पिंपळपान काव्यसंग्रह अनिता दिलीप कुमार कांबळे
रविवार दि. २८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन. यानिमित्ताने माझ्या वाचनात कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांचा ललित पब्लिकेशन, मुंबई यांनी प्रकाशित केलेला काव्यसंग्रह वाचनात आला. तथागत गौतम बुद्ध, क्रांतिबा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना समर्पित केलेला हा काव्यसंग्रह आहे.
खरं म्हणजे मनोगतात कवयित्रीनी 'कविता करणं' ही स्वप्नवत असणारी गोष्ट आहे असे नमूद केले आहे. कारण त्या विज्ञान आणि गणित या विषयाच्या अभ्यासक आणि विषय शिक्षिका आहेत. सन २०१९ आणि २०२० ही दोन वर्षे कोरोना महामारीने पर्यायाने लॉकडाऊनच्या छायेखाली होती. अनेक दृष्टीने हा कालावधी, शाप वाटत असला, तरी मिळालेल्या संधीचा ज्यांनी फायदा करून घेतला. त्यांना हा कालावधी वरदानच ठरलेला आहे. लॉकडाऊनचा हा काळ कवयित्री अनिता दिलीपकुमार कांबळे यांनी सदुपयोग करून घेतला असे मला वाटते. या लाॅकडाऊनच्या काळात 'पिंपळपान' हा काव्यसंग्रह आकारास आला.
साहित्य लेखन करत असताना तुम्ही गणित, विज्ञान, मराठी, इंग्रजी किंवा कोणत्या विषयाच्या अभ्यासक आहात हे महत्त्वाचे ठरत नाही, तर आपण जे अनुभवलं, साहिलं, पाहिलं आणि वाचलेलं असतं. ते कुठेतरी आपल्या मनामध्ये खदखद करत असतं. मन अस्वस्थ होतं. ते शब्दांच्या माध्यमातून कागदावरती येत असतं. मुळात कवयित्रीच्या घरी याचा वसा आणि वारसा होता. तो त्यांच्या वडिलांच्या संस्कारातून. तसेच त्यांना त्याचे पती, त्यांचे नातलग यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले होते असे मला वाटते. त्यांच्या विचारांतून पुरोगामी, विज्ञानवादी आणि विवेकवादी विचारांचा प्रभाव दिसून येतो. तसेच गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा पडलेला प्रभावसुद्धा त्यांच्या कवितेतून आपणाला पाहायला मिळतो. सत्य, समता, बंधुता, समाजवाद या मूल्यांची पेरणी त्यांच्या साहित्यात आपणाला पाहायला मिळते.
बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बसून सापडलेला विचार गौतमांनी लोकांपर्यंत पोहोचवले. तेच विचार कवयित्रीने आपल्या पिंपळपान कवितेत मांडलेले आहेत. सिद्धार्थ यांच्या पदस्पर्शाने ही धरणी पवित्र झाली असे कवयित्री म्हणते. 'महात्मा' कवितेत महात्मा फुलेंचे मोठेपण वर्णन करताना कवयित्री म्हणतात, "जे मारेकरी ज्योतिबाचा जीव घेण्यासाठी आले. त्यांनाच शिक्षणाचे दान यांनी दिलेले आहे." कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले होते. अस्पृश्यता नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. हाच विचार त्यांनी 'राजर्षी शाहू महाराज' या कवितेत मांडून 'गाव तेथे शाळा, गाव तेथे ग्रंथालय' हा विचार या कवितेतून सांगितला आहे. छत्रपती शिवरायांनी केलेल्या कार्याचं वर्णन 'कुळवाडीभूषण' या कवितेत केलेले आहे. अशा अनेक कवितेतून सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या नाम शीर्षकावरून त्यांच्या कार्याची महती कवितेतून मांडलेली आहे. प्रथा, देवदासी, लोकसंस्कृतीचे उपासक, परंपरेची गुलामी यासारख्या कवितेतून जाती, धर्म, रूढी, परंपरा याच्यावर कडाडून टीका केली आहे. जात, धर्म याच्या पलीकडे मानवता हीच श्रेष्ठ आहे, हे कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. 'संविधान' या कवितेत कवयित्रींनी डॉ. आंबेडकरांनी दिलेली मूलभूत कर्तव्ये, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये, स्त्री-पुरुष समानता, उच्च नीचतेची भिंत नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संविधान आणि इतिहास बदलला असे सांगितलेला आहे. पोस्टकार्ड, कागद, आई, जोडीदार, छत्री, मुसळधार पाऊस, शाळा अशा वेगळ्या विषयाच्या कविताही मोठ्या ताकतीने रेखाटण्याचा कवयित्रींचा प्रयत्न स्तुत्य आहे.
हा काव्यसंग्रह माझे मित्र उत्तम नलवडे यांचेकडून प्राप्त झाला. त्याबद्दल त्यांना धन्यवाद.
त्यांच्या पहिल्या पिंपळपान या काव्यसंग्रहासाठी हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी हार्दिक शुभेच्छा.
परशराम आंबी
(कोषाध्यक्ष, मराठी बालकुमार साहित्य सभा कोल्हापूर)
(उपाध्यक्ष, अ. भा. शिक्षक साहित्य, कला, क्रीडा मंच, कोल्हापूर शाखा)
वरणगे पाडळी
ता. करवीर
जि. कोल्हापूर
Comments
Post a Comment