोलला न्हाईसा... (पान नं १४)
* रिंग हुतीया पण पुष्पी फोन का उचलत नसंल? (पान ६९)
* सतत पाऊस पडला तर भांगलण टोंगलण कशी करणार? (पान नं. ८३)
* नाना औंदा पाणीफेरा येतोया वाटतं... (पान नं. ९९)
* धनाजी, तू गारठलाईस... चला रं आमच्या घरी चहा घिऊ... (पान नं. १५९)
* माळीण आणि परवा आमच्याकडं ईशाळवाडीत डोंगरानं गाव गिळलंया! (पान नं. १७१)
* पाऊस हाय म्हणून कडेलूट बंद हाय! (पान नं. १८२) 
        कादंबरीच्या शेवटी परिशिष्ट दिले आहे शब्दसूची देऊन बोली भाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत.. यातून पाटील यांची संशोधकवृत्ती ध्यानात येते. 
       आशय विषयाबरोबरच लेखकाच्या लेखनशैलीसही अनन्यसाधारण महत्त्व असते. कमीतकमी शब्दांत हुबेहुब वर्णन करता येणे गरजेचे असते, 
* रस्त्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. एक कुत्र भूकलं की लागलीच दुसरी त्याला साथ देत होती... (पान नं ६४) 
* सोप्यातल्या पत्र्यावर आदळणाऱ्या पावसाच्या धारांनी तुका जागा झाला... (पान नं. ८०)
* मुंबईला जाताना घाटात रस्ता रुंदीकरणात पोखरलेल्या डोंगरकड्यांना लोखंडी जाळी मारून त्यावर गिलावा थापला आहे... (पान नं. १३६) 
* आता सारं संपलं.. डगरी भुईसपाट झाल्या... (पान नं. १६२) 
        त्याचबरोबर जनार्दन महाराज, आंबी सर, खबाले साहेब, नाना, बहीण पुष्पा, धनाजी, अरुण पेपरवाला, संभाजी, तुकादादा, रवी, विशाल, संभाजी... ही कादंबरीतील पात्रे आपआपली भूमिका योग्य निभावतात व कादंबरीचा पैस आणि खोली वाढवितात. काॅलेजात शिकणारी मुले कर्नाटकातील नातेवाईक, मुंबईसारख्या शहरात राहणारे नातेवाईक, यांमुळे कादंबरी एकाच प्रदेशात न वावरता आपला प्रदेश विस्तारते. गुजरात हायवे, कर्नाटक-महाराष्ट्र सिमाभाग, निपाणी- शिवणी गाव, पुणे-मुंबई हायवेचे वर्णन तिथले ढाबे, मुंबई तले चकचकीत रस्ते, माॅल असा सरमिसळ वेगवेगळ्या परिसर आणि संस्कृतीचा मुलामा प्राप्त झाला आहे. 
        कादंबरीची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील एका ओवीने नि तिच्या निरुपणाने होते, 
         गांवीचे देवळेश्वर। नियामकचि होती साचार 
         तरी देशींचे डोंगर। उगे का असते।। 
         तर कादंबरीचा शेवट संत तुकारामांच्या अभंगाने होतो, 
         वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे। 
         पक्षीही सुस्वरे आळविती।। 
        संत परंपरेशी नाते सांगणारे, जीवा-शिवाशी भावबंध जोडलेले त्यांचे लेखन 'कडेलूट' मधून आले आहे. त्यास अध्यात्माचा पाया असून निसर्ग जपला, त्याला जीव लावला तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. अगदी आपली झोळी भरून जाते पण त्याची आपण नासधूस केली तर निसर्गाविरूद्धचे प्रत्येक पाऊल आपल्याला अडचणीत आणल्यावाचून राहात नाही, हे लक्षात आणून देण्यासाठीच डॉ. श्रीकांत पाटील यांनी या कादंबरीची निर्मिती केली आहे. 
         एकूणच डॉ. पाटील यांच्या कादंबरीमालेचा आलेख चढता आहे. एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न कादंबर्‍या त्यांनी दिल्या आहेत. कविता, कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, नाट्यछटा, ललितगद्य, समीक्षा असे साहित्यातील सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. हाच चढता क्रम राहील याच अपेक्षेसह त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा! 
***

कादंबरी: कडेलूट 
लेखक : डॉ. श्रीकांत पाटील 
प्रकाशन : संस्कृती प्रकाशन पुणे 
पृष्ठे : २००, मूल्य : ३०० रुपये 
***

सचिन वसंत पाटील, 
कर्नाळ-सांगली 
मोबा. ८२७५३७७०४९

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी