8शाळा कथा

                               शाळा
             कोल्हापूर शहरापासून नऊ-दहा कि.मी. अंतरावर आटपाट नावाचे एक गाव होते. हे गाव शहरापासून आडवळणाला होते. गावात सातवीपर्यंत शाळा होती. गावात आठवीचा वर्ग नसल्याने पुढचे शिक्षण घेण्यासाठी मुलांना कोल्हापूर शहरात जावं लागत होते. कोल्हापूर शहर आणि या गावाच्या मधून  पंचगंगा नदी वाहत होती. या नदीवर पूल होता. पण त्याची उंची अतिशय कमी होती. थोडा जरी मोठा पाऊस पडला तरी त्या पुलावर पाणी यायचे. पाणी पुलावरून वाहत होते. महिना-दोन महिने या पुलावर पाणी राहत होते. या गावाच्या उत्तरेला एक डोंगर होता. त्या डोंगराखालून पायवाटेने पंचवीस-तीस किलोमीटर पायपीट करून कोल्हापूरला शाळेसाठी मुलांना जावे लागत होते. शाळा सुटल्यानंतर घरी परत येताना तेवढेच अंतर चालत यावे लागायचे.  साऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी गावातील प्रमुख व्यक्ती तानाजीराव आडसुळे यांनी गावातील काही लोकांना एकत्र बोलावले. आपल्या मनातील गोष्ट सांगितली. गावातील लोक त्यांना मानत होते. कारण गेली पंचवीस वर्षे ते गावचे आद्य नागरिक म्हणजे सरपंच पदी विराजमान झालेले होते. ते लोकांना म्हणाले, "लोक हो! आपल्या मुलांना शाळा शिकण्यासाठी किती आटापिटा करावा लागतो, हे आपण पाहात आहात. ऐन पावळ्यात त्यांना खूप कसरत करावी लागत होती. शाळा शिकण्यासाठी दररोज पन्नास ते साठ किलोमीटर पायपीट करावी लागते. येण्या-जाण्यामध्येच त्यांचा खूप वेळ जातो. पहिले काही तास त्यांचे चुकतात. तर शेवटच्या काही तासांना त्यांना रामराम करावा लागतो. पावसाळ्यातील किमान दोन महिने मुलांचे वाया जातात. त्यासाठी आपणाला काहीतरी करायला हवे असे मला वाटते." जमलेले लोक त्यांना म्हणाले, " जे काय करायचं सर, ते तुम्हीच करा आणि अण्णा आणि आम्हांला सांगा. सारा गाव सरपंचांना 'अण्णा'  या नावाने बोलावत होतं. अण्णा म्हणाले, "मुलांचे हाल थांबवण्यासाठी आपण आपल्या गावात एक शाळा काढू या." 
         "आता शाळा काढायची? आपणाला शाळा काढता येते?"
        "होय. आपण शाळा काढायची. मुलांबरोबर मुलीही शाळा शिकतील. आपल्या गावातील मुलं-मुली किमान दहावीपर्यंत शाळा शिकतील." अण्णांच्या या प्रस्तावाला गावातील प्रतिष्ठित लोकांनी मंजुरी दिली. गावात 'गुरुनाथ शिक्षण संस्था' स्थापन झाली. संस्थेमध्ये संचालक म्हणून अण्णांच्या पार्टीची आणि अण्णांच्या मर्जीतील लोकं होती.  आमदारांच्या मदतीने संस्थेला रजिस्ट्रेशन मिळाले. सारा गाव गुलालामध्ये रंगून गेला.
           संस्थेच्या सभासदांची मिटिंग झाली. सर्वात महत्त्वाचा विषय पुढे आला. शाळेसाठी शिक्षक पाहिजेत. तानाजीरावांनी साऱ्यांना सांगितले, "त्याची फिकीर तुम्ही करू नका. ते काम माझ्यावर सोपवा." असे ऐकताच सर्वजण अवाक् होऊन त्यांच्याकडे पाहू लागले. प्रत्येकाच्या मनात प्रश्न निर्माण झाला. 'हा मास्तर आणणार कुठून?"  तरीही सर्वांनी विचारलंच, "पण अण्णा, तुम्हांला सापडेल मास्तर?" लहानपणापासून मोठ्यापर्यंत सर्वजण तानाजीरावांना 'अण्णा' या नावानेच बोलवत होती. 
