प्रकरण - २

प्रकरण-2
         माझी सर्व भावंडे रजपूतवाडी येथे लहानाची मोठी झाली होती.  रजपूतवाडी हे माझे आजोळ होते.  पण माझे खरे आजोळ वाळवा तालुक्यातील शिरगाव होय.  शिरगाव हे कृष्णा नदीच्या काठावरील गाव.  पूर्वी कृष्णा नदीला पाणी नसायचे. त्यामुळे पावसाळ्यात होणारी पिके घेतली जायची.  बाकी आमच्या गावातून बैलगाडीतून शिरगावला  धनधान्य नेले जायचे.  पूर्वी १९६० च्या दरम्यान दुष्काळ पडला होता.  शिरगावातील माझे आजोबा आणि त्यांची भावंडे आमच्या गावी आली होती. त्यावेळी रजपूतवाडी येथील किशाबापूचा बंगला बांधण्याचे काम सुरू होते.  त्या बांधकामावर माझे आजोबा आणि त्यांची भावंडे काम करायला होती. अलीकडे म्हणजे वीस वर्षापूर्वी  रजपूतवाडी येथे आज इंदिरानगर आहे , तेथे चुन्याची घाणी होती.  त्या चुन्याच्या घाणीमध्ये चुना तयार करून बंगल्याचे बांधकाम केले होते.  माझ्या आजोबाचा एक भाऊ आप्पाजी  बुधवार पेठेतील तोरस्कर चौकात  जावून राहिलेला आहे. तर एक भाऊ गुंडाप्पा  केर्लीमध्ये जावून राहिलेला आहे.  माझे आजोबा गणपती  रजपूतवाडी येथे घर खरेदी घेऊन राहिलेले आहेत.  तर बापूजी  , शिवाप्पा आणि मुलाप्पा असे तिघे भाऊ परत शिरगावला जाऊन राहिले आणि शेती करू लागले . आता कृष्णा नदीला पाणी आले. शिरगाव गाव सुपीक झाले. सांगायचं तात्पर्य इतकंच आहे की रजपूतवाडी म्हणजे गोकुळातील नंदनवन होते. शाहू महाराजांची छावणी होती. सोनतळी ही रजपूतवाडीलगतच आहे.  आमच्या आजोळी रजपूतवाडीत  पाहुण्यांचे येणे-जाणे मोठ्या प्रमाणात असायचे. घरात म्हशी भरपूर होत्या. त्यामुळे दुधाला कमी नव्हते.  शेजारी कार्पोरेशनचे शेत असल्यामुळे तेही कसण्यासाठी मिळालेले होते.       
           यादरम्यान वरणगे प्रयाग चिखलीच्या मध्ये कासारी नदीवर छोटा पूल झालेला होता.  त्यामुळे त्या पुलावरून उन्हाळा व हिवाळा वाहतूक सुरू होती.  पूल लहान असल्यामुळे पावसाळ्यात अगदी सुरुवातीलाच त्या पुलावर पाणी यायचे.  तेव्हा वरणगे -केर्ली याठिकाणी पावसाळ्यात नाव सुरु असायची. वरणगे , पाडळी , निटवडे , यवलूज , पडळ , माजगाव अशा गावांतील लोकांची वाहतूक पावसाळ्यात या नावेतून व्हायची.  पावसाळ्यातील वाहतुकीसाठी या गावांतून दिवाळीच्या वेळेस सुगीला भात , मक्का व गूळ बैतं म्हणून धान्याच्या स्वरूपात मिळत होते.  माझे वडील,  चुलता आणि माझे भाऊ पावसाळ्यात नाव चालवण्याचे काम करत होते. नाव चालवत असताना दिवसभर पावसात उभे राहावे लागत असल्यामुळे काही व्यक्तींच्या सहवासामुळे वडिलांना दारूचे व्यसन लागले होते.  संध्याकाळी नावेवरून येतानाच दारू पिऊन यायचे.  पावसाळा संपल्यानंतर मात्र वडिलांचं काम असायचं ते म्हणजे रजपूतवाडीतील म्हशीचे दूध विकायला कोल्हापूरला जायचे.  कोल्हापुरातील गंगावेशमधील मिठारी यांचे हॉटेल.  तसेच चहा गाडीवाले व काही ग्राहक यांना दूध दिले जायचे.  दारूचे व्यसन असल्यामुळे वडील परत येताना काही वेळेला बिकट प्रसंग घडायचे. एकीकडे सायकल , दुसऱ्या बाजूला घागरी पडलेल्या असायच्या.  या प्रसंगावरून घरात अनेकदा भांडणे व्हायची. आजोबा शिव्या घालायचे. पण वडील खाली घातलेली मान कधी वर करायचे नाहीत.  आजोबा त्यांच्या सुनेला म्हणजे मामीला म्हणायचे , " इंदे , घाल त्या रावशाला काहीतरी खायाला. काही खाल्लं नसेल अजून." माझ्या वडिलांचं नाव रामा असलं तरी त्यांना ' रावसाहेब ' म्हणून सारी बोलवत होती.       
               काही वर्षांनंतर माझे मामा शिक्षणासाठी कोल्हापूरला जाऊ लागले.  तेच शाळेला जाताना दुधाच्या घागरी घेऊन जात आणि  हाॅटेल , चहागाडीवाले व   गि-हाईकांना दूध घालून शाळेत जात होते.  माझा थोरला भाऊ संभाजी हाही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होता.  दुसरा धोंडीराम व तिसरा तुकाराम हेही शिक्षणासाठी रजपूतवाडीत होते.  
             मी लहान होतो.  मला फारसे कळत नव्हते . तरीही मला आठवणारा हा प्रसंग. मी चार - साडेचार वर्षाचा असेल.  तेव्हा रजपूतवाडीत होतो.  माझी आई माझ्या पाचव्या भावासाठी बाळंत झाली होती.  रजपूतवाडीतून ज्वारीच्या थाटांनी भरलेल्या बैलगाडीत बसून मी वरणगे गावी माझ्या घरी आलो होतो.  तेव्हा आईसाठी तूपभात केला होता.  त्यातील भाताचे मुटके करून मला भरवलेले आजही मला आठवतात.  असेच काही दिवस निघून गेले . माझी आई आजारी पडली . अनेक डॉक्टरांना दाखवले. त्यावेळी नगारजी म्हणून डाॅक्टर गावात येत होते.  त्यांनीच आईला मिरजेला घेऊन जावा असे सांगितले. आईला मिरजेला नेऊन आणले.  पण  त्याचा काही उपयोग झाला नाही.  तिच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नाही कसे निधान झाले  होते. तिला घरी आणले ,  तेव्हा मी  रजपूतवाडी होऊन घरी आलो .  आजही ते दृश्य मला जसेच्या तसे दिसते आहे ..... 
.....आई मधल्या सोप्यात म्हणजे स्वयंपाक खोलीत झोपलेली आहे.  मी बैलगाडीतून उतरून पहिल्या सोप्यात गेलो. तेथून त्या खोलीत गेलो.  गंजातील पाणी प्यालो . पाणी पिऊन बाहेर  निघालो.  आई डोळे फिरवून माझ्याकडे बघते आहे. काही समजण्याचे ते वयही नव्हते.  आजही मला त्या दृश्याचा उलगडा होत नाही.  ती माझ्याकडे पाहून काय सांगत असावी? किंवा तिला काय म्हणायचे होते? हे मला आजही कळलेले नाही. मी तिथेच राहिलो. 
              चार दिवसानंतरचा तो प्रसंग..... आईला जास्त झाले होते.  माझे आजोबाही राहिलेले होते.  रात्री अकरा -साडे अकराची वेळ.  आईचे निधन झालेले होते.  घरात रडारड सुरू झाली होती.  पण आजोबांचा जीव थाऱ्यावर नव्हता .  कारण मामा  आणि मामी रजपूतवाडीत होते.  आजच्या सारखी  त्या काळात प्रसारमाध्यमे  नव्हती.  निरोप द्यायचा तर एखाद्या व्यक्तीला पाठवून द्यावे लागत होते.  तशी ती रात्रीची वेळ होती. वाहनाची सोय नव्हती. कुणाला पाठवून द्यायचे तर सायकल घेऊन जावे लागत होते.  सायकलवर पाठवून दिले तरी जायला अर्धा तास आणि चालत यायला तासभर तरी वेळ जाणार होता.  माझे आजोबा घरातून बाहेर यायचे आणि मोठ्याने ' पांडू ' म्हणून ओरडायचे . आमचे गावातील घर आणि रजपूतवाडीतील घर तसे एका रेषेत आहेत.  मधले अंतर काढले तर अडीच ते तीन किलोमीटर इतके भरेल. त्यावेळी रात्री खूप शांतता असायची . वाहनांची वर्दळ नाही की कशाचा गोंगाट नाही. खरंच त्यावेळी इथून हाक दिल्यानंतर तिथे पोहोचत होती.  काही वेळानंतर आजोबांनी हाक मारल्यानंतर सादाला प्रतिसाद आला. म्हणजे मामांनी  ' हो ' दिलेली ऐकू आली. आजोबांचा जीव भांड्यात पडला.  म्हणजे  मामा निम्म्या वाटेवर आलेले होते.  मामा घरी येईपर्यंत चार वाजत आले होते.  थोरला भाऊ संभाजी मोठ्याने रडत होता.  धोंडीराम आणि तुकाराम जवळच बसून मुसमुसत रडत होते. शिवाजी तर अवघा नऊ-दहा महिन्यांचा होता.  तो पाळण्यातच पडलेला होता. माझी अवस्था ती काय सांगावी?  मला काहीच कळत नव्हते.  मी रडतही नव्हतो. फक्त तेथे असलेल्या लोकांच्या चेहऱ्याकडे  टक लावून पहात होतो.  सकाळ होताच आईला  नदीकडेला असलेल्या मळी नावाच्या शेताकडे नेले.  खोल खड्डा काढलेला होता. त्यात दिवळी केलेली होती. त्यात तिला बसवली .  पाणी पाजले. आरती म्हटली. मीठ घातले. माती घातली.  नदीला आंघोळ करून घरी परतलो. आणि  आमच्या संध्याकाळला  सुरुवात झाली.........

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी