कथा/ कादंबरी लेखन प्रस्तावना

मी विचार करतोय कुठून सुरुवात करावी...... पन्नाशी उलटल्यावर आलेल्या अनुभवापासून , नोकरी लागल्यावर आलेल्या अनुभवापासून की लग्न झाल्यावर आलेल्या अनुभवापासून , शाळा , काॅलेज जीवनापासून सुरुवात करावी.  त्यापेक्षा अगदी बालपणापासून सुरुवात करावी. माझं मलाच कळेना झालं की  कुठून सुरुवात करावी ? अनेक लेखकांनी आपलं लेखन विशेषत: नवलेखकांनी आपल्या लेखनाची सुरुवात करून आपले विचार रसिकांसमोर ठेवलेही आहेत. मलाही अनेक मित्रांचे फोन आले की तू अजून का केली नाहीस सुरुवात तुझ्या लेखनाला? खरं म्हणजे मी तसा मोठा लेखक नाही, पण काहीतरी लिहावं असं अनेक मित्रमंडळींना वाटत होतं . तसं पाहायला गेलं तर संधीच होते अगदी मार्च २०२० शेवटचा आठवडा ते१५ जुलै २०२० असा चार ते पाच महिने कालावधी मिळालेला होता.  या कालावधीत काहीतरी माझ्या हातून लेखन होणे अपेक्षित होतं. पण मी लिहू शकलो नाही.  म्हणजे  अनेकांचा अपेक्षाभंग झालेला आहे . आपले विचार मांडण्यासाठी सरस्वती प्रसन्न  व्हावी लागते. ती प्रसन्न होणार हे काही माझ्या हातात नव्हते. पण लिहायला बसलो असतो तर नक्कीच काहीतरी लिहून झाले असते.  तसे काही लिहिले नाहीच असे नाही.  दोन- चार नाट्यछटा लिहिल्या. शिवाय मा. श्री. राजाराम तावडे यांच्या 'मन वढाय ' या भन्नाट कादंबरीचे प्रुपरिडिंग करून देण्याची संधी मिळाली.  परंतु आज जे लिहिण्याचे नियोजित आहे , ते मात्र लिहिणं झालं नसतंच.  या लॉकडाऊनच्या काळात विविध माध्यमातून विविध साहित्यप्रकार वाचायला मिळाले . कथा , कविता , नाट्यछटा आणि आत्मपर प्रसंग लेखन हे वाचत असताना कुठेतरी माझं स्फुल्लिंग जागृत झालं आणि मला लिहावंसं वाटलं . आमच्या शाळेचे मा. मुख्याध्यापक निकाडेसर यांचे सतत प्रोत्साहन मिळत आहेच पण माझे सहकारी , कर्मचारी यांचे सहकार्यही मिळते. श्री भैरवनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी  यांची प्रेरणा सतत मिळते . तसेच डॉ. श्रीकांत पाटील हे तर माझ्या खनपटीला बसलेले होतेच की काहीतरी लिहाच. वारणा साहित्य परिषदेचे सदस्य प्रा. आडकेसर, धनाजी माळीसर , अनिल शिनगारेसर यांचे आत्मनिवेदनपर लेखन वाचून मलाही माझा भूतकाळ गप्प बसू देईना. भलेही माझ्या हातून लाॅकडाऊनचे अर्धे वर्ष गेले असले तरी गेलेल्या काळाचा विचार न करता हातात असलेल्या वेळेचा सदुपयोग करून संधीचे सोने करता येते का पाहू ? म्हणून मी लेखन कार्य हाती घेतलेले आहे . मोठा वर्ग म्हणजे सधन वर्ग की जो सर्व सुखसोयीच्या अधीन राहून  सारी सुखं उपभोगत असतो.  तर गोरगरीब वर्ग हा लाचारीच्या  दलदलीत आशाळभूत होऊन काही मिळविण्याच्या अधीन झालेला असतो. पण मध्यमवर्गीय लोकांचं जीवनच वेगळं असतं. सुखाच्या गाडीवर लोळण घेता येत नाही आणि लाचार होऊन  कुणाच्या दारात उभे राहता येत नाही.  जसे आपणाला शक्य आहे त्या पद्धतीने तो जगत असतो. काही वेळेला धडपडत असतो. तर काही वेळेला उपाशी राहत असतो. तशीच काहीशी माझी अवस्था झालेली आहे. म्हणजे मला सरस्वती प्रसन्न असती तर मोठमोठ्या साहित्यिकांच्या मांदियाळीत बसता आलं असतं. किंवा इतरांसारखं वाचता आलं असतं , पण ना घर का ना घाट का अशी अवस्था माझी झाली आहे.  पण रामदास स्वामींनी म्हटले आहे की ' केल्याने होत आहे रे !! आधी केलेचि पाहिजे .' म्हणून मी आता ठरविले आहे की मला काहीतरी लिहायचे आहे. मग माझे गेलेले बालपण का बरं साहित्यात आणू शकत नाही.  म्हणून मी लिहायचा प्रयत्न करत आहे. तो किती यशस्वी होईल ते मी सांगू शकत नाही , पण कुठेतरी मला व्यक्त होणं महत्वाचा आहे.  नाहीतर काहीतरी राहून गेल्याचं दुःख कवटाळून बसावं लागेल. म्हणून मी ते लिहित आहे. त्याची
 यशस्विता अगर अयशस्विता ही आपल्या वाचकांच्या हाती देत आहे.

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी