परीक्षण 'भाकरचोर' - प्रसाद जाधवसर

*'अस्सल ग्रामीण बोलीचा बाज असणारा कथासंग्रह म्हणजे भाकरचोर'* 
मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूरचे सचिव आणि श्री नवनाथ हायस्कूल पोहाळे येथील मराठी विषय शिक्षक परशराम आंबी यांनी लिहिलेल्या 'भाकरचोर' हा कथासंग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. ग्रामीण बोली भाषेतील, उत्तम व दर्जेदार कथांची मेजवानी असलेला हा कथासंग्रह आहे. आजच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनातील अनेक प्रसंगाचे, माणसांच्या स्वार्थी, संधीसाधू आणि मतलबीपणावर मार्मिकपणे भाष्य करणारा हा कथा संग्रह आहे. या कथासंग्रहामधील पात्रांचे संवाद, घटना व प्रसंग यांचे हुबेहूब चित्रण कथाकारांने कथासंग्रहात केलेले आहे. 'भाकरचोर' कथासंग्रहाविषयी मला काहीतरी लिहावे असे मनापासून वाटले. 
           
         या कथासंग्रहातील पहिलीच कथा आहे - 'वाट ही पुनवेची.' या कथेतून मानवी जीवनामध्ये आशेचा किरण नेहमी तरळत असतो. या विषयावर आधारित लेखकाने केलेलं भाष्य मनाला खूपच भावतं. संवेदनशील भावभावनांचा उलगडा या कथेमधून दिसून येतो. सुरुवातीपासूनच ही कथा मनाची पकड घेते. आशा पल्लवित होत जाते. नरसोबावाडीला गेल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होणार हा एक आशेचा किरण पाहायला मिळतो. म्हणूनच कथेचे शीर्षक समर्पक वाटतं. उत्कंठावर्धक कथा आहे. पुढे काय होते ही उत्सुकता निर्माण होते. कथेच्या शेवटी संपूर्ण उलगडा होतो. 
           'सत्वपरीक्षा' ही कथा वाचताना मला तर रमय्या वस्तावय्या या हिंदी चित्रपटातील गिरीश कुमार आणि श्रुती हसन यांच्यावर आधारित चित्रपटाची आठवण झाली. कथेतील नायक अर्थात मधू खूप समंजस, कष्टाळू, स्वाभिमानी आहे. पण लहानपणापासून प्रेम करूनसुद्धा अनिताबरोबर लग्न होणार नाही हे मधूला समजते. त्याची घेतलेली सत्त्वपरीक्षा पाहून कथेला दिलेले शीर्षक समर्पक वाटते. मधू आणि अनिता यांच्या असीम प्रेमापोटी मामाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. ही कथा मनाला समाधान तर देतेच, पण वैवाहिक जीवनाची आनंददायक वाट सफल करून देते. 'मामाने आणलेल्या हारामधून खरी जीत आहे' हे वाक्य मनाला आनंद देऊन जातंच आणि प्रेरणा व प्रोत्साहनही देऊन जातं.
          'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' अशा सुखाच्या बालपणीच्या काळाची आठवण करून देणारी ' रावसाहेब' कथा आहे. ही कथा मनाची पकड घेते. म्हादू , संजना आणि त्यांचे बालपणीचे मित्र यांच्या बालपणीच्या आठवणी अनपेक्षितपणे जाग्या होतात. कित्येक वर्षानंतर भेटीमुळे पुन्हा एकदा मैत्रीच्या नात्याचा धागा गुंतत जातो तो बहीण - भावाच्या नात्यानं. शरीर वयस्कर झालं, तरी मानवतावादी दृष्टिकोनातून बहिणीचं नातं मात्र अखंड तेवत राहतं. लेखकाने केलेली नात्यांची गुंफण ही रावसाहेब कथेला साजेशी आणि परिपूर्ण वाटते.
             अन्नदान, कन्यादान याहीपेक्षा 'नेत्रदान श्रेष्ठदान' आहे. हे नेत्रदान श्रेष्ठदान ही कथा वाचल्यानंतर कळते. लेखकाने वडील आणि मुलीच्या नात्यामधील दातृत्वाची नवी भूमिका स्पष्ट केली आहे. ती मनाला खरोखरच भावणारी आहे. वडिलाचे मुलीवर असणारे प्रेम आणि मुलीचं बाबाच्यावर असणारे प्रेम हे डोळे (योग्य दृष्टिकोन) असल्याशिवाय कळत नाही. मुलीच्या जीवनामध्ये प्रकाश द्यावा म्हणून वडिलांनी केलेले दान खरोखरच श्रेष्ठदान आहे.आणि पुन्हा मुलीला शिकवण देतात की, माझा डोळ्याच्या (नेत्र) रूपात मी तुझ्यासोबत आहे, जवळ आहे. पुन्हा तोच नेत्र तू दान करू शकतेस अशा प्रकारचा संदेश देतात. खरोखरच सर्वांच्या हृदयात राहणारी ही कथा श्रेष्ठ कथा आहे.
