कडेलूट - सचिन वसंत पाटील कर्नाळ-सांगली
*मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम मांडणारी कादंबरी: कडेलूट*
- सचिन वसंत पाटील
समकालीन मराठी साहित्य विश्वातील एक महत्त्वाचे कादंबरीकार म्हणून डॉ. श्रीकांत पाटील यांना ओळखले जाते. आजवर त्यांच्या प्रकाशित झालेल्या लाॅकडाऊन, ऊसकोंडी, पाणीफेरा या बहुचर्चित कादंबऱ्यातून ते सिद्धच झाले आहे. त्यांची पहिली कादंबरी 'लॉकडाऊन' ही नुकत्याच येऊन गेलेल्या कोरोना सारख्या विषाणूजन्य आजारामुळे त्याचे माणसांवर, मानवी मनावर, पशुपक्षांवर, एकूणच पृथ्वीवर, शेती संस्कृतीवर काय काय दुष्परिणाम झाले आहेत आणि कोरोनाने आपल्याला काय शिकवलं? हे सांगणारी आहे. तर 'ऊसकोंडी' ही त्यांची दुसरी कादंबरी ऊस उत्पादक शेतकर्याचा संघर्ष मांडणारी आहे. साखर कारखानदार, मजूर आणि एकूणच व्यवस्था यांचं वास्तव चित्र रेखाटणारी आहे. तर गतवर्षी प्रकाशित झालेली 'पाणीफेरा' ही कादंबरी महापुरांमुळे हैराण झालेल्या माणसांचे दुःख समोर आणणारी आहे. नदीकाठच्या गावातील माणसांचे दुःख, व्यथा वेदना दाखवणारी आहे.
डॉ. पाटील यांची संशोधन दृष्टी अचाट करणारी आहे. अख्खी हयात गाव-खेड्यात गेल्याने अवती-भवतीचा परिसर, निसर्ग, राजकारण, समाजकारण, ग्रामसंस्कृती, शेतीसंस्कृती यांचा चांगला अभ्यास त्यांना आहे. आजूबाजूला घडणाऱ्या घटना त्यांना अस्वस्थ करतात. ग्रामसंस्कृतीवर होणारी आसमानी, सुलतानी आक्रमणांमुळे त्यांच्यातील लेखक अस्वस्थ होतो. याच अस्वस्थेतून त्यांचे लेखन होत असावे.
प्रस्तुत 'कडेलूट' ही निसर्गावर होणाऱ्या मानवी आक्रमणांमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देणारी दमदार कादंबरी संस्कृती प्रकाशन, पुणे यांनी मराठी वाचकांच्या भेटीस आणली आहे. प्रकाशिका डॉ. सुनिताराजे पवार यांनी टाईपसेटिंग, मांडणी, कागद, समर्पक मुखपृष्ठ, मजबूत बांधणी याकडे बारकाईने लक्ष देवून अतिशय सुंदर व आकर्षक स्वरूपात ती सादर केली आहे. या कादंबरीमध्ये डॉ. पाटील यांनी मानवी आक्रमणामुळे निसर्गाचा होणारा ऱ्हास आणि त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारी वाढ याकडे संशोधक, निसर्ग अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे लक्ष वेधले आहे. निसर्ग हा वेळोवेळी संकेत देत असतो, त्याकडे दुर्लक्ष केले की मानवी जीवित व वित्त हानी ही हमखास ठरलेली. या कादंबरीमध्ये निसर्गाने दिलेले काही संकेत, इशारे उदघृत होतात. त्याकडे दुर्लक्ष केले तर विनाश अटळ आहे, हेच पाटील यांना सांगावयाचे आहे. ही कादंबरी फक्त समस्या मांडून थांबत नाही तर त्या समस्येच्या मुळाशी जाऊन, चहूअंगांनी विचार करून त्यावर उपाय सुचविते. कादंबरीतील पात्रांकडून, उपपात्रांकडून त्यांच्या वैचारीक कृतींतून लेखकाचा उद्देश अधोरेखित करते. हेच या कादंबरीचे वेगळेपण आहे.
अलिकडच्या काळात होणारे अतिपाऊस, अवकाळी, महापूर, भूकंप, भूस्खलन किंवा डोंगर खचून नष्ट होणारी मानवी वस्ती, त्यांची घरे, संपत्ती या घटना फार मोठ्या प्रमाणात घडू लागल्या आहेत. त्याचे कारण निसर्गावर मानवाचे आक्रमण, त्याने केलेली भयानक वृक्षतोड, आणि प्रदुषण ही आहेत, हे कादंबरी वाचताना लक्षात येते.
कादंबरीची पात्ररचना करताना डॉ. पाटील यांनी विशेष भान राखले आहे. देशात सत्तर टक्के लोक शेती करतात तर त्याहून अधिक लोक खेड्यात राहतात. हा खेड्यातील शेतकरी, कष्टकरी, सामान्य सेवा उद्योग व्यवसाय करणारा दुकानदार, टपरीवाला, हाॅटेलवाला हा गावातील माणूस नायक, उपनायक म्हणून त्यांच्या डोळ्यांसमोर आहे. लेखक स्वतः खेडे गावात राहत असल्याने खेडूताची मानसिकता, राहणीमान, चांगुलपणा, निसर्ग जपण्यासाठीची धडपड ही समकालीन पीढीची आहे. म्हणून कादंबरीचा नायक तुकाराम हा या कादंबरीचा नव्हे तर संपूर्ण समकालीन पीढीचे प्रतिनिधीत्व करणारा नायक मानता येईल. तसा तुकाराम हा हाडाचा शेतकरीही आहे. गावात राहणाऱ्या व जोडधंदा म्हणून उपजीविकेसाठी रोडलगत हॉटेल चालवणाऱ्या सामान्य माणसाची ही गोष्ट आहे.
लहानपणी संज्या, तुका, बंड्या, पिंट्या, बजरंग या मित्रांच्या संगतीने कथनायक गावातील निसर्गरम्य वातावरणात वाढला आहे. त्यांच्या बरोबरीने करवंदं, जांभळं, चिंचा, बोरे, आंबे अशा रानमेव्याचा त्याने आस्वाद घेतला आहे. जनावरांच्या पाठीमागे तो झाड-झाडोरा, डोंगर कपारीतून फिरला आहे. त्यामुळे गावची शिव, पंचक्रोशी, सह्याद्रीच्या कडाकोपरा यांचाही त्यांनी धांडोळा घेतला आहे.
तुका शेतकरी आहे तसाच दूध उत्पादकही आहे. शेती आली म्हटलं की जणावरांचं लोढणं बरोबर आलंच. वैरणीच्या निमतानं शेताकडं जाणं-येणं होतं, हा जनावरं पाळण्यापाठीमागचा उद्देश असतो. पण तुका याहूनही आधुनिक आहे. त्याला जणावरांना दावं लावून बंधनात अडकवणे पसंत नाही म्हणून त्याने आपल्या अल्पशा शेतातच मुक्तगोठा पद्धती केला आहे. तिथे त्याच्या मुक्त जनावरांचा संचार आहे. नैसर्गिक गोष्टींची त्याला मुळातूनच आवड आहे हे या कृतीतून सिद्ध होते.
कादंबरी वाड्मय प्रकार हा साहित्य विश्वातील लोकप्रिय वाड्मय प्रकार आहे. कादंबरीच्या स्वरूपाकडे पाहताना आस्वाद, आकलन आणि लेखकाची भूमिका या गोष्टी जाणून घेणे गरजेचे असते. यादृष्टीने वेळोवेळी अभ्यासकांनी, समीक्षकांनी कादंबरी या प्रकाराकडे गंभीरपणे पाहिले आहे.
ग्रामीण लेखणीचा निसर्गसौंदर्य हा गाभा असतो. लेखकाचं कसब आणि कौशल्य त्यात सामावलेले दिसते. या कादंबरीत काही नेमक्या वाक्यातून चित्र डोळ्यांसमोर उभे करण्यात लेखक यशस्वी झाले आहेत...
उदाहरणार्थ :
* आग ओकणारा सूर्य मावळतीकडे झुकला. (पान नं. ९)
* आकाशात टिपूर चांदणं पडलं होतं. (पान नं. १२)
* पावसाची संततधार सुरू होती. (पान नं. ६०)
* डोंगरावर महादेवाचं मंदिर होतं. कधीकधी पायवाटेनं मंदिराकडे जायचो. (१६२)
* हायवेवरून बेफाम जाणार्या लक्झरी ट्रॅव्हलचा कर्कश आवाज डोंगरकपारी हादरवत जायचा
संवाद हा लेखनाचा आत्मा असतो. बोली संवादाला वेगळीच उंची प्राप्त करून देते. स्थानिक वारणाकाठच्या बोली भाषेचा योग्य वापर हे या कादंबरीचे आणखी एक बलस्थान आहे. या बोलीला वेगळाच कडकपणा आणि ठसका आहे. कोल्हापुरी बोलीचा रांगडेपणा आणि कर्नाटकी कानडी बोलीचा लडीवाळपणा त्यामध्ये आहे.
उदाहरणार्थ :
* का वं... रात्री काय बोलला न्हाईसा... (पान नं १४)
* रिंग हुतीया पण पुष्पी फोन का उचलत नसंल? (पान ६९)
* सतत पाऊस पडला तर भांगलण टोंगलण कशी करणार? (पान नं. ८३)
* नाना औंदा पाणीफेरा येतोया वाटतं... (पान नं. ९९)
* धनाजी, तू गारठलाईस... चला रं आमच्या घरी चहा घिऊ... (पान नं. १५९)
* माळीण आणि परवा आमच्याकडं ईशाळवाडीत डोंगरानं गाव गिळलंया! (पान नं. १७१)
* पाऊस हाय म्हणून कडेलूट बंद हाय! (पान नं. १८२)
कादंबरीच्या शेवटी परिशिष्ट दिले आहे शब्दसूची देऊन बोली भाषेतील शब्दांचे अर्थ दिले आहेत.. यातून पाटील यांची संशोधकवृत्ती ध्यानात येते.
आशय विषयाबरोबरच लेखकाच्या लेखनशैलीसही अनन्यसाधारण महत्त्व असते. कमीतकमी शब्दांत हुबेहुब वर्णन करता येणे गरजेचे असते,
* रस्त्यावर कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज येत होता. एक कुत्र भूकलं की लागलीच दुसरी त्याला साथ देत होती... (पान नं ६४)
* सोप्यातल्या पत्र्यावर आदळणाऱ्या पावसाच्या धारांनी तुका जागा झाला... (पान नं. ८०)
* मुंबईला जाताना घाटात रस्ता रुंदीकरणात पोखरलेल्या डोंगरकड्यांना लोखंडी जाळी मारून त्यावर गिलावा थापला आहे... (पान नं. १३६)
* आता सारं संपलं.. डगरी भुईसपाट झाल्या... (पान नं. १६२)
त्याचबरोबर जनार्दन महाराज, आंबी सर, खबाले साहेब, नाना, बहीण पुष्पा, धनाजी, अरुण पेपरवाला, संभाजी, तुकादादा, रवी, विशाल, संभाजी... ही कादंबरीतील पात्रे आपआपली भूमिका योग्य निभावतात व कादंबरीचा पैस आणि खोली वाढवितात. काॅलेजात शिकणारी मुले कर्नाटकातील नातेवाईक, मुंबईसारख्या शहरात राहणारे नातेवाईक, यांमुळे कादंबरी एकाच प्रदेशात न वावरता आपला प्रदेश विस्तारते. गुजरात हायवे, कर्नाटक-महाराष्ट्र सिमाभाग, निपाणी- शिवणी गाव, पुणे-मुंबई हायवेचे वर्णन तिथले ढाबे, मुंबई तले चकचकीत रस्ते, माॅल असा सरमिसळ वेगवेगळ्या परिसर आणि संस्कृतीचा मुलामा प्राप्त झाला आहे.
कादंबरीची सुरुवात ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायातील एका ओवीने नि तिच्या निरुपणाने होते,
गांवीचे देवळेश्वर। नियामकचि होती साचार
तरी देशींचे डोंगर। उगे का असते।।
तर कादंबरीचा शेवट संत तुकारामांच्या अभंगाने होतो,
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरे आळविती।।
संत परंपरेशी नाते सांगणारे, जीवा-शिवाशी भावबंध जोडलेले त्यांचे लेखन 'कडेलूट' मधून आले आहे. त्यास अध्यात्माचा पाया असून निसर्ग जपला, त्याला जीव लावला तर निसर्ग आपल्याला भरभरून देतो. अगदी आपली झोळी भरून जाते पण त्याची आपण नासधूस केली तर निसर्गाविरूद्धचे प्रत्येक पाऊल आपल्याला अडचणीत आणल्यावाचून राहात नाही, हे लक्षात आणून देण्यासाठीच डॉ. श्रीकांत पाटील यांनी या कादंबरीची निर्मिती केली आहे.
एकूणच डॉ. पाटील यांच्या कादंबरीमालेचा आलेख चढता आहे. एकापेक्षा एक सरस, आशयसंपन्न कादंबर्या त्यांनी दिल्या आहेत. कविता, कथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, नाट्यछटा, ललितगद्य, समीक्षा असे साहित्यातील सर्व प्रकार त्यांनी हाताळले आहेत. हाच चढता क्रम राहील याच अपेक्षेसह त्यांच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
***
कादंबरी: कडेलूट
लेखक : डॉ. श्रीकांत पाटील
प्रकाशन : संस्कृती प्रकाशन पुणे
पृष्ठे : २००, मूल्य : ३०० रुपये
***
सचिन वसंत पाटील,
कर्नाळ-सांगली
मोबा. ८२७५३७७०४९
Comments
Post a Comment