१. *वाट ही पुनवेची*

       १.  *वाट ही पुनवेची*
      नृसिंहवाडीत श्री दत्ताचे दर्शन घेतले आणि गावाकडे परत जाण्यासाठी निघालो. एस.टी.ला खूप गर्दी होती. कारण आज पौर्णिमा होती. तीही मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा होती. म्हणजे दत्त जयंती होती. हजारो भाविक दत्त दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीत आले होते. सूर्य मावळतीकडे झुकला होता. गाव ओढीने लोक परत चालले होते. नृसिंहवाडीपासून जयसिंगपूरपर्यंत सारख्या गाड्या होत्या. तिथून वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या गाड्या सुटत होत्या. एक गाडी पकडून जयसिंगपुरात आलो. 
              कोल्हापूरकडे जाणाऱ्या गाडीची वाट पाहू लागलो. एक आराम गाडी आली. त्या गाडीत चढलो. परत खाली उतरलो. कारण त्या गाडीला तिकीट दर नेहमीपेक्षा अधिक होता. पण त्याचे काही वाटले नसते मला. पण कोल्हापूरपर्यंत उभे राहून जावे लागले असते. जनता गाडीनं जायचा विचार केला. जनता रेट खिशाला परवडणारा होता. जनता गाडी येण्यास अजून थोडा अवधी होता. म्हणून मी चहा घेण्यास कॅन्टीनमध्ये गेलो. 
           जनता गाडी आली. गाडीत चढायला झुंबड उडाली.  उतरणार्‍या प्रवाशांना वाट मिळेना. कंडक्टरने आवाज दिला- ''बाजूला सरका जरा. आतली पॅसेंजर बाहेर येऊ देत. सर्वांना घेऊन जातो. कुणालाही ठेऊन जाणार नाही. तुम्ही आधी मागे सरका बघू." वाट काढत प्रवासी खाली उतरले. वर चढण्यासाठी पुन्हा सगळे एकदम तुटून पडले. प्रत्येकाला आपल्या घरी जायचे होते. प्रत्येक जण धडपडत होता. आपल्याला बसायला जागा मिळाली पाहिजे असा जो तो विचार करत होता. गर्दीच्या महापुरातून आम्ही गाडीमध्ये प्रवेश मिळवला. बसायला जागा मिळते का? हे बघत बघत पुढे सरकत होतो. काहींनी बाहेर असतानाच खिडकीत हात घालून सीटवर रुमाल, पिशवी अशी मिळेल ती वस्तू टाकून जागा रिझर्वेशन केली होती. एका ठिकाणी रिकामी जागा दिसली. पटकन जाऊन तिथे बसलो. प्रवाशांमध्ये बाचाबाची सुरू झाली. 
           "इथं बसू नका. आमचं माणूस यायचं आहे अजून."
           "अगं ये मंदा, ये ना तू. किती हा वेळ? "
            "अहो बाई, बाजूला व्हा. इथं बसू नका."
           "ये ताई,  बस इथं."
            " काय इरसाल माणसं असतात एकेक. एका वेळी चार पाच माणसांची जागा धरतात. इतरांनी कुठं बसायचं?"                 "बाईमाणूस दिसत नाही यांना. आजची कार्टी अशीच संधी साधून धक्काबुक्की करतात." ........असे संवाद कानावर येत होते. 
              माझ्या शेजारी एक युवक बसला होता. तो अगदी शांत होता. काही बोलत नव्हता. त्यानं मला बसायलाही विरोध केला नाही. यावरून तो एकटा होता. हे निश्चित झालं होतं. मीही एकटाच होतो. एकाच सीटवर आम्ही दोघे बसलो होतो. तो खिडकीतून बाहेर नवीन इमारती पाहण्यात गर्क होता. गाडी अगदी भरगच्च भरलेली होती. बारापेक्षा जास्त प्रवासी उभे राहून प्रवास करीत होते. माझ्या शेजारी एक वयस्कर स्त्री उभी होती. तिच्या मागे एक तरूणी उभी होती. माझ्या मनाला खटकलं होतं की ती स्त्री असून उभी राहिली. आणि मी पुरुष असून बसलो आहे. हे माझ्या मनाला  बरं वाटलं नाही. म्हणून मी त्या वयस्कर स्त्रीकडे पाहून म्हणालो, "मावशी बसा तुम्ही. मी उभा राहतो." असं म्हणून मी उठलो आणि माझी जागा रिकामी करून त्यांना दिली. पण मला आश्चर्याचा धक्काच बसला. 'ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं.' असं मी मनातल्या मनात म्हणालो. कारण मला वेगळाच अनुभव आला. म्हणजे ती वयस्कर स्त्री तिथं बसली नाही. तर तिने त्या तरुणीला तिथं बसायला सांगितलं होतं. असा निर्णय का घेतला असावा त्या मावशीनं! याचा उलगडा मला काही झाला नाही. मी त्या तरुणीच्या शेजारी उभा राहिल्याने काही गैरवर्तन घडेल असा विचार तर मावशीच्या मनात आला नसेल? अशी शंका माझ्या मनात आली. काहीही असो. पण मी माझे कर्तव्य केले होते. एका स्त्रीला बसायला जागा दिली होती. वयस्कर स्त्री बसली नाही तरी तरुण स्त्री बसली होती. हेही नसे थोडके. 
           "तिकीट....तिकीट..... सुट्टे पैसे काढा." असा कंडक्टरने आवाज दिला. डबल बेल झाली. गाडीने जयसिंगपूर स्टेशन सोडले. झाडे, इमारती, विजेचे खांब मागे पळू लागले होते. पहिले स्टेज मागे गेले. सारी गाडी बोलत होती. बोलत नव्हते फक्त ते दोघे. तो तरुण आणि ती तरुणी. तो खिडकीतून बाहेर पाहात होता. तो काहीतरी न्याहाळत होता ते त्यालाच ठाऊक. पाण्याने भरलेला घडा घरात असताना तो सोडून मृगजळाच्या पाठी लागावं अशी त्याची गत झाली होती. तीही डोळे झाकून कसला तरी विचार करत असावी असं मला वाटत होतं. कोणत्या तरी शास्त्रज्ञाने शोध लावला आहे की, 'विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण होते. तर सजातीय ध्रुवामध्ये प्रत्याकर्षण होते. पण हा नियम येथे साफ खोटा ठरला होता असं मला वाटू लागलं. तो आपलं अंग चोरून बसला होता. ती आपलं अंग शैल सोडून बसली होती. 
             दुसरे स्टेज आलं. गाडी थांबली. ब्रेक जोरात लागल्याने तिचा तोल गेला आणि ती त्याच्याकडे थोडी झुकली. तिच्या मुखातून 'स्वारी' हे शब्द बाहेर पडले. 'दॅटस् ओके' तोही म्हणाला. पुन्हा दोघेही आपापल्या स्वप्नात रममाण झाले. डबल बेल झाली. गाडीने वेग घेतला. कोणताही नियम सत्यावर आधारित असतो याची जाणीव मला होऊ लागली. अग्निच्या सहवासात लोणी आल्यास ते विरघळते.  बर्फाला थोडेसे तापमान मिळाले की त्याचे पाणी होते. पण राजधातू सोने वितळण्यास खूप तापमान असावे लागते. प्रत्येकाचा द्रवणांक वेगळा असतो हेही खरे आहे. माझं तिच्याकडे लक्ष गेलं तिच्या हालचालीवरून तिचं चलबिचल होणे दिसत होते. तिची चुपके चुपके नजर त्याच्याकडे जात होती. तो मात्र स्थितप्रज्ञ दगडासारखा स्थिर होता. त्याची नजर बाहेरच होती. काय करावं हे तिला सुचत नव्हते. ही कोंडी कशी फोडावी या विचारात ती होती.  हे तिच्या चेहऱ्यावरून मला जाणवत होतं. 
              तो अगदी खिडकीला चिकटून बसला होता. ती मात्र त्याच्याकडे सरकली होती. खरंच आजकालच्या तरुणी इतक्या बिनधास्त आणि बेधडक बनलेल्या आहेत. तरुणांनीच काय तो संयम पाळावा. धक्काबुक्की होईल म्हणून त्यांनी स्वत:ला जपायचं. पण आजच्या तरुणींनी मनाला येईल तसं वागायचं. पाहा, पाहा कसा चोरून बसला आहे तो स्वत:ला. ज्वालामुखीसारखा उद्रेक उसळून आला असेल त्याच्या मनात. म्हणून त्याने बाहेर केलेले तोंड आत वळवले असावे. त्याच क्षणी तिने आपली मान सर्रकन फिरवली. शून्यात नजर लावून बसली. माझं काही अडलं नाही. 'गरज असेल तर त्यानं बोलावं अगोदर' असं तर तिच्या मनात आलं नसावं? असा पुसटसा प्रश्न माझ्या मनात येऊन गेला. झुंजीच्या बैलाप्रमाणे दोघे आपापल्या जोशात उभी होती. कोणीही माघार घेण्यास तयार नव्हते. तिला वाटत असावं की त्याने आधी बोलवावं. त्यांच्या या अबोल भांडणात गाडीने चौथे स्टेज कधी मागे टाकले हे कळलेही नाही. डबल बेल झाली. गाडी वेगाने धावू लागली. त्याचवेळी तिच्या तोंडून शब्द बाहेर पडले..... 
         "अहो मिस्टर, ऐकताच ना?''
         " ऐकत नाही मी तर पाहतोय बराच वेळ."
         "काय?"
         "खिडकीतून बाहेर......आजूबाजूची झाडं."
          "त्याबद्दल बोलत नाही मी."
           " मग कशाबद्दल?" त्याची नजर अजूनही खिडकीतून बाहेर. 
         "मी काय म्हणते ते ऐकतोय ना?"
          "आपण काय बोलतच नाही. आणि ऐकताय ना....ऐकताय ना....काय लावलंय!" थोडा रागात तो म्हणाला.            "पण तुम्ही समजूनच घेत नाही. मग समजणार कसं?"            "पण काय?"
          "हेच की....."
          "ना ओळख ना पाळख आपली. मग बोलायचं कसं?"            "पण बोलल्याशिवाय कशी होणार ओळख?"
          "हो ना. आततायीपणा केला म्हणून गालही चोळायला मिळायचा स्वतःला स्वतःचा. असंच ना!"
          "तसं काही नाही हो. मला कळतोय शब्दातला अर्थ. गेले नसते मी इतक्या थराला."
         "खरंच! मग काही हरकत नाही. बरं. आपण जाता वाटतं कॉलेजला?" त्यानं विचारलं. 
        "हो. कॉलेजला शेवटच्या वर्षाला आहे." ती म्हणाली.              तिची गाडी सुरळीत चालू झालेली पाहून मावशीच्या डोळ्यात चमक जाणवू लागली. वेळाने का होईना, पण यश येतंय हे पाहून तिला कृतकृत्य वाटलं. आपण एका जबाबदारीतून मुक्त होणार या आनंदात ती असावी असं मला वाटत होतं. 
         "मला काय म्हणालात?" तिने विचारले. 
          "काही नाही. तुमचे ओठ हलल्यासारखे दिसले."                    "आपलं......" विचारावं की नको यातच अडकला होता तो. 
          "अहो विचारा ना तुम्ही. असं ढेपाळता का मध्येच? आणि आपण, आपलं म्हणायचं बंद करा आधी. तू म्हणा नाहीतर तुम्ही म्हटलं तरी चालेल." दुरावा कमी करण्याचा तिने केलेला हा प्रयत्न. 
           "आपलं....चुकलोच. तुमचं नाव काय?" धाडस करून त्याने विचारलं. 