            भाकरचोर कथासंग्रहातील 'भाकरचोर' ही शीर्षक कथा आहे. परिस्थितीमुळे माणूस घडतो. परिस्थिती गरीब असेल आणि पोटाची भूक भागवण्यासाठी अन्नाचा कणही घरांमध्ये नसेल, तर लहान मुलाच्या डोक्यात चोरीचाच विचार येतो. पण तीच चोरी प्रामाणिकपणे कबूल करणारा नवयुगातील हा राम. त्याच्या जीवनामध्ये मात्र कुठेच 'राम' दिसत नाही. पण या जगात दुसऱ्यांना सुख- आनंद देणारी, माणुसकी जपणारी, विद्यार्थ्यांवर मुलाप्रमाणे प्रेम करणारी या कथेतील मुख्याध्यापकासारखी माणसे पाहायला मिळतात. विद्यार्थ्याला कष्टाची भाकरी आणि श्रमदानाचे महत्व सांगणारे मुख्याध्यापक आदर्शवत आहेत. लेखकांच्या सूक्ष्म निरीक्षणामुळे सामान्य व्यक्तीबद्दल असणारा कळवळा, प्रेम, जिव्हाळा, यांचा प्रत्यय ही कथा वाचताना येतो. त्यामुळे 'भाकरचोर' ही कथा आणि या कथासंग्रहाला दिलेले शीर्षक यथार्थ आणि सार्थ वाटते.
              पावसाचे खूपच वाढलेले प्रमाण, भयानक कोसळणारा पाऊस यावर आधारित 'कोसळता पाऊस' नावाची कथा लेखकांनी लिहिली. यातून शंकरनाना आणि सारजाकाकू यांचे व्यक्तिमत्त्व दिसून येते. शंकरनाना व सारजाकाकू कोसळणाऱ्या पावसाकडे बघून पूर्वीचा पाऊस आणि आताचा कोसळणारा पाऊस यावर गप्पा मारत बसले आहेत. गप्पा मारता मारता किती वेळ निघून गेला कळलंसुद्धा नाही. आई-वडिलांना सोडून मुले परदेशात जातात. तिकडेच आपला संसार मांडतात. आई-वडिलांना विसरून जातात. ही एक उद्ध्वस्त करणारी घटना अंतर्मनाला बेचैन करते. कोसळणार्‍या पावसाप्रमाणे दुःखंसुद्धा अशीच कोसळत जातात. कोसळता पाऊस कथेतून हे सत्य शंकरनाना आणि सारजाकाकू यांच्या संवादातून लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
            'दीपलक्ष्मी' ही कथा प्रत्येक शिक्षक पुरुषांनी वाचावी अशी आहे. जेणेकरून विनायकसारखी चूक कोणीही करणार नाही. या कथेत लेखकांनी पुरुषी अहंकार कसा सर्वनाश करतो हे दाखवले आहे. संसाररुपी जीवनाचा आनंद घ्यावा, पत्नीला प्रेरणा द्यावी, आधार द्यावा, हेसुद्धा प्रेमच आहे हे अशा शिक्षकाला कळायला पाहिजे. जीवन म्हणजे केवळ मीपणा, स्वार्थ, हव्यास, अहंकार नव्हे. असं वागणारा शिक्षक म्हणजे जीवनाचा शून्य अर्थ कळालेला केवळ पुरुष आहे. व्यसनाधीनता आणि पुरुषी अहंकार यामुळे उध्वस्त झालेल्या संसारी जीवनाची व्यथा लेखकांनी दीपलक्ष्मी या कथेतून मांडली आहे.
           'माय मरो नि मावशी जगो' अशी म्हण प्रत्येकाच्या मुखात असते. पण लेखकांनी लिहिलेली 'दोष कुणाचा' या कथेतून मावशी जर स्त्रीभ्रूणहत्या करत असेल तर या ज्वलंत प्रश्नावर खरोखरच विचार व्हायला हवा. मुलगा आणि मुलगी खरंतर ईश्वरीय देण असते. पुरुषाच्या हातामध्ये सगळ्या गोष्टी असतात. विज्ञान सांगतं की पुरुषांमध्ये जी गुणसूत्रे असतील त्यावरूनच मुलगा किंवा मुलगी होणे अवलंबून असते. पुरुषांमध्ये 'वाय' गुणसूत्रे नसतील तर साहजिकच मुलगी होणार. मग दोष कुणाचा? या कथेतून भयानक वास्तव लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलगीला मुलापेक्षा लहान समजले जाते. तरीही ती दोन्ही घरांमध्ये महान असते. आई-वडिलांचे घर आणि नवऱ्याचं घर ही दोन्ही घरं प्रकाशमान करण्याचे काम मुलगी करत असते. तरीही एकविसाव्या शतकात स्त्री भ्रूणहत्या होत आहेत. समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्याचे काम लेखकांनी केले आहे. 
            'सपान' या कथेतून व्यक्तिचित्रण आले आहे. यातून आंबी मामांचे गुण चित्रीत केलेले आहेत. एकविसाव्या शतकातील आई-वडील आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करून देण्यासाठी स्वतः अफाट कष्ट करतील, हाडाची काडे करतील, रक्त आठवतील, पण आपल्या मुलांना कमी पडू देणार नाही. हे ग्रामीण भागातील चित्र ग्रामीण ढंगात आणि बोलीभाषेमध्ये लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेवसारखा मुलगा आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करतो. आणि आई-वडिलांना सुखी जीवनाचा आनंद देतो. नामदेवच्या पाठीशी असणारे त्याचे गुरु अत्यंत आदर्श आणि नामदेवला प्रोत्साहित करणारे होते.
            मुलगा म्हणजे वंशाचा दिवा. पण हाच वंशाचा दिवा जेव्हा कलंक बनतो, तेव्हा तो घराण्याला नकोसा होतो, हे वास्तव सांगणारी कथा 'कुलदीपिका.' वंशाच्या दिव्यापेक्षा पणती किती महत्त्वाची असते, हे लेखकांनी या कथेतून आवर्जून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. नको नकोशी असणारी नकुशी अर्थात दीपा ही स्वकर्तृत्वाने पंधराशे मीटर स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवते. तिच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री निधीतून एक लाख रुपयाचा धनादेश तिला मिळतो. तिचा सत्कार होतो. आणि आपल्या नातीचे केले जाणारे कौतुक पाहून बायजाक्काचं मन भरून जातं. स्त्री पुरुष तुलना करत बसण्यापेक्षा समानतेने जगलो आणि समानतेने आपण वागलो तर साहजिकच भरभराट कशी होते हेही या कथेतून पाहायला मिळते. आजच्या समाजाने मुलींकडे पाहत असताना मुलगी म्हणजे खरोखर घराण्याची पणती असून कशाप्रकारे प्रकाश देऊ शकते हे पाहावे.
           ' असे घडले साहित्यसंमेलन '
 या कथेत राजकारणातून एका खेडेगावांमध्ये कशाप्रकारे साहित्य संमेलन उदयास येते आणि गावकऱ्यांना साहित्याचा अर्थ कळत जातो हे विनोदी पद्धतीने लेखकांनी मांडले आहे. साहित्य विविध प्रकारचे असू शकते, हा गावकऱ्यांचा समज साहजिकच दूर होतो. कथा, कविता, कादंबरी, नाटक ,समीक्षात्मक लेखन, त्याचबरोबर ग्रंथ दिंडी आणि मान्यवरांच्या प्रेरणादायी मनोगतातून साहित्य संमेलनांना एक प्रकारची प्रेरणा, प्रोत्साहन मिळण्यासाठी हे साहित्य संमेलन गावपातळीवर आयोजन केलं जातं. राजकारणातून होणारे हेवेदावे, आमदार व माजी आमदारांच्या मध्ये मतभेद, रुसवे-फुगवे, मानापमान असते. पण गावागावांमध्ये वाचन संस्कृती वाढावी, साहित्याला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळावं हा साहित्य संमेलनाच्या पाठीमागचा उद्देश. पण साहित्य संमेलन भरवण्यासाठी प्रमुखाला कशाप्रकारे या आमदारांची मनधरणी करावी लागते हे या कथेतून लेखकांनी मार्मिकपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
        ' चूक एकदाच होते '
या कथेत लेखकांनी पत्नी खरोखरच समजूतदार व समंजस असेल, मोठ्या मनाची असेल तर उद्ध्वस्त होणारा संसार टिकू शकतो हा संदेश देणारी ही कथा. सर्जेराव आणि सखू या पती-पत्नीच्या संसाररुपी वेलीवरती एक फूल उमललं, पण सखू माहेरी गेलेल्या कालावधीमध्ये सर्जेरावचे मन एकटे पडले, अशा एकट्या मनाला कुणाचा तरी आधाराची गरज असते हे लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न केला. आधाराशिवाय माणूस जगू शकत नाही. पत्नीकडून मिळणारं सुख ते वेळेवर मिळाले नाही, तर दुसरीकडे सुख शोधण्याचा प्रयत्न मनुष्य करतो ही त्याची चूक नाही. चूक करू नये ती चूक सर्जेराव करतात. झालेली चूक ते पत्नीला सांगतात. मंजुळाशी असणारे संबंध सर्जेराव सखूला सांगतो. सखूचा राग अनावर होतो. अन्न गोड लागत नाही, कित्येक दिवस ती दुःखात, विचारात, टेन्शनमध्ये असते. पण ती स्वतःला सावरते, तिचे मन मोठे असल्याने आपल्या नवऱ्याला म्हणते,
 "झाली ती चूक, पुन्हा चूक करू नका. अशाप्रकारे समजावून सांगते. पत्नी नव्हे तर आईसारखी माया लावून नवऱ्याला सुद्धा खूप मोठ्या मनाने आधार देते, सिंधुताई सपकाळ या म्हातारपणामध्ये आपल्या नवऱ्याला सांभाळतात. पण ते नवरा म्हणून नव्हे तर मुलगा म्हणून सांभाळतत. एवढ्या मोठ्या मनाच्या सिंधुताई त्याप्रमाणेच या कथेतील सखूसुद्धा मोठ्या मनाची, समजूतदार आणि क्षमाशील स्वभावाची आहे. अशा घटना महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. ही महत्त्वपूर्ण घटना लेखकांनी सत्यात उतरवण्याचा आणि शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला.
          'शाळा' या कथेमध्ये लेखकानी तानाजीरावांनी उभी केलेली एक शाळा, मुख्याध्यापक प्रतापराव पाटील यांनी देहभान विसरून मुलाबाळांवर केलेली माया, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आस्था, मुलांना आपलंसं करून शिक्षणाची ओढ निर्माण केली. पण प्रतापराव पाटील यांना एक दिवस मुख्याध्यापक पदावरून काढले जाते ते तानाजीरावांच्या स्वार्थापोटी. ते कारण म्हणजे आपला पुतण्या संजयलाच मुख्याध्यापक बनवायचं होतं, पण विद्यार्थी व पालक यांची एक शक्ती वेगळीच असते. आवडणारे शिक्षक त्यांना पुन्हा कामावर घेण्यासाठी मोर्चेबांधणी केली जाते. शेवटी तानाजीरावांनी आपल्या पत्नीच्या सल्ल्याने संगीता या आपल्या मुलीबरोबर प्रतापरावांचा विवाह लावून देतात आणि प्रतापरावांना मुख्याध्यापक पदावर रुजू करतात. एक चांगला शिक्षक कामावर पुन्हा हजर झाला. शिक्षक ,पालक आणि विद्यार्थी हा त्रिवेणी संगम असतो हेच लेखकांनी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
           'चंद्रमुखी' ही कथा काल्पनिक विश्वातली वाटते. या कथेमध्ये राजपुत्र रूपवान आणि राजकन्या चंद्रमुखी यांचा बालपणी विवाह झालेला होता. ती दोघेही आपापल्या राज्यांमध्ये पंचवीस वर्षे राहतात. आपल्या मित्रांचे विवाह झालेले आहेत पण आपला अजून कसा विवाह होत नाही हे रूपवान आपल्या बाबांना विचारतो. तेव्हा त्याला कळते की, लहानपणी त्याचा विवाह झालेला आहे तो चंद्रमुखीबरोबर. तो माळ्याच्या वेशांमध्ये त्या राजकन्येच्या राजवाड्यात जातो. तिला लांबूनच पाहून त्याच्या मनामध्ये अनेक शंकाकुशंका येतात आणि त्यातूनही तो तिचा बदला घेतो. पण शेवटी व्हायचं तेच होतं, परमेश्वराने विवाहाच्या गाठी मारलेल्या असतात. पती-पत्नीच्या रूपामध्ये, विवाहाच्या रुपात आणि सत्यात वेगळेच घडते. हेच चंद्रमुखी या कथेतून लेखकांनी यशस्वीरीत्या मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
           'देणाऱ्याने देत जावे' या माध्यमातून खरोखरच देणाऱ्याचे हात घेतले तर मन भरून येते. हेच या कथेतील नायक अर्थात अजय पोवार या विद्यार्थ्यांना अण्णासाहेबांनी केलेली मदत, पतसंस्थेतील स्वतःच्या नावावरील ठेवीतून दिलेले कर्ज आणि त्या कर्जाची परतफेड करून सिव्हील इंजिनियर होणारा अजय पोवार. तो अण्णासाहेबांनाही विसरला नाही व पतसंस्थेलाही विसरला नाही. अण्णासाहेबांनी जी मोठ्या मनाने मदत केली त्याची जाणीव अजयने ठेवली. स्वतः पुन्हा त्या पतसंस्थेचा जीर्णोद्धार करणारा अजय. मनाचा मोठेपणा, जाणीव ठेवून जीवन जगणारा अजय या कथेतून लेखकांनी रंगवलेला आहे.
          'आर्मीवाला दादा' या कथेमध्ये लेखकांनी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये येणारा महापूर. डोळ्यातला महापूर आठू न देणारा पाऊस. या दोन्हीच्या वर्णनामध्ये बापलेकातील संवादसुद्धा मनातली घालमेल व्यक्त करणारा दिसतो. महापुराच्या काळात माणसांप्रमाणे नागालासुद्धा आपला जीव वाचवावा असे वाटत असते. पण नाग म्हणजे विषारी प्राणी. तोही या बोटीमध्ये येण्यासाठी इच्छुक असतो. पण मिल्ट्रीवाले दादा त्याला येऊ देत नाहीत. माणूस महत्त्वाचा आहे. माणूस वाचला तर तो अनेक इतर मुक्या प्राण्यांना जीवदान देऊ शकेल. या महापुरामध्ये बोटीमध्ये असणारी एक महिला आपला जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचवणारे आर्मीतील जवान झाडावर असणाऱ्या नागाला मारून माणसांचे जीव वाचवतो. हा देव रूपातील दादा. त्याच्याबद्दलची कृतज्ञता या कथेतून व्यक्त केलेली आहे. सदर उपकारांची जाणीव या महिलेच्या वर्तनातून दिसून येते.
            अशा विविध विषयांवर असणाऱ्या सोळा कथांमधून लेखकांनी समाजाच्या भावभावनांचा ऊहापोह केलेला आहे. वास्तवातील कथानक असल्यामुळे जिवंतपणा जाणवतो. या कथासंग्रहाचे सुंदर आणि अतिशय बोलके मुखपृष्ठ अभि पोवार यांनी रेखाटले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरचे सहाय्यक कुलसचिव डॉ. शिवाजी नारायणराव शिंदे याची अर्थपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि महाराष्ट्र राज्य वाड्मय पुरस्कार प्राप्त लेखक डॉ. श्रीकांत पाटील यांनी या कथासंग्रहाची पाठराखण (ब्लर्ब) केली आहे. हृदय प्रकाशनने अतिशय सुंदर 'भाकरचोर' कथासंग्रह आपल्या ११२ व्या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित केल्याबद्दल प्रकाशकांचेही हार्दिक अभिनंदन. 
        एक अस्सल ग्रामीण कथासंग्रह परशराम आंबी यांनी दिला आहे. त्याचे वाचक स्वागत करतील. एक उत्तम ग्रामीण कथासंग्रह दिल्याबद्दल लेखक परशराम आंबी यांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील लेखन कार्यास खूप खूप शुभेच्छा. 
 *प्रसाद जाधव*
संजीवनी विद्यानिकेतन, पन्हाळा ----------------------------------------------
पुस्तकाचे नाव :-- 'भाकरचोर' (कथासंग्रह) 
लेखक :- परशराम आंबी
प्रकाशन :- हृदय प्रकाशन (पोहाळे,पन्हाळा,कोल्हापूर) 
पहिली आवृत्ती : ५ एप्रिल २०२२
ISBN : 978-93-93129-1-09
पृष्ठे --१२८ 
किंमत - ₹ १८०  
--------------------------------------------------------------------------------------------

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी