माझ्या स्वप्नातील भारत भाषण

       'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' खरंच माझ्या स्वप्नातील भारत साऱ्या जगात उठून दिसेल. सर्व क्षेत्रात प्रगती केलेला माझा भारत देश असेल. विकसित राष्ट्रांमध्ये माझा भारत नंबर वन असेल. जिकडे तिकडे माझ्या देशाचा गाजावाजा झालेला असेल. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाव असेल ते म्हणजे भारत..भारत...आणि भारत. 
        'सबसे प्यारा सबसे न्यारा, गुलिस्ता हमारा' होय. असा आदर्श भारत माझ्या स्वप्नात आहे. म्हणून माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल याबाबत चर्चा करणार आहे. 
ज्याचा इतिहास महान आहे, त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे, असा माझा भारत देश आहे. भारताची भूमी महान आहे. कारण ती साधू, संत, महंत, समाजसुधारक आणि क्रांतिवीरांची भूमी आहे. अहो, भारत म्हणजे रत्नांची खाण आणि बुद्धिमत्तेची शान आहे. भारतातील व्यक्तींची प्राचीन काळापासूनच बौद्धिक पातळी फार मोठी आहे. कॉम्प्युटरलाही मागे सारेल इतकी ती समृद्ध आहे. अनेक देशांना फार भीती वाटते म्हणून त्यांनी भारतात जातीय दंगली, बॉम्बस्फोट घडवून भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण साऱ्यांना भारताने पराभूत केले. सर्व जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर सिंकदरला याच भारतात आपला जीव गमववा  लागला. 
            माझ्या भारतात भाषा, वेश, अन्न, धर्म, प्रादेशिकता, प्राकृतिकता यामध्ये विविधता आहे. अशा विविधतेत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम माझ्या भारत देशाने केलेले आहे. सर्व लोक आपापसात गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये एकता आहे. हेच तर माझ्या भारत देशाचे वेगळेपण आहे. विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे वैशिष्ट्य आहे. तरीही काही संधीसाधू लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी धर्माचा, जातीचा वापर करत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःच्या भाकरी भाजून घेत आहेत. पण माझ्या स्वप्नातील भारतात असे बिलकुल पहावयास मिळणार नाही. सर्वत्र सुख, शांती आणि आनंद असेल. जेव्हा परकीय आक्रमण होईल तेव्हा सर्व जाती, धर्मातील लोक एक होऊन परकीयांचा पराभव करतील. सर्व लोक शिक्षित झालेले असतील. सर्वांना नोकरी मिळालेली असेल. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी व्यवसाय सुरू केलेले असतील. प्रत्येक हाताला काम मिळालेले असेल. जे हात दगडांचा वर्षाव करायला उत्सुकलेले आहेत, ते थांबवून देशाच्या प्रगतीला लावीन. होणारे उत्पात थांबवून लोकांच्यात सामर्थ्य निर्माण करून माझा भारत देश बलवान करीन. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.'
          उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतात बर्फ वितळून महापूर येतो. त्यावेळी दक्षिण भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणून संपूर्ण भारतभर माळेच्या आकाराचा कालवा काढलेला असेल. या विषम परिस्थितीवर मात करता येईल. म्हणजे उन्हाळ्यात उत्तरेकडील पाणी दक्षिण भारतात आणता येईल. विनाकारण समुद्राला जाणारे पाणी वाचवता येईल. 
           आज भारतात भ्रष्टाचार वाढलेला आहे. खासदार किंवा आमदार निवडीसाठी कोटी कोटी रुपयांची बोली लावली जाते. काळानुरूप जुन्या गोष्टी जातात त्या ठिकाणी नव्या जागा घेतात. जशी मीरा गेली मदिरा आली. कुंकू गेले टिकली आली आणि न्हाणीची भिंत सौभाग्यवती झाली. अंगणातील तुळस गेली. परसातील पळस गेला. देवळावरचा कळस गेला. राहिलाय फक्त आळस आळस आणि आळस. आज सर्वत्र चाललेला भ्रष्टाचार, गुंडगिरी, महिलावर होणारा अत्याचार, सीमावाद इत्यादी बाबत विचार करून ते थांबवले पाहिजेत. यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आखले जाईल. सर्व नेते, पुढारी हे सत्प्रवृतीचे असतील. पंतप्रधानापासून सर्व खासदार, मंत्री हे चारित्र्यवान असतील. त्यांचा आदर्श देशातील सर्व नागरिक घेतील. असे चारित्र्यसंपन्न भारतीय नागरिक असतील. याचप्रमाणे माझ्या स्वप्नातील भारतामध्ये पुरुष व स्त्री असा भेदाभेद असणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्त्रिया नोकरी करतील आणि त्यांना समान वेतन असेल. स्त्रिया शास्त्रज्ञ असतील, विमान, रेल्वे चालवतील. अंतराळात जाऊन येतील. तर पुरुष मंडळी घरातील काम करतील, आपल्या घरातील स्त्रियांना मदत करतील. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये एक वेळ प्राण देईन पण माझी झाशी देणार नाही असे म्हणणारी राणी लक्ष्मीबाई असेल. प्राण गेला तरी कटवाल्यांची नावे सांगणार नाही असे पालुपद म्हणणारा मंगल पांडे असेल. परदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रकसमोर आपल्या रक्ताने भिजणारा बाबू गेनू असेल आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक असतील. अशी कितीतरी पुष्पे माझ्या स्वप्नातील भारतात असतील आणि या भारतभूमीला सुजलाम सुफलाम सस्यश्यामल करण्यासाठी झटतील. 
     हे ऐकल्यावर तुम्ही हसाल. पण मला खात्री आहे की माणूस हा स्वप्नावर जगतो असे म्हणतात ते चुकीचे नाही. ती स्वप्ने साकार करण्यासाठीच तो प्रयत्न करीत असतो. स्वप्नं खरी होत नसली तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. रेंगाळणाऱ्याची रात्र असते. थांबणाऱ्याचा अंत असतो. पण पाहणाऱ्याला प्रकाश दिसतो. धावणाऱ्याला देवही भेटतो. म्हणून धावायचं असतं. प्रकाशाच्या दिशेने २१ व्या शतकातून २२  शतकाकडे जात असताना माझ्या स्वप्नातील भारताकडे मी पाहत ते ......
        'भविष्याचा वेध घेत, इतिहासाकडून काही शिकायचं असते. चुकलेल्या वाटा शोधत काहीतरी चांगलं घडवायचं असतं.   जाणिवेतून मी पाहते. आणि खरंतर माझे स्वप्न हे स्वप्न नसून ते वास्तवात येईल याची मला खात्री वाटते. 

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी