३. *रावसाहेब*

                        ३.  रावसाहेब                                                    
             इथंच आहे पण दिसत नाही.....वारा. तोच वारा पाच दारा.....पावा. तोच पावा भिंतीत रोवा.....खुंटी........                          .......आज अचानक मला या उखाण्याची आठवण होण्याचं कारणही तसंच घडलं आहे. अगदी अनपेक्षित. एक अशी घटना घडून आली आहे माझ्या जीवनात. हो हो. सांगतो की. पण जरा दम तरी धरा. हं काय झालं बरं? हो. अनपेक्षित एक व्यक्ती माझ्यासमोर आली आणि म्हणाली, "काय रावसाहेब? इथंच हायसा आणि मला कुठं दिसला नाहीसा ते!" या अचानक आलेल्या प्रश्नानं मी तर अगदी गर्भगळीत झालो होतो. एकदम अंगावर वीज कोसळावी तसा मी सुन्न झालो. क्षणभर मला काही कळेनासं झालं. सुचेनासं झालं. तरीपण स्वतःला सावरत मी प्रतिप्रश्न केला, "आपण कोण? मला कसं ओळखता?" 
              "काय हे रावसाहेब? आपली तर जन्मा-जन्माची ओळख आहे. तरी तुम्ही मला ओळखत नाहीसा?"                              ........खरं तर 'रावसाहेब' हे माझं नाव नाही किंवा या टोपणनावानं मला कोणी बोलावत नाही. काही क्षण  निशब्द व निश्चयी मुद्रेने मी उभा होतो. भूतकाळाची एक सफर करून आलो. घड्याळाचे काटे उलटे फिरले. माझ्या जीवनातील अलीकडचा काळ, नोकरीच्या सुरुवातीचा काळ, तारुण्याचा काळ, कॉलेजचे जीवन, हायस्कूलचे जीवन आणि बालपणीचा काळ असा प्रवास सुरू होता. प्राथमिक शाळेतील जीवन मी पाठवू लागलो...........
              नुकतीच माझी शाळा सुरु झाली होती. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. मला शिकवायला काका गुरुजी होते. ते खूप गमतीशीर होते. लाडात येऊन शिकवायचे. शिकवता शिकवता वर्गातल्या पोरा-पोरींना काही टोपणनावे देऊन जायचे. कोणाला 'नाग'  म्हणायचे, कोणाला 'म्हशी' म्हणायचे. मला आठवले.....त्यांनीच माझे बारसे घातले होते-'रावसाहेब.' प्राथमिक शाळेतील पहिलीच्या वर्गात असताना त्यांनी माझे नाव ठेवले होते - 'रावसाहेब.' त्यावेळी सारा वर्ग मला 'रावसाहेब' या नावाने संबोधत होता. माझे खरे नाव होते महादेव शंकर आवळे. परंतु माझे खरे नाव बाजूला पडले आणि 'रावसाहेब' या नावानेच मी प्रसिद्ध झालो होतो.                            माझ्या वर्गात केशव, विलास, अशोक, रवींद्र, प्रकाश, संजय, मिलिंद अशी मुलांची नावे होती. तर शारदा, भारती, संपदा, हिराबाई, नयना, सोनाबाई अशी मुलींची नावे होती. भूतकाळाच्या रुपेरी पडद्यावर मी विराजमान असतानाच माझ्या कानावर परत शब्द आले 'रावसाहेब.' मी भानावर येत "हो" म्हणालो. एक एक चेहरा नजरेसमोरून घालवू लागलो. ''कोण बरे असावी? सोना, हिरा, भारती, शारदा यापैकी कोण बरे असावी? की ती वेगळीच कोणीतरी असेल?" मनामध्ये अनेक शंका-कुशंकांचे माहोल उठले होते. साठीत असणारा मी. पन्नास वर्षांपूर्वीच्या कालखंडात संचार करत होतो. इतक्या वर्षानंतर नेमकं कसं ओळखावं की ही कोण असावी? माझा प्रवास सुरु होता शोध घेण्याचा. पण काही केल्या लक्षात येईना. आणि पराभव झाला हेही मान्य होईना. शेवटी 'मी हरलो' असे म्हणावेसे वाटले. आणि म्हणालो, "बरं बाई, मी आता हरलो. कोण आहेस तू?  सांगशील का तूू? " ती खळखळून हसली आणि म्हणाली, "वय वाढलं तसा थोडा म्हातारा झालास. पण बालपणातील तुझी निरागसता काही गेली नाही हे मात्र खरं. बालपणासारखाच आजही तुझी झालेली चूक तू कबूल करतोस बरं का!"  आणि काय आश्चर्य नकळत माझ्या मुखातून शब्द बाहेर पडले--- 'संजना.'  ती अवाक् होऊन माझ्याकडं पहात राहिली. मी विचारले,"काय झाले?"     
           "अरे लबाडा! मघापासून इतका वेळ हे नाव घ्यायला लावलास आणि आत्ता एका झटक्यात माझं नाव घेऊन मोकळा झालास."                   
             "अगं तुझ्या शेवटच्या वाक्यावरून अंदाज केला आणि तोंडी नाव आलं बघ. किती वर्षांनी भेटतेस तू? मग कसं ओळखणार मी? आणि पहिल्या सारखी दिसतेस तरी का तू?"                "मी नाही का दिसेना. पण तू मात्र आहेस तसाच आहेस बघ. फारसा बदल झालेला दिसत नाही तुझ्यात. लहानपणीसारखाच दिसतोस तू. तसाच अंगकाठीनं सडपातळ. साठी उलटली तुझी, पण देवानंदसारखा एवरीग्रीन दिसतोस तू."                        
               "अगं बाई, किती वेळ बोलत उभी राहणार आहेस तू इथे! चल माझ्या घरी जाऊ. घर जवळच आहे इथं. मारुती देवळाच्या खालच्या बाजूस. माझ्या हिचीपण ओळख होईल तुझ्याशी. बोलत बसायला मिळेल तिच्याशी तुला."                              "रावसाहेब, त्याची आता काही जरूरी नाही. माझी आणि वहिनींची ओळख झालेली आहे परवाच. नदीवर धुणे धुवायला गेल्यानंतर. तुमच्याशीच बोलत बसायला येईन सवडीने पुन्हा एकदा. मी जाते आता." अशी म्हणाली आणि क्षणाचाही विलंब न करता ती निघून गेली. तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे कितीतरी वेळ मी पहात राहिलो. घराकडे न जाताच मारुतीच्या मंदिरात जाऊन मी बसलो. भूतकाळातील घटनांचे एक एक पान काढत.....                                                        ..... तसा मी बालपणी शाळेला जात होतो. पण शाळेत न जाताच या मारूतीच्या देवळात बसायचो. दिवसभर खेळायचो. सायंकाळी पोरं शाळेतून घरी परत निघाली, की मी त्यांच्याबरोबर घरी परत जायचो. आजच्या इतकी शिक्षणाबाबत त्याकाळी एवढी जागृकता झालेली नव्हती. 'शिकला तर शिकला, नाहीतर शेतातली कामं करायला फुकटात गडी मिळाला' अशी त्यावेळी बापाची धारणा झालेली होती. एकदा माझा दोस्त केशव मला म्हणाला, "अरं म्हादू आपण शाळेला जाऊया. खूप खूप शाळा शिकूया. आपण साहेब होऊया. "                                                 
                मी म्हणालो, "अरे बाबा, गुरुजी लई मारत्यात."  तेव्हा तो म्हणाला, "अभ्यास नाही केला तर गुरुजी मारत्यात. आपण खूप खूप अभ्यास करायचा. नेहमी पहिला नंबर काढायचा."                                          
               दुसरा दिवस उजाडला. सारं जीवनच बदलून गेलं. शाळा सुरू झाली ती थांबलीच नाही. पहिलीच्या वर्गात पाय ठेवला. त्यावेळी पहिलीचा वर्ग मांगवाड्यातील समाज मंदिरात भरत होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मागे एक जुनी पाठी होती. केशवनं ती पाटी काढून मला दिली. त्या पाठीवरच माझा 'श्री' गणेशा सुरू झाला. हळूहळू मी वर्गात मिसळत गेलो. आम्हाला भेटलेले काका गुरूजी फार चांगले होते. शिकवण्यात त्यांचा हातखंडा होताच, पण त्यांची मुलांना हाताळण्याची पद्धती वेगळी होती. पन्नास वर्षापूर्वी त्यांनी आपल्या वर्गात मुले आणि मुलींना एकत्र बसले होते. जात, पात, धर्म किंवा लिंग यांचा भेदभाव केला जातो हा विचारही त्यावेळी कधी मनात डोकावला नाही. काही बालसुलभ गोष्टी मात्र घडत होत्या. एकमेकांच्या खोडी काढणे होत होते. पूर्वी गोष्टीरूप रामायण होते. मला रामायण तोंडपाठ होते. दुपारी चार वाजले की खेळाचा तास असायचा. मग काय? रामायणाच्या गोष्टी खेळाच्या माध्यमातून सुरु व्हायच्या. मी राम व्हायचो, संजना सीता व्हायची. केशव मात्र हनुमान व्हायचा. कारण तो शरीराने बलदंड होता. फोटोत दाखवल्याप्रमाणे तो राम आणि सीतेला खांद्यावर घेऊन फिरायचा. खेळाचा तास केव्हा संपला हे कळायचेही नाही.                   पहिली..... दुसरी.... तिसरीला आलो. आजही मी दिलेली तिसरीची परीक्षा मला आठवते. सन१९७७-७८ सालाला मी तिसरीला होतो. आमची तिसरीची वार्षिक परीक्षा पाटीवर पेेेेेेेेेेन्सिलीने उत्तरे लिहून दिलेली आठवते. सर्वांच्या आधी माझी उत्तरे सोडवूून झाली होती. मला काका गुरुजींनी शंभर पैकी शंभर गुण पाटीवर दिलेले आठवतात. याच आनंदात मी घराकडे धूम ठोकलेली होती. हे मला आजही आठवतंय. मी चौथीच्या वर्गात आलो. स्कॉलरशिप परीक्षेला काही मुलांना बसवण्यात आले होते. त्यामध्ये मुलीही होत्या. मी, संजय, मिलिंद, महादेव, रणजीत, शिवाजी अशी मुले होती, तर संजना, नयना, संपदा, हिराबाई अशा मुली. काका गुरुजी खूप दूरच्या गावावरून येत असल्यामुळे शुक्रवारी ते मुक्कामाला  शाळेतच असायचे, मुलांना शाळेत अभ्यासाला बोलवायचे. त्यामुळे खूप अभ्यास व्हायचा.                                              फेब्रुवारी १९७९ मध्ये स्कॉलरशिपची परीक्षा झाली होती. परीक्षा वडणगे केंद्रावर होती. गावातून मधल्या वाटेने चालत जावे लागे. सहा सात किलोमीटर अंतर होते. किमान दिड-दोन तास चालत जायला आणि तितकाच वेळ परत यायला लागायचा. कारण आजच्यासारखी त्यावेळी वाहने नव्हती. मन लावून मी पेपर लिहिले. माझे डोके दुखत होते. परीक्षा होऊन परत येताना काही जण म्हणत होते की, चक्कीत धूर काढीन. शेंडीत जाळ करीन. मी मात्र अगदी शांत होतो.  कारण माझे डोके दुखत असल्याने मला काही सुचत नव्हते. सगळे मला चिडवत होते. मात्र संजना सगळ्यांना सांगत होती, "अरे त्याला चिडवून काय उपयोग? थोडं थांबा आणि पाहा. त्याचाच स्काॅलरशिप परीक्षेत नंबर येईल." काका गुरूजी शांत होते. कारण पोरं ही दंगा करणारच. पायपीट करावी लागायची. मग हसत-खेळत पोरं जातात. पायाखालची वाट वसरते.                                         
              जून महिना उगवला आणि शाळा सुरू झाली.  काही आठवड्यात स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल जाहीर झाला. वरणगे शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत चमकले. गावासाठी एक नवा इतिहास निर्माण झाला. गावातील स्कॉलरशिप परीक्षेत विद्यार्थी येण्याचा शाळेला पहिल्यांदाच मान मिळाला होता. एक-दोन नव्हे तर  तब्बल चार विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत आले होते. त्यामध्ये जिल्हा स्तरावर मी एकटा आलो होतो. तर शिवाजी, संजय आणि मिलींद हे तिघे तालुकास्तरावरील गुणवत्ता यादीत आले होते. आजपर्यंत एकही विद्यार्थी या परीक्षेत पासही झाले नव्हते; पण यावर्षी काका गुरुजींनी चौकार लगावला होता. सारा गाव आनंदात नाचत होता. काका गुरुजींचे नाव साऱ्या पंचक्रोशीत गाजत होते. त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेत झाला होता. मुलांचे सत्कार करण्यात आले होते.                                                  कोल्हापूर जिल्ह्यात एकविसावा आणि करवीर तालुक्यात दुसऱ्या क्रमांकाने मी उत्तीर्ण झालो होतो. काका गुरुजींनी माझी अभ्यासातील हुशारी पाहून मला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये घालायचा निर्णय घेतला.  मे महिना सुट्टीचा महिना असतो. पण या शाळेची प्रवेश परीक्षा सुट्टीत असते. मी परीक्षा दिली. माझी निवड झाली. पण काका गुरुजींच्या पुढे प्रश्न होता. तो म्हणजे वसतीगृहात राहण्यासाठी होणारा खर्च. शिक्षण, भोजन आणि राहण्याचा खर्च काहीच नव्हता. पण कपडे, अंथरून,पांघरुणासाठी काय करायचं? तेव्हा त्यांनी तो प्रश्न निकाली काढला. माझा गावाच्या वतीने सत्कार केला. त्या सत्काराला त्यावेळेस पाचशे रुपये बक्षीस मिळाले होते. खरं म्हणजे १९७९ सालामध्ये चहाचा कप पंधरा  पैसे आणि भजी पस्तीस पैसे होती. यावरून त्या वेळच्या पाचशे रुपयेची आजची किंमत  किती असेल याचा अंदाज येईल.                            
                माझी शाळा बदलली. माझे मित्र बदलले. एका नव्या जगात मी रममाण झालो. माझे बालपणीचे मित्र-मैत्रिणी त्यांच्या जगात रममाण झाल्या. मी शिकत राहिलो. माझ्या मित्रांपैकी काही मित्र शिकत राहिले. काही मैत्रिणी शिकत राहिल्या. पण बऱ्याच मित्र आणि मैत्रिणी शाळा सोडून घरी राहिले. अनेक मुलींची लग्न झाली. त्या आपापल्या संसारात रमून गेल्या. काही कारणाने मित्रांच्या भेटी व्हायच्या. जुन्या आठवणी निघत होत्या. तेवढाच भूतकाळाचा उजाळा व्हायचा.                                         
               मनात काही गोष्टी असतात; पण व्यक्त करता येत नाहीत. त्या सुप्त अवस्थेत पडून राहतात.  पूर्वीचा काळ आजच्यासारखा सुधारलेला नव्हता किंवा विद्रोह करण्यासारखाही नव्हता. समाजाच्या, मर्यादेच्या बाहेर जाऊन गोष्टी करायच्या नाहीत असा अलिखित संकेत होता. काही गोष्टी करायच्या असतील तर त्या चोरून किंवा मर्यादित राहूनच कराव्या लागत होत्या. नाहीतर एखादी गोष्ट समजल्यावर संपूर्ण गाव वाळीत टाकत होता. गावात जरा कुठे काही समजलं की ते साऱ्या गावभर व्हायचं.                                           तसा माझा भागच वेगळा होता. कारण शाळा शिकायला बाहेर गावी, कॉलेजला कोल्हापूर शहरात, तेही वसतीगृहामध्ये. शिक्षण होताच नोकरी करावी लागली. कारण त्याशिवाय पर्याय नव्हता. नोकरी मिळताच छोकरी आली.  माझा संसार सुरू झाला. तोही सासरवाडीत. माझ्या भावांची लग्ने झाली. नंतर मी बायकोच्या इच्छेखातर गावी आलो. गावात शेती पहात नोकरी करू लागलो. सारं काही सुखात चाललं होतं. मुलं शिकली. नोकरी करू लागली. गावात दहा वर्षे राहतोय. पण आज अचानक घडलेली ही घटना. ध्यानी मनी नसताना, गावात असताना आजच संजनाची गाठभेट पडली. माझा सारा भूतकाळ माझ्या नजरेसमोरून काही क्षणात तरळून गेला. तोही एखाद्या चित्रपटासारखा. काही दिवसांनी संजना परत आमच्या घरी आली. ती म्हणाली, "दहा वर्षे झाली, पण तुला माझ्या घरी यावं असं कधी वाटलं नाही."               "हे बघ संजना, तू समजतेस तसं काही नाही. तू या गावात आहेस हेच मला माहिती नव्हतं. तुला पाहून मला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. तू माझ्यासमोर आलीस तरी मी तुला ओळखू शकलो नाही. तर मग तुला न पाहता कशी ओळखणार? माझं सारं जीवन संघर्ष करण्यात गेले. खूप वर्षापूर्वीच्या, बालपणातल्या आठवणी कशा राहणार माझ्या लक्षात?कधीमधी मित्रांची भेट व्हायची, चर्चा व्हायची. कोण कुठे आहे? कोण काय करत आहे? अशी विचारपूस व्हायची. पण तुझा फारसा उल्लेख व्हायचा नाही. कारण तुझं लग्न लवकरच झालं होतं. मी पाचवीपासूनच शिक्षणासाठी गावाच्या बाहेर होतो. लग्नानंतरही सासरवाडीत राहत होतो. दहा वर्षापूर्वी गावात आलो. पण आजही माझी फारशी गावातल्या लोकांशी ओळख नाही. मला वाटले होते की तुझं लग्न बाहेरच्या गावी झालं असेल. तुझं लग्न याच गावात झालेलं असलं तरी तू मोठ्या घरात गेलेली होतीस. मला कळलं असतं तरी मी कसा भेटायला येणार तुझ्या घरी? त्यांना काय वाटलं असतं? तूच सांग."          
                " तुझं खरं आहे म्हादू, मी असेल मोठ्या घरातील, पण भाऊ म्हणून भेटायला यायला काय हरकत होती?  नाहीतरी इतक्या वर्षात जे नातं होतं ते आता राहिलं तरी आहे का? ते केव्हाच पुसट होत गेलंय. तुझ्या मुलांची लग्नं झालीत; तशी माझ्याही मुलांची लग्नं झाली आहेत. खरं तर जे नशिबात आहे ते व्हायचं. सर्व नात्यांच्या पलीकडे मानवता नातं आहे. ते कसं विसरून चालेल!"                            .           
               त्या दिवशी रक्षाबंधनाचा सण होता. बायकोला आरती करायला सांगितली. पाट मांडायला सांगून पाटाभोवती रांगोळी काढायला सांगितली. मी पाटावर बसलो. माझा हात पुढे केला आणि संजनाला हातात राखी बांधायला सांगितली. बायकोनं कपाटातली एक नवी कोरी साडी काढून आणली. त्यादिवशी मस्तपैकी पुरणपोळीचा बेत केला. मी, बायको आणि संजना एकत्र बसून जेवण केलं. नवी साडी नेसून संजनाची पाठवणी केली. एका नव्या नात्याची सुरुवात झाली. संजना घरातून निघाली. मी त्या दिशेला कितीतरी वेळ तसाच पाहत होतो.

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी