माझ्या स्वप्नातील भारत भाषण
'सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ता हमारा' खरंच माझ्या स्वप्नातील भारत साऱ्या जगात उठून दिसेल. सर्व क्षेत्रात प्रगती केलेला माझा भारत देश असेल. विकसित राष्ट्रांमध्ये माझा भारत नंबर वन असेल. जिकडे तिकडे माझ्या देशाचा गाजावाजा झालेला असेल. जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाव असेल ते म्हणजे भारत..भारत...आणि भारत.
'सबसे प्यारा सबसे न्यारा, गुलिस्ता हमारा' होय. असा आदर्श भारत माझ्या स्वप्नात आहे. म्हणून माझ्या स्वप्नातील भारत कसा असेल याबाबत चर्चा करणार आहे.
ज्याचा इतिहास महान आहे, त्याचा भविष्यकाळही उज्ज्वल आहे, असा माझा भारत देश आहे. भारताची भूमी महान आहे. कारण ती साधू, संत, महंत, समाजसुधारक आणि क्रांतिवीरांची भूमी आहे. अहो, भारत म्हणजे रत्नांची खाण आणि बुद्धिमत्तेची शान आहे. भारतातील व्यक्तींची प्राचीन काळापासूनच बौद्धिक पातळी फार मोठी आहे. कॉम्प्युटरलाही मागे सारेल इतकी ती समृद्ध आहे. अनेक देशांना फार भीती वाटते म्हणून त्यांनी भारतात जातीय दंगली, बॉम्बस्फोट घडवून भारताला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केला. पण साऱ्यांना भारताने पराभूत केले. सर्व जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर सिंकदरला याच भारतात आपला जीव गमववा लागला.
माझ्या भारतात भाषा, वेश, अन्न, धर्म, प्रादेशिकता, प्राकृतिकता यामध्ये विविधता आहे. अशा विविधतेत राष्ट्रीय एकात्मता जपण्याचं काम माझ्या भारत देशाने केलेले आहे. सर्व लोक आपापसात गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्यामध्ये एकता आहे. हेच तर माझ्या भारत देशाचे वेगळेपण आहे. विविधतेतून एकता हे माझ्या देशाचे वैशिष्ट्य आहे. तरीही काही संधीसाधू लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आणि राजकारणासाठी धर्माचा, जातीचा वापर करत आहेत. दोन समाजात तेढ निर्माण करून स्वतःच्या भाकरी भाजून घेत आहेत. पण माझ्या स्वप्नातील भारतात असे बिलकुल पहावयास मिळणार नाही. सर्वत्र सुख, शांती आणि आनंद असेल. जेव्हा परकीय आक्रमण होईल तेव्हा सर्व जाती, धर्मातील लोक एक होऊन परकीयांचा पराभव करतील. सर्व लोक शिक्षित झालेले असतील. सर्वांना नोकरी मिळालेली असेल. ज्यांना नोकरी मिळाली नाही त्यांनी व्यवसाय सुरू केलेले असतील. प्रत्येक हाताला काम मिळालेले असेल. जे हात दगडांचा वर्षाव करायला उत्सुकलेले आहेत, ते थांबवून देशाच्या प्रगतीला लावीन. होणारे उत्पात थांबवून लोकांच्यात सामर्थ्य निर्माण करून माझा भारत देश बलवान करीन. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, 'बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो.'
उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतात बर्फ वितळून महापूर येतो. त्यावेळी दक्षिण भारतात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणून संपूर्ण भारतभर माळेच्या आकाराचा कालवा काढलेला असेल. या विषम परिस्थितीवर मात करता येईल. म्हणजे उन्हाळ्यात उत्तरेकडील पाणी दक्षिण भारतात आणता येईल. विनाकारण समुद्राला जाणारे पाणी वाचवता येईल.
आज भारतात भ्रष्टाचार वाढलेला आहे. खासदार किंवा आमदार निवडीसाठी कोटी कोटी रुपयांची बोली लावली जाते. काळानुरूप जुन्या गोष्टी जातात त्या ठिकाणी नव्या जागा घेतात. जशी मीरा गेली मदिरा आली. कुंकू गेले टिकली आली आणि न्हाणीची भिंत सौभाग्यवती झाली. अंगणातील तुळस गेली. परसातील पळस गेला. देवळावरचा कळस गेला. राहिलाय फक्त आळस आळस आणि आळस. आज सर्वत्र चाललेला भ्रष्टाचार, गुंडगिरी, महिलावर होणारा अत्याचार, सीमावाद इत्यादी बाबत विचार करून ते थांबवले पाहिजेत. यासाठी नवीन शैक्षणिक धोरण आखले जाईल. सर्व नेते, पुढारी हे सत्प्रवृतीचे असतील. पंतप्रधानापासून सर्व खासदार, मंत्री हे चारित्र्यवान असतील. त्यांचा आदर्श देशातील सर्व नागरिक घेतील. असे चारित्र्यसंपन्न भारतीय नागरिक असतील. याचप्रमाणे माझ्या स्वप्नातील भारतामध्ये पुरुष व स्त्री असा भेदाभेद असणार नाही. पुरुषांच्या बरोबरीने सर्व स्त्रिया नोकरी करतील आणि त्यांना समान वेतन असेल. स्त्रिया शास्त्रज्ञ असतील, विमान, रेल्वे चालवतील. अंतराळात जाऊन येतील. तर पुरुष मंडळी घरातील काम करतील, आपल्या घरातील स्त्रियांना मदत करतील. माझ्या स्वप्नातील भारतामध्ये एक वेळ प्राण देईन पण माझी झाशी देणार नाही असे म्हणणारी राणी लक्ष्मीबाई असेल. प्राण गेला तरी कटवाल्यांची नावे सांगणार नाही असे पालुपद म्हणणारा मंगल पांडे असेल. परदेशी कपड्यांनी भरलेल्या ट्रकसमोर आपल्या रक्ताने भिजणारा बाबू गेनू असेल आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे लोकमान्य टिळक असतील. अशी कितीतरी पुष्पे माझ्या स्वप्नातील भारतात असतील आणि या भारतभूमीला सुजलाम सुफलाम सस्यश्यामल करण्यासाठी झटतील.
हे ऐकल्यावर तुम्ही हसाल. पण मला खात्री आहे की माणूस हा स्वप्नावर जगतो असे म्हणतात ते चुकीचे नाही. ती स्वप्ने साकार करण्यासाठीच तो प्रयत्न करीत असतो. स्वप्नं खरी होत नसली तरी प्रयत्न करणे आपल्या हातात असते. रेंगाळणाऱ्याची रात्र असते. थांबणाऱ्याचा अंत असतो. पण पाहणाऱ्याला प्रकाश दिसतो. धावणाऱ्याला देवही भेटतो. म्हणून धावायचं असतं. प्रकाशाच्या दिशेने २१ व्या शतकातून २२ शतकाकडे जात असताना माझ्या स्वप्नातील भारताकडे मी पाहत ते ......
'भविष्याचा वेध घेत, इतिहासाकडून काही शिकायचं असते. चुकलेल्या वाटा शोधत काहीतरी चांगलं घडवायचं असतं. जाणिवेतून मी पाहते. आणि खरंतर माझे स्वप्न हे स्वप्न नसून ते वास्तवात येईल याची मला खात्री वाटते.
Comments
Post a Comment