४. कथा--- 'नेत्रदान'

                   ४.   *नेत्रदान श्रेष्ठ दान* 
         आज श्रीकांत  रडत होता. पण ते दु:खाश्रू नव्हते, तर आनंदाश्रू होते. त्याच्या कुशीमध्ये त्याची मुलगी सपना होती. तीही रडत होती. त्याला कारणही तसेच घडलेले होते.  ते म्हणजे श्रीकांतने आपल्या मुलीला म्हणजेच सपनाला आपले दोन्ही डोळे दान केले होते.  म्हणून सपना आज सारे जग पाहत होती, पण श्रीकांत मात्र काहीच पाहू शकत नव्हता.  कारण त्याचे दोन्ही डोळे त्याने आपल्या मुलीला सपनाला दान दिले होते. सपनाला दृष्टी आली होती. ती सारखी सारखी न्याहाळून पाहू शकत होती , पण जेव्हा तिला कळले होते , की मी जे पाहू शकते ते माझ्या बाबांच्या डोळ्यांनी पाहू शकतेय, मात्र माझ्यामुळेच माझ्या बाबांना दृष्टिहीन व्हावे लागत आहे .  म्हणून तिला खूप खूप वाईट वाटत होते. तिचाच तिला राग येत होता. म्हणून ती हमसून हमसून रडत होती.  श्रीकांतही रडत होता. मात्र ते त्याचे दुःखाश्रू नव्हते, तर ते सुखाश्रू होते . कारण आज आपली मुलगी सपना सारे जग
 पाहत होती, म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदाच्या क्षणाने तो रडत होता. आणि त्याचवेळी त्याच्या डोळ्यासमोरुन सारा भूतकाळ तरळून गेला........      
          वरणगे गावामध्ये श्रीकांत आणि सुलोचना यांचा सुखाचा संसार सुरू होता , पण त्यांच्या संसारामध्ये  मुलाची उणीव होती .  लग्न होऊन बारा वर्षे  होऊन गेली.  पण त्यांना मूलबाळ झालं नाही. नवस-सायास झाले. उपास-तापास झाले. त्यांना मूल काही होऊ शकले नाही. असतो एखाद्याचा पाळणा लांब , या भावनेने श्रीकांत आणि सुलोचना सारे दु: ख सहन करत होते.  आज ना उद्या आपल्याला बाळ होईल या आशेने ते जगत होते. 
          कर्मधर्मसंयोगाने एक तपानंतर त्यांना एक मूल झालं . घरादारात आनंदी आनंद झाला . बारा वर्षानंतर मूल झालं . पण ती मुलगी होती. मुलगा नव्हता. आजच्या या जमान्यात प्रत्येकाला मुलगाच हवा अशी अपेक्षा असतानाही श्रीकांत आणि सुलोचनाला मुलगी झाली होती. तरी ते दोघे खूप आनंदात होते. कारण काहीही नसण्यापेक्षा काहीतरी आहे, यात ते समाधान मानत होते.  मुलगी झाली म्हणून काय झाले ? जगाकडून वांझोटी म्हणवून घेण्यापेक्षा तरी बरे, असा त्याने विचार केला होता. अगदी धुमधडाक्यात त्याने मुलीचे बारसे केले होते. सर्व गावाला जेवणाचे आमंत्रण दिले होते.  मुलगी झाली होती तरी त्यानं लाडवाचं जेवण केलं होतं. जेवणात काहीही कमी पडू दिले नाही. एखाद्या श्रीमंताला लाजवेल इतक्या मोठ्या प्रमाणात बारसं करण्यात आले  होते. मुलीचे नाव 'सपना' असे ठेवण्यात आले.  खरंच स्वप्न पाहिल्यासारखं त्यांना इतक्या वर्षानंतर बाळ झालं होतं. आणि स्वप्नात पाहिल्यासारखी ती मुलगी होती. अगदी परीसारखी छान दिसत होती. नाकी डोळी छान . रंगाने गोरीपान.  म्हणून तिचे नाव 'सपना' असे ठेवले होते. लहानपणी तिचे खूप कोड - कौतुक झाले . 
         बघता बघता दिवसामागून दिवस निघून गेले. काही महिने झाले. सुखानं चाललेल्या घराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. कारण लहान बाळ हाक मारल्यानंतर त्या दिशेला पाहते. णतशी सपनाही पाहत होती. तिला ऐकू यायचे, पण तिला दिसत नाही असे श्रीकांत आणि सुलोचनाच्या लक्षात आले होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. अनेक डॉक्टरांना दाखवले. पण तिची दृष्टी येणे शक्य नाही असे प्रत्येक डाॅक्टर सांगत होते. तरीसुद्धा श्रीकांत तिला दवाखान्यात दाखवण्यात कमी पडत नव्हता.  
         सपना हळूहळू मोठी होऊ लागली.  मैत्रिणींच्या मध्ये खेळू लागली. सुलोचनाने सपनाला सुंदर स्वयंपाक करायला शिकवला होता. सर्व प्रकारचे जेवण ती अतिशय सुंदर बनवत होती. प्रत्येक काम ती जीव लावून करायची. जनावरांना फिरवायला घेऊन जायची. गावातील लोकं थक्क व्हायची. सगळे आश्चर्यचकित व्हायचे. ही सपना आंधळी असूनही काम कसे डोळस माणसालाही लाजवेल अशी करायची.  सगळं कसं व्यवस्थित आणि नीटनेटके काम करायची. अनेक मुलींना तिचा हेवा वाटायचा. कारण त्यांचे बाप त्यांना सपनाचे उदाहरण द्यायचे.
          दिवस आनंदात जात होते. देवाने यापेक्षा आणखी द्यायला हवे होते? 
         एके दिवशी शेतामध्ये काम करत असताना सुलोचनाच्या पायाला काहीतरी चावल्याचे निमित्त झाले आणि ती गतप्राण होऊन पडली . श्रीकांतवर आकाश कोसळून पडले. सपना आईविना पोरकी झाली. पण सारं दु:ख बाजूला टाकून श्रीकांतने ठरवलं की आपणच बापाची आणि आईची भूमिका वटवायला हवी. आनंदी असलेल्या सपनाला दुःख होऊ नये, म्हणून तो हातावरच्या फोडाप्रमाणे तिला जपत होता.  श्रीकांत शेतातले काम करायचा. काही वेळा दुसरीकडे रोजगाराला जायचा. सपना घरातली सारी कामं करत होती. 
              आज सपनाचा वाढदिवस होता. आईविना पहिलाच वाढदिवस साजरा होत होता.  सपनाने मैत्रिणींना आपल्या घरी वाढदिवसासाठी बोलावले होते. सगळ्या मैत्रिणी आल्या होत्या. सगळ्या जणी खेळण्यात दंग झाल्या होत्या. सपनानं अतिशय सुंदर असं जेवण बनवलेलं होतं. मैत्रिणी खेळून झाल्यानंतर सपनानं त्यांना जेवायला बोलवलं होतं. मैत्रिणी जेवायला बसल्या होत्या. पण कुणास ठाऊक काय झाले. मैत्रिणींच्यात भांडण सुरू झालं. भांडण इतकं विकोपाला गेलं की सगळ्या मैत्रिणी काहीच न खाता निघून गेल्या. सपनानं हातानं चाचपून पाहिलं की प्रत्येकीच्या ताटामध्ये जेवण तसंच होतं आणि मैत्रिणी निघून गेल्या होत्या. तिला काहीच कळंना की असं काय झालं की सगळ्या मैत्रिणी जेवणावरून उठून का गेल्या? तिला फार वाईट वाटलं होतं. कारण आपण अंध असल्यामुळे आपल्या मैत्रिणीने आपण केलेलं जेवण खाल्लं नाही, याचं तिला खूप वाईट वाटत होतं. ती हमसून हमसून रडत होती. दुपारपासून सायंकाळपर्यंत तिचं रडणं सुरू होतं. 
               शेतात गेलेला श्रीकांत संध्याकाळी  परत आला. त्याने पाहिलं की सपना रडत होती. तिचं डोळं सुजलेलं होतं. त्यांनं तिला विचारलं, "बाळ सपना, काय झालं?" तेव्हा ती म्हणाली,     "तुम्हाला तर माहिती आहे की मी किती चांगला स्वयंपाक करते. आज मी तितकाच सुंदर आणि स्वादिष्ट स्वयंपाक केलेला होता. पण माझ्या मैत्रिणी काहीच न खाता निघून गेल्या. याचं मला वाईट वाटत आहे, असं म्हणून ती श्रीकांतच्या कुशीत शिरून खूप खूप रडत होती. श्रीकांतला काहीच सुचंना. आपण काय करावं म्हणजे माझ्या मुलीला आनंद होईल. त्यांनं ठरवलं, की मला आता काहीतरी केलं पाहिजे. त्यानं सपनाला आनंदी करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तिची समजूत काढली. आईची शपथ घातली. पण सपना मानायला तयारच होईना. दोघंही रात्री जेवली नाहीत. रात्रभर त्याला झोप लागली नाही. विचारांमध्ये रात्र सरत नव्हती. एकेक क्षण हा  एकेक युगासारखा वाटत होता. केलेलं एवढं जेवण वाया गेलं याचं त्याला काहीच वाटत नव्हतं.पण सपनाच्या मनाला झालेल्या वेदना श्रीकांतच्या मनाला झोंबत होत्या.        
                श्रीकांत सकाळी उठला. पायात चप्पल घातले आणि त्यांनं शहराची वाट धरली. कोल्हापूरमध्ये जितके डोळ्यांचे डॉक्टर आहेत. त्यांच्या दवाखान्यात जाऊन त्याने आपल्या सपनाच्या दृष्टीसाठी विचारायला सुरुवात केली. पण सर्व डॉक्टरांचे म्हणणे एकच होतं की सपनाला दिसायचं असेल तर तिला डोळे बसवले पाहिजेत. असे केले तरच ती जग पाहू शकेल.  दिवसभर फिरून श्रीकांत घरी परत आला. विचार करु लागला की कुणाचे डोळे तिला बसवता येतील? कोण आपलं डोळं देतील? दुसऱ्याचं डोळं विकत घ्यायचं तर चार-पाच लाख रूपये  डॉक्टरांनी खर्च सांगितलेला होता. 'इतकं पैसं कुठून आणायचं?' असा विचार करत होता. विचार करत अघंसताना त्याला सुचलं की मग मी माझं डोळं तिला दिलं तर ........  
            त्यांनं निर्णय घेतला आपलंच डोळं  द्यायचं सपनाला. नाहीतरी आपलं आयुष्य आता कितीसं राहिलंय! माझ्या डोळ्यानं ती जग पाहू शकेल. 
              सपनाने आपल्या बाबांना विचारले,  "बाबा आज सकाळपासून तुम्ही कुठे होता?" तेव्हा श्रीकांत म्हणाला, "बाळ, मी तुला आता आनंदाची बातमी देणार आहे." 
"आनंदाची बातमी! माझ्यासाठी!" सपनानं आतुरतेनं विचारलं.
" होय.आनंदाचीच बातमी आहे. तू आता पाहू शकतील."  श्रीकांतने सांगितले. 
" कसे?" सपनाने उत्सुकतेने विचारले.
" बाळ, काळ आता फार पुढे गेला आहे. सरकारने राबवलेल्या नेत्रदान कार्यक्रमामुळे मयत व्यक्तीचे डोळे काढून दुसर्‍या अंध व्यक्तीला बसवले जातात. त्यामुळे डोळे नसलेल्या माणसाला दृष्टी येऊन तो जग पाहू शकतो. म्हणूनच मी कोल्हापुरात जाऊन जवळकर डॉक्टरांना सारे विचारले आहे. त्यांनीच मला हे सांगितले आहे. हे ऐकताच सपनाला खूप आनंद झाला. "खरंच बाबा , मीही जग पाहू शकेन?" असं म्हणून तिनं आपल्या बाबांना घट्ट मिठी मारली. हे पाहून श्रीकांतही शहारून गेला. फक्त ऐकून सपनाला इतका आनंद झाला असेल, तर हे जग पाहिल्यानंतर तिला  किती आनंद होईल! म्हणून तिच्यासाठी हा धाडसाचा निर्णय श्रीकांतने घेतला होता. 
              तो दिवस उजाडला. सपनाला घेऊन तो डाॅ.जवळकर यांच्या दवाखान्यात गेला . एका बेडवर सपना झोपली होती.  तिला डोळे बसवायचे होते, तर दुसर्‍या बेडवरती श्रीकांत झोपला होता. कारण त्याचे डोळे काढायचे होते.  आॅपरेशनची सर्व तयारी झाली. डाॅ.जवळकरांनी  श्रीकांतचे डोळे काढले. तेच डोळे  सपनाला प्रत्यारोपण करून बसवले.  
           काही दिवस झाले. आज सपनाच्या डोळ्यावरची पट्टी काढून तिला हे जग दाखवायचे होते.य त्यावेळी तिला विचारले, "तुला पहिल्यांदा काय पाहायचे आहे?" तेव्हा ती म्हणाली, "डॉक्टरसाहेब,  ज्या व्यक्तीने मला डोळे दिलेत , त्यांना मला पाहायचे आहे." 
"ठीक आहे."असे डॉक्टर म्हणाले. 
             तो क्षण आला. सपनाला खुर्चीवर बसवले आणि डॉक्टर तिच्या डोळ्यावरची पट्टी काढू लागले. डोळ्यावरची पट्टी हळूहळू काढली आणि सपनाला हळूहळू डोृळे उघडण्यास सांगितले. ती डोळे उघडण्याचा प्रयत्न करू लागली. हळूहळू ती पाहू लागली. त्यावेळीच तिच्यासमोर खुर्चीत बसलेली व्यक्ती तिने पाहिली आणि तिला धक्काच बसला. ज्या व्यक्तीने मला डोळे दिले, ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझे वडीलच आहेत. हे तिला कळल्यावर ती  म्हणाली, "बाबा, तुम्ही माझ्यासाठी इतका मोठा त्याग केलात. मला दिसावे म्हणून तुम्ही तुमचे डोळे मला दिलेत. बाबा तुम्ही का केलेत असं? का स्वतःहून आंधळेपणा ओढावून घेतलात?"  असं म्हणून ती रडू लागली. तेव्हा बाबा तिला म्हणाले, 
" माझं आयुष्य आता कितीसं राहिलं आहे. अगं मी म्हणजे  वटलेल्या झाडाचं पिकलेलं पान, कधी गळून पडेल सांगता यायचं नाही. पण सपना मी मेलो काय, जगलो काय? फारसा फरक पडत नाही. पण लक्षात ठेव बाळ, मी मेलो तरी तुझ्या डोळ्याच्या रुपानं जिवंत राहणार आहे. तेव्हा फार विचार करू नकोस. मी हे जग पाहिलेच आहे.  याच जगाने तुझी केलेली हेटाळणी पाहिली आहे. आणखी दु:ख तुझ्या वाट्याला यावं असं मला वाटत नाही. मी फार मोठं काही केलं नाही. तुझ्या डोळ्याच्या रूपानं मी तुझ्या सोबतच आहे. आणि बाळ, तू लक्षात ठेव की, ज्यावेळी तुझं निधन होईल. त्यापूर्वी तू हे डोळे दुसऱ्यासाठी दान कर.  म्हणून मृत्यूपूर्वी नेत्रदान फाॅर्म भरून दे." हे ऐकल्यावर सपना आपल्या बाबांना म्हणाली, 
"बाबा,  मी तुमचीच मुलगी आहे. आताच मी डाॅ. जवळकरसाहेबांना नेत्रदानाचा फाॅर्म भरून देत आहे." असं म्हणून सपना बाबांच्या कुशीत शिरून रडू लागली. डॉक्टर आणि नर्स कौतुकानं या दृश्याकडे पाहत राहिले. पाहतच राहिले.. आणि पाहतच राहिले.
     लेखन : परशराम आंबी

Comments

Popular posts from this blog

माझी मराठी माझी जबाबदारी

सारांश लेखन

'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' डॉ. श्रीकांत पाटील डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांची कोरोना महामारीचा विषय घेऊन प्राण्यांच्या सहलीचे काल्पनिक कथानक मांडून लिहिलेली 'सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल' ही कादंबरी त्यांच्या उत्तुंग भरारी मारणाऱ्या आगळ्यावेगळ्या कल्पकतेची साक्ष देणारी कादंबरी आहे. या कादंबरीच्या कथानकातून लेखकाच्या अंगी असणारी सूक्ष्म दृष्टी दिसून येते. सामाजिक व चिंतनशील विषय घेतला आहे. माणसाने आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःवर ओढवून घेतलेल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्या तल्लख बुद्धीचा वापर करून घेतला आहे. मानवी जीवनातील चित्रण शिक्षक , विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचे आयोजन करून स्वानुभवाचा आनंद देणे. हाच आनंद रुपकाच्या माध्यमातून प्राणी जगतात देण्याचा लेखकाने केलेला प्रयत्न अतुलनीय असा आहे. लेखकाच्या मनातून अवतरलेला हा आहे. विचार आहे तो मुळात शाळा. हा विषय मानवी जीवनातील वैविध्यपूर्ण आहे. तो एक शिक्षकी शाळा , दोन शिक्षकी शाळा, आदिवासी शाळा, मुलांची शाळा, मुलींची शाळा, ग्रामीण शाळा, शहरी शाळा , रात्रशाळा, साक्षरता शाळा, आश्रमशाळा, रवींद्रनाथ टागोरांची निसर्गातील शाळा. पण या लेखकांच्या मनातून अवतरलेली शाळा ही वेगळीच आहे. मुख्याध्यापक, शिक्षक , शिक्षिका , शिपाई यांचा परिवार आलाच . पण ही शाळा प्राण्यांची शाळा आहे. शाळेचे मुख्याध्यापक आहेत - सुजय हत्तीसर. शिक्षकांच्या मध्ये आहेत बाजीराव वानर, विश्वजीत वाघ तर शिक्षिकांच्यामध्ये नलिनी चित्ते, शोभा काळे बेटे या मॅडम. शाळेचा शिपाई म्हणजे गाढव. पण या साऱ्यांनी आपापली जबाबदारी पिण्याचं आणि नियोजन करण्याचं काम अतिशय सुंदरपणे स्वीकारलेले आहे . आणि पार पाडलेला आहे. ही कादंबरी वाचताना खरोखरच खऱ्या शाळेचा परिपाठच आपण पाहतोय असे वाटते. मुलांच्या मध्ये असणारे सर्वगुण आणि अवगुणही या शाळेमध्ये आहेत. खरं म्हणजे मुलांना शाळेत जाणं आवडत नाही. इतर उचापती करण्यात त्यांना रस असतो. तसेच या शाळेतील विद्यार्थीही म्हणजे वानरसेना खऱ्या जीवनातील मुलाप्रमाणेच आहेत. त्यांना शाळेपेक्षा बाहेर फिरणे आवडते. काही दिवस वानर विद्यार्थी शाळेत न आल्यामुळे त्यांचे प्राणी- शिक्षक चौकशी करतात. तेव्हा त्यात त्यांना समजून येते की, ही मुलं शाळा सोडून त्यांच्या पालकांबरोबरच शेजारच्या गावात गेलेली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर शेजारच्या गावात कोरोनामुळे बंदिस्तपणा आला होता. त्याचाच फायदा घेऊन ही वानरसेना मौज मजा करत होती. तीच गोष्ट त्याने आपल्या शाळेत सांगितली. इतर प्राण्यांना ती पटली नाही. त्याची खातरजमा करून आतील माणसाच्या जगातील जीवन पाहण्यासाठी या प्राणी शाळेची सहल काढण्याचे नियोजन केलं जातं . खरं म्हणजे माणसाच्या सहलीच्या नियोजनाची जसे कार्य चालते तसेच या प्राणी जीवनाच्या सहलीचे नियोजन केले होते. सहल केव्हा, कुठे, कशी न्यायची याचे नियोजन करण्यात आले होते. अगदी शिस्तबद्ध सहल पार पडलेली आहे. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर सिमेंटच्या जंगलात प्राण्यांची सहल हे पुस्तक वाचलेच पाहिजे. हे पुस्तक वाचताना लेखकाची कल्पकता दिसून येते. प्रत्यक्ष भेटीच्या ठिकाणाची माहिती , संस्थापक अर्थात सिंह राजाची परवानगी घेणे. शासनाची परवानगी मिळवणे, सहलीला इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी तयार करणे, सोबत घ्यावयाच्या वस्तूंच्या सूचना देणे, सहलीत पाळावयाचे नियम, पालकांची परवानगी आणि इतरांना त्रास न होता सहलीचा मुक्तपणे आनंद घेणे या साऱ्या गोष्टींचा उल्लेख लेखकाने मार्मिकपणे केला आहे . मनुष्यप्राणी कोरोणाच्या भीतीने घरामध्ये कैद झाला. लॉकडाऊनचा फायदा प्राण्यांनी आपल्या सहलीचा आनंद घेण्यामध्ये लुटला. सहल म्हणजे फक्त फिरणे नव्हे, मौजमजा करणे नव्हे , तर सहलीचा खरा अनुभव घेणे तो म्हणजे तो मनोगतातून मांडणे , निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करणे. योग्य पारितोषिके देणे. घटनांची सूत्रबद्धपणे मांडणी करणे होय. मुलांना चित्रांची आवड असते हे लक्षात घेऊन या कादंबरीत प्राण्यांची चित्रे रेखाटलेली आहेत. त्यामुळे बाल वर्गाला मोहित करणारी अशीच कादंबरी झालेली आहे. विद्यार्थी, शिक्षक आणि रसिक वाचकांना करमणुकीच्या बरोबरच ज्ञानाचे अमृत पाजून डोळे उघडण्याचे कामही ही कादंबरी करते. ही कादंबरी इसापनीतीच्या कथांची आणि वि. स. खांडेकर यांच्या रूपक कथांची आठवण करून देणारी आहे असे मला वाटते. ही कादंबरी वाचताना शाळेतील प्रसंग जसेच्या तसे समोर उभे राहतात. स्वतः सहलीचा घटक बनून सवारी केल्याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. हेच तर लेखकाचे खरे यश आहे असे म्हणता येईल. हृदय प्रकाशनप्रकाशनने प्रकाशित केलेली ही कादंबरी रंगीत चित्रांनी सजलेली आहे. कादंबरीचा संपूर्ण आशय असणारे देखणे मुखपृष्ठ चित्रकार श्रीरंग मोरे यांचे आहे. तर आतील चित्रे चंद्रकांत सोनवणे आणि बाळ पोतदार यांची आहेत. वाचक रसिक या पुस्तकाचे निश्चितच स्वागत करतील याची मला खात्री आहे. डाॅ. श्रीकांत पाटीलसर यांना पुढील लेखन काेर्यासाठी हार्दिक शुभेच्छा. परशराम रामा आंबी वरणगे पाडळी