          "सापडेल म्हणून काय विचारता? अहो सापडलासुद्धा मला. आमचा पाहुणा आहे. तो बी.एड. का काय म्हणतात ते होऊन बाहेर पडलेला आहे. त्याला विचारलं म्हणजे झालं. नाही म्हणायचा नाही तो. नाही म्हणाला तरी त्याचं मानगुठ धरून आणीन इथंपर्यंत."
         "वा अण्णा! तुम्ही तर कमालच केली. धाडसी नेतृत्व आहे तुमचं. तुम्ही तर कमालच केली बुवा." अशा गौरवात सभा संपली. 
        तानाजीराव गेले मलकापूरला. त्यांनी गाठलं प्रतापला. त्याला सारं समजावून सांगितलं. प्रताप म्हणाला, " अहो मामा, यावर्षीच मी बी.एड. ची परीक्षा दिली आहे. अजून निकालसुद्धा लागला नाही परीक्षेचा. तरीही नोकरी देता तुम्ही मला!"           
        "अरे लेका, नुसती नोकरीच देत नाही, तर आमच्या हायस्कूलचा हेडमास्तर करणार आहे तुला." असं तानाजीरावांनी सांगताच प्रतापनं टुणकन उडी मारली. तो त्यांच्या पाया पडला. त्यांनी दहा रुपयाची नोट काढून दिली. प्रतापने त्याचे पेढे आणून गल्लीभर वाटले. तो दिवस त्याच्या घरी एखाद्या सणासारखा साजरा झाला. जेवणासाठी पुरणपोळीचा बेत आखला होता. तानाजीरावांनी जेवणावर येथेच्छ ताव मारला. 
         जून महिन्याची ७ तारीख मृग नक्षत्र. या नक्षत्रावर रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. मातीतून सुगंध दरवळला. वातावरणात उत्साह निर्माण झाला. मुलांबरोबर मोठी माणसेही येरझाऱ्या घालू लागली. दत्त मंदिराचा परिसर गजबजून गेला. कारण गावात सुवार्ता पसरली होती की दत्त मंदिरात हायस्कूल सुरू झाले आहे. गुलालाच्या उधळणीत आणि गुरूनाथाच्या जयघोषात दिवस कधी सरला हे कळलेच नाही कुणाला. 
        आठ जून शाळेचा पहिला दिवस. सकाळपासून लोकांची रीघ लागली होती. उद्घाटनाचा कार्यक्रम होता आज. सकाळचे साडेदहा वाजले. मंदिराचे आवार माणसांनी फुलून गेले. गावातील व गावालगतच्या परिसरातील लोक जमा झाले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटक होते भैरवनाथ पाणीपुरवठ्याचे चेअरमन पांडुरंग पाटील. अकरा वाजून गेले तरी ते उपस्थित राहू शकले नाहीत. काही निरोपही आला नाही. पाहुण्याविना उद्घाटन करण्याचे खोळंबले होते. सर्वांनी तानाजीरावांना विनंती केली, "साहेब, आपणच शाळा आणली आहे या गावात. आपल्याच हस्ते उद्घाटन होऊ द्या." पण त्यांनी कोणाचे ऐकले नाही. ते प्रतापला म्हणाले, "अहो प्रतापराव, तुमच्या हस्तेच होऊ द्या शाळेचे उद्घाटन. आपण शाळेचे मुख्याध्यापक आहात ना. हा मान आपलाच आहे." 
प्रताप म्हणाला, "नको मामा. माझ्या हस्ते नको. आपल्याच हस्ते होऊ द्या उद्घाटन. आपण अध्यक्ष आहात संस्थेचे."
     "अरे लेका, शाळेचा पहिला घटक मुख्याध्यापक. आणि मुख्याध्यापक तूच आहेस. तेव्हा होऊ दे तुझ्या हस्ते उद्घाटन.  हे बघ प्रताप, वाटीत सांडलं काय आणि ताटात सांडलं काय, एकच झालं शेवटी."
          शेवटी प्रतापच्या हस्ते उद्घाटन झाले. शाळेचा श्री गणेशा सुरु झाला. साऱ्या गावाचं कल्याण करणारी शाळा सुरू झाली. अतिशय आनंदाच्या वातावरणात तीन वर्षे कशी भुर्रकन निघून गेली हे कळलेच नाही. 
        आणि तीन वर्षानंतर......
       'नेहमीची येतो मग पावसाळा' या उक्तीप्रमाणे जून महिना आला. शाळेतील वातावरण गढूळ होऊ लागलं. नवनवीन वार्ता कानावर येऊ लागल्या. यातील एक वार्ता अशी ------
          तानाजीरावांचा पुतण्या संजय बी.एड. होऊन आला आहे. तो शाळेत शिक्षक म्हणून येणार आहे. पण शाळेमध्ये याबाबत विशेष काही वाटत नव्हते. त्याने बी.एड.ला प्रवेश घेतला तेव्हाच हे ठरलेलं होतं. पण आता वेगळीच गोष्ट घडणार होती. तो केवळ शिक्षक म्हणून येत नव्हता, तर तो शाळेचा मुख्याध्यापकच बनवून येत होता. याचाच अर्थ असा होता की प्रतापची मुख्याध्यापक पदावरून उचलबांगडी होणार होती. त्याला आता सहाय्यक शिक्षक म्हणून काम करावं लागणार होतं. प्रताप तानाजीरावांचे शब्द मानणार ही काळया दगडावरची रेघ होती. असं साऱ्यांना वाटत होतं. इतकंच नव्हे तर ते सत्य वाटत होतं. कारण प्रताप तानाजीरावांच्या शब्दाबाहेर  जाणार नाही. कारण त्याला नोकरी दिली होती ती तानाजीरावांनी. त्याच्या भाकरीची सोय केली होती तानाजीरावांनी. प्रताप तीन वर्षे मुख्याध्यापक होता. सलग चौथ्या वर्षी मुख्याध्यापक झाला असता, तर तो कायमचा त्या पदावर बसला असता. ही गोष्ट तानाजीरावाला माहीत होती. ते त्यांना परवडणारही नव्हतं. प्रताप जवळचा असला तरी पाहुणा होता. पाहुणा तो पाहुणाच. त्याला आपल्या घरची सर केव्हाच येणार नाही. त्यांना आपला माणूस मुख्याध्यापकपदी हवा होता. म्हणून त्यांनी आपला पुतण्या संजयला बी.एड. ला पाठवला होता. संजय चांगल्या नोकरीवर होता. कारखान्यात मॅनेजर पदावर होता. शिवाय त्याला चांगला पगारही होता. ते सर्व सोडून त्याला भरपूर डोनेशन देऊन बी.एड. ला पाठवला होता. तो कशासाठी? फक्त तो शिक्षक व्हावा म्हणून? नाही. तानाजीरावांना असं घडणं योग्य वाटत नव्हतं. संजय हाच मुख्याध्यापक होणे त्यांना आवश्यक वाटत होतं. कारण अध्यक्षपद आणि मुख्याध्यापकपद दोन्हीही आपल्याच घरात पाहिजे असे त्यांच्या मनात होतं. 
           या बातमीने प्रतापचं डोकं ठिकाणावर राहिलं नाही. ज्या शाळेचा पाया आपण घातला. सलग तीन वर्षे मुख्याध्यापक म्हणून ज्या पदावर आपण राहिलो.  त्या शाळेत आपण शिक्षक म्हणून राहायचं! हे त्याच्या मनाला पटत नव्हतं. अपयश हे मरणाहून वाईट असतं. तसंच पदावनतीपेक्षा नोकरी नसली तरी चालेल, असा विचार करून त्यानं आपल्या पदाचा राजीनामा दिला. आणि त्यांने आपल्या घरची वाट धरली.                 मोठ्या दिमाखात संजयने शाळेत आगमन केलं. सारी शाळा संजयच्या आगमनानं गंधित झाली. पद ग्रहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्याचवेळी त्यांनी साऱ्या संचालक मंडळाला सांगून टाकलं, ''शालेय व्यवस्थापनात कुणीही ढवळाढवळ करायची नाही. ते मला आपणास नाही. माझे निर्णय पक्के ठरलेले असतील. तानाजीरावांचा तो पुतण्या असल्याने सर्वांनी त्याचा शब्द प्रमाण मानला. अध्यक्षपदाच्या खुर्चीवरून तानाजीरावांनी संजयची मुख्याध्यापकपदी निवड झाली असे अधिकृतपणे जाहीर केले. संजयने तिथेच मुख्याध्यापकपदाची ऑर्डर स्वीकारली. शासकीय नियमाप्रमाणे सर्व प्रस्ताव तयार करून घेतला. तो शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे स्वाक्षरीसाठी पाठवून दिला.              संजयने साऱ्या शिक्षकांची मने जिंकली. हा मुख्याध्यापक नाही तर आपला भाऊच आहे अशी सर्वांची भावना झाली. मायेने विचारपूस चालली होती. डब्यातील भाजी एकत्र करून मुख्याध्यापक सर्वांना एकसारखी भाजी वाटून देत होते. प्रत्येक घासाबरोबर प्रेम वाढतच चालले होते. बघता बघता थंडीचा मौसम संपत आला. एके दिवशी मिटिंग भरली. मुख्याध्यापकांनी मिटिंगला सुरुवात केली. ते म्हणाले, "माझंच दुसरं नाव क्षमा आहे. माझ्यासारखा दुसरा कोणीही क्षमाशील माणूस तुम्हांला भेटणार नाही. आपण सर्वजण एकच आहोत. एकमेकांना अडचणीत मदत केली पाहिजे. प्रत्येकाला मदत करणं हेच माझं काम आहे. मी आपल्या सर्वांच्या पाया पडतो. तुमच्या पायाशी मला जागा द्या. अतिशय केविलवाण्या शब्दांत बोलत ते सर्वांना विनवणी करत होते. सर्वजण त्याच्या नाटकाला फसत होते. पण त्यांना कळत नव्हते की आपण काय करायला जात आहोत. सरड्यासारखे रंग बदलणाऱ्या  माणसाच्या आहारी आपण जात आहोत.  याची पुसटशीही कल्पना त्यांना होत नव्हती. सौ. काळे मॅडम म्हणाल्या, "सर असं काय करत आहात आपण?  विनवणी करणं आपणाला शोभत नाही. आपण आमचे मुख्याध्यापक आहात. आपण फक्त सांगायचं आणि आम्ही ते काम करायचं. बस्स एवढेच.              
              सर्वजण आपल्या विश्वासात आलेले पाहून ते म्हणाले, "आपण सर्वजण मिळून उद्या सकाळी एज्युकेशन ऑफिसात जायचं आहे. 
        "पण कशासाठी?" भोळेसरांनी भोळेपणाने विचारले. 
           ती फेब्रुवारी महिन्यातील २५ तारीख होती. सर्व शिक्षकांना घेऊन मुख्याध्यापक शिक्षणाधिकारी कार्यालयात गेले. कारण त्यांना सर्व शिक्षकांकडून 'नो ऑब्जक्शन' म्हणजे 'ना हरकत' दाखला' असे लिहून घ्यायचे होते. संजय मुख्याध्यापक झाला होता. पण त्याची सेवा जेष्ठता सर्वांच्या नंतर होती. एक-एक करून सर्वांनी लिहून दिले होते. संजयने आपला डाव साधला होता. 
संजयच्या हाती शाळेची सर्व सत्ता आली होती. त्यामुळे त्याने अनेक उपक्रम आपल्या शाळेमध्ये राबवले होते. सर्व सहकाऱ्यांची त्याला चांगली साथ मिळाली. अनेक उपक्रमांमध्ये त्या शाळेने आपले वर्चस्व निर्माण केले. आपले नाव प्रस्थापित केले. त्यामुळे साऱ्या पंचक्रोशीत त्या शाळेच्या नावाचा धबधबा निर्माण झाला होता. त्या शाळेची प्रगती यशाच्या शिखरावर पोहोचली होती. तानाजीरावांनी लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होत होता. 

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी