कथा/ कादंबरी लेखन प्रस्तावना
मी विचार करतोय कुठून सुरुवात करावी...... पन्नाशी उलटल्यावर आलेल्या अनुभवापासून , नोकरी लागल्यावर आलेल्या अनुभवापासून की लग्न झाल्यावर आलेल्या अनुभवापासून , शाळा , काॅलेज जीवनापासून सुरुवात करावी. त्यापेक्षा अगदी बालपणापासून सुरुवात करावी. माझं मलाच कळेना झालं की कुठून सुरुवात करावी ? अनेक लेखकांनी आपलं लेखन विशेषत: नवलेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात करून आपले विचार रसिकांसमोर ठेवलेही आहेत. मलाही अनेक मित्रांचे फोन आले की तू अजून का केली नाहीस सुरुवात तुझ्या लेखनाला? खरं म्हणजे मी तसा मोठा लेखक नाही, पण काहीतरी लिहावं असं अनेक मित्रमंडळींना वाटत होतं . तसं पाहायला गेलं तर संधीच होते अगदी मार्च २०२० शेवटचा आठवडा ते१५ जुलै २०२० असा चार ते पाच महिने कालावधी मिळालेला होता. या कालावधीत काहीतरी माझ्या हातून लेखन होणे अपेक्षित होतं. पण मी लिहू शकलो नाही. म्हणजे अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे . आपले विचार मांडण्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. ती प्रसन्न होणार हे काही माझ्या हातात नव्हते. पण लिहायला बसलो असतो तर नक्कीच काहीतरी लिहून झाले असते. तसे काही लिहिले नाहीच असे नाही. दोन- चार नाट्यछटा लिहिल्या. शिवाय मा. श्री. राजाराम तावडे यांच्या 'मन वढाय ' या भन्नाट कादंबरीचे प्रुपरिडिंग करून देण्याची संधी मिळाली. परंतु आज जे लिहिण्याचे नियोजित आहे , ते मात्र लिहिणं झालं नसतंच. या लॉकडाऊनच्या काळात विविध माध्यमातून विविध साहित्यप्रकार वाचायला मिळाले . कथा , कविता , नाट्यछटा आणि आत्मपर प्रसंग लेखन हे वाचत असताना कुठेतरी माझं स्फुल्लिंग जागृत झालं आणि मला लिहावंसं वाटलं . आमच्या शाळेचे मा. मुख्याध्यापक निकाडेसर यांचे सतत प्रोत्साहन मिळत आहेच पण माझे सहकारी , कर्मचारी यांचे सहकार्यही मिळते. श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांची प्रेरणा सतत मिळते . तसेच डॉ. श्रीकांत पाटील हे तर माझ्या खनपटीला बसलेले होतेच की काहीतरी लिहाच. वारणा साहित्य परिषदेचे सदस्य प्रा. आडकेसर, धनाजी माळीसर , अनिल शिनगारेसर यांचे आत्मनिवेदनपर लेखन वाचून मलाही माझा भूतकाळ गप्प बसू देईना. भलेही माझ्या हातून लाॅकडाऊनचे अर्धे वर्ष गेले असले तरी गेलेल्या काळाचा विचार न करता हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून संधीचे सोने करता येते का पाहू ? म्हणून मी लेखन कार्य हाती घेतलेले आहे . मोठा वर्ग म्हणजे सधन वर्ग की जो सर्व सुखसोयीच्या अधीन राहून सारी सुखं उपभोगत असतो. तर गोरगरीब वर्ग हा लाचारीच्या दलदलीत आशाळभूत होऊन काही मिळविण्याच्या अधीन झालेला असतो. पण मध्यमवर्गीय लोकांचं जीवनच वेगळं असतं. सुखाच्या गाडीवर लोळण घेता येत नाही आणि लाचार होऊन कुणाच्या दारात उभे राहता येत नाही. जसे आपणाला शक्य आहे त्या पद्धतीने तो जगत असतो. काही वेळेला धडपडत असतो. तर काही वेळेला उपाशी राहत असतो. तशीच काहीशी माझी अवस्था झालेली आहे. म्हणजे मला सरस्वती प्रसन्न असती तर मोठमोठ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत बसता आलं असतं. किंवा इतरांसारखं वाचता आलं असतं , पण ना घर का ना घाट का अशी अवस्था माझी झाली आहे. पण रामदास स्वामींनी म्हटले आहे की ' केल्याने होत आहे रे !! आधी केलेचि पाहिजे .' म्हणून मी आता ठरविले आहे की मला काहीतरी लिहायचे आहे. मग माझे गेलेले बालपण का बरं साहित्यात आणू शकत नाही. म्हणून मी लिहायचा प्रयत्न करत आहे. तो किती यशस्वी होईल ते मी सांगू शकत नाही , पण कुठेतरी मला व्यक्त होणं महत्वाचा आहे. नाहीतर काहीतरी राहून गेल्याचं दुःख कवटाळून बसावं लागेल. म्हणून मी ते लिहित आहे. त्याची
यशस्विता अगर अयशस्विता ही आपल्या वाचकांच्या हाती देत आहे.
Comments
Post a Comment