           "इतकंच होय. माझं नाव अश्विनी." असं म्हणून नावा- गावापासून सारी माहिती तिने दिली. मावशी तर आपल्या मुलीवर बेहद्द खुश होती. आज दीड वर्ष होऊन गेले. प्रत्येक पौर्णिमेला वाडीला घेऊन येते तिला. असं जमत येतं तिचं, तोवर काहीतरी बिनसते आणि मोडते लग्न तिचे. गावाजवळच्या लेण्यात राहणाऱ्या महाराजांनी सांगितले होते की 'वाडीला जाऊन २१ पौर्णिमा करा, म्हणजे या मुलीचं लग्न जमेल.'  हे शब्द आठवून मावशीचं अंग शहारलं होतं. कारण आता मुलीनं टाकलेला गुगली वेगळाच होता. विकेट पडणार हे निश्चित होतं. म्हणून मावशी हुरळून गेली होती. 
          "अहो! तुमचे नाव काय?" बराच वेळ रंगाळत राहिलेला प्रश्न तिने विचारला. 
          "अविनाश अरविंद अडसुळे" त्यानं नाव पूर्ण केलं. 
          "व्वा! 'ए'चा घन म्हणायचा." नावावर कोटी केली तिनं.            "काय करताय म्हणायचं तुम्ही?" मूळ मुद्द्यालाच हात घातला तिनं. 
          "बऱ्यापैकी नोकरी आहे." 
          "तसाच बर्‍यापैकी पगारही असेल?"
          "एका सहकारी संस्थेत क्लार्क म्हटल्यावर जेमतेम चार हजारापर्यंत." 
           "हो चालेल."
            "मला काय म्हणालात?"
            "नाही. तसं काही नाही. आपण राहता कुठे?" तिने फिरकी घेतली. 
            " कोल्हापूर शहरात. माजी आमदारांच्या बंगल्याजवळ. तेथे असणाऱ्या एका फ्लॅटमध्ये राहतो."
            "फारच छान. माझी चुलत बहीणही तिथेच राहते कुठेतरी."
            "पण तुम्ही मला दिसला नाही कुठे तिथं?"
             "कशी दिसणार मी? ती नांदायला आहे ना तिथं."                   "तुम्ही कधी आला नाही वाटतं तिथं?"                                "लग्नात आले होते तिच्या. दोन वर्षांपूर्वी.'' 
             "घरात कोण कोण असतं तुमच्या?" अगदी ठेवणीतला प्रश्न विचारला. 
            "आई-वडील, लहान भाऊ आणि......"
            "आणि कोण आहे?" त्याचं वाक्य मध्येच तोडत तिनं विचारलं. 
            "आणि माझी पत्नी." त्याने मुळावरच घाव घातला.                 तोच कचकन ब्रेक लावल्याचा आवाज आला. गाडी थांबली. कारण आठवे स्टेज आले होते. त्या उत्तराने ती पूर्ण कोसळून पडली होती. त्याचे स्टेज आल्याने तो आपले साहित्य घेऊन खाली उतरू लागला. जाता जाता "बरं येतो मी. मला खाली उतरून घराकडे जाणारी गाडी पकडली पाहिजे." असं म्हणून तो खाली उतरला. पण तिच्यात मान वर करून पाहण्याचं त्राणही उरलं नव्हतं. पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे तिची अवस्था झाली होती. आर्त गाणे गात होती. रिकाम्या झालेल्या जागेवर तिच्याजवळ बसून पाठीवरुन हात फिरवत मावशी म्हणाली, "बाळ, असं उदास होऊन कसं चालेल? ही तर आपली १७ वी फेरी आहे. अजून चार फेऱ्या बाकी आहेत. परमेश्वरावर विश्वास ठेव. त्याने चोच दिली आहे. तसा तो अन्नसुद्धा देईल. डबल बेल झाली. गाडीने वेग घेतला. ती जलद गतीने धावू लागली. पुढे.....पुढे.....आणि पुढे......... 

